बिहार निवडणूक निकाल: मतमोजणी पूर्ण होण्यासाठी का होतोय उशीर?

बिहार निवडणुकीचा निकाल अजूनही स्पष्ट झाला नाहीये. एनडीए आणि महागठबंधन यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. गेल्या निवडणुकांमध्ये आपण हे पाहिलं आहे की संध्याकाळपर्यंत मतमोजणी पूर्ण होते. पण अद्यापही मतमोजणी पूर्ण झालेली नाही.

आतापर्यंत केवळ 44 जागांचे निकाल हाती आले असून इतर ठिकाणी मतमोजणी सुरू आहे.

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार भाजप-जेडीयूप्रणित एनडीए 93 जागांवर आघाडीवर असूनन महागठबंधन 90 जागांवर आघाडीवर आहे. एमआयएम देखील चार ठिकाणी आघाडीवर आहे.

अजूनही निकालाचं चित्र स्पष्ट झालं नाहीये. हे असं का झालं आहे? निवडणूक निकाल यायला उशीर का होत आहे?

मात्र कोरोना काळातली ही पहिलीच निवडणूक असल्याने बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत.

बिहार निवडणूक आयोगाने मतमोजणी सुरू असताना, दुपारी दीड वाजता पत्रकार परिषद घेतली आणि कोरोना काळात करण्यात आलेल्या काही नवीन उपाय योजनांबद्दल माहिती दिली.

आतापर्यंत सगळीकडे मतमोजणी आणि निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आकडे अपडेट करण्याचं काम अगदीच सुरळीतपणे सुरू आहे. आतापर्यंत जवळपास 1 कोटी मतं मोजली गेलेली आहेत, असं बिहार निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

या अधिकाऱ्यांनी ही सुद्धा माहिती दिली की यंदा कोरोनाची साथ बघता सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं, म्हणून मतदान केंद्रं 63 टक्क्यांनी वाढवण्यात आली होती. 2015 मध्ये 65 हजार मतदान केंद्रं होती तर यंदा जवळपास 1 लाख 6 हजार केंद्रांवर मतदान झालं. त्यामुळे साहजिकच मतदान यंत्र अर्थात EVMची संख्यासुद्धा तितक्याच प्रमाणात वाढली आहे.

मात्र यासाठी पुरेशी सोय करण्यात आल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. मतमोजणीला उशीर होण्याचं कारण, मोजणी संथीगतीने सुरू आहे का, असं विचाल्यावर ते म्हणाले, "मतमोजणी संथगतीने सुरू आहे, असं नाही. मजमोजणीची गती तीच आहे, मात्र मतदान केंद्रांची संख्या वाढलीय, मतपेट्यांची संख्या वाढलीय, पोस्टल बॅलट्सची संख्या वाढलीय, त्यामुळे वेळ लागणार आहेत.

"मतमोजणी वेळेत व्हावी, यासाठी आम्ही जास्तीची मतमोजणी केंद्रंही उभारली आहेत. मात्र एका मतमोजणी केंद्रावर पूर्वी 1500 लोक असायचे, आता मात्र तीच संख्या 1000 वर आली आहे," असं हे अधिकारी म्हणाले.

बिहारमध्ये सुमारे 7.3 कोटी मतदार आहेत, आणि यंदा 57 टक्के मतदान झालं आहे. निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद झाली तेव्हा दुपारी 1.30 वाजेपर्यंत सुमारे एक कोटी मतं मोजण्यात आली होती. म्हणजेच 5.30 तासात फक्त एक कोटी मतमोजणी झाली आहे. त्यामुळे मतमोजणी पूर्ण व्हायला उशीर होणार, याचीच शक्यता जास्त आहे.

या अधिकाऱ्यांनी असंही सांगितलं की "यंदा सुमारे 50 हजारपेक्षा जास्त टपाल मतं रिटर्निंग ऑफिसरकडे आली आहेत. टपाल मतं किंवा पोस्टल बॅलट ही फक्त लष्करी तसंच क्लास-1 अधिकाऱ्यांसाठी केलेली सोय असते."

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की "आज (मंगळवारी) सकाळी आठ वाजेपर्यंत जी टपाल मतं रिटर्निंग अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली होती, तीच मतं ग्राह्य धरली जाणार."

तुम्हाला आठवत असेल याच टपाल मतांवरून अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी तिथल्या निवडणूक निकालांना आव्हान दिलं आहे. अर्थात तिथे टपाल मतांचा पर्याय सर्वांसाठी उपलब्ध असतो आणि त्यामुळे निकालांवर परिणाम होऊ शकतो.

बिहारमध्ये तसं होण्याची शक्यता नाही, मात्र तरीही कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंग पाळताना मतमोजणीची गती कमी होणारच, त्यामुळे अंतिम निकाल यायला उशीर लागू शकतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)