You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिहार विधानसभा निवडणूक: एक्झिट पोल दाखवतात तेजस्वी आणि नितीश यांच्यामध्ये अटीतटीची लढत
बिहार विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल्स जाहीर केले जात आहेत. या एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव आणि नितिश कुमार यांच्यात अटीतटीची लढत होताना दिसत आहे. तसेच त्यातही तेजस्वी यादव आगेकूच करताना दिसत आहेत.
हे सर्व पोल इतर विविध संस्थांनी घेतले आहेत. बीबीसीने कोणताही एक्झिट पोल घेत नाही. बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला 122 जागांची गरज आहे.
- रिपब्लिक-जन की बात
- जदयु, भाजपा आघाडी- 91-117
- राजद, काँग्रेस आघाडी- 118-138
- लोजपा- 5-8
- इतर- 3-6
- टाइम्स नाऊ, सी व्होटर
- जदयु, भाजपा आघाडी- 116
- राजद, काँग्रेस आघाडी- 120
- लोजपा- 1
- इतर- 6
- न्यूज 18 चाणक्य
- जदयु, भाजपा आघाडी- 55
- राजद, काँग्रेस आघाडी- 180
- लोजपा- 0
- इतर- 8
- न्यूज एक्स, डीव्ही सर्च
- जदयु, भाजपा आघाडी- 110-117
- राजद, काँग्रेस आघाडी- 108-123
- लोजपा- 4-10
- इतर- 8-23
सध्या बिहारमध्ये एनडीएप्रणित आघाडीनं नितीन कुमार यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर केलं आहे, तर महाआघाडीनं तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलं आहे.
नितीश कुमार यांनी प्रचारसभांमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या काळातील 'जंगलराज'वर वारंवार टीका केली आहे आणि जनतेनं परत एकदा सत्ता द्यावी,असं आवाहन केलं आहे.
तर तेजस्वी यादव यांनी ही निवडणूक रोजगाराच्या मुद्द्यावर लढली जात असल्याचं म्हटलं आहे.
तेजस्वी यादव यांच्या सभांना होणारी गर्दीही या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरली आहे. एका दिवसात ते 16 ते 19 सभा घेत असल्याच्या बातम्याही आल्या आहेत.
असं असलं तरी आता बिहारमधील निवडणूक प्रचार संपला असून मतदानही आज संध्याकाळी संपेल आणि सगळ्यांच्या नजरा एक्झिट पोल्सच्या आकड्यांकडे लागतील.
कसा करतात एक्झिट पोल?
संजय कुमार सांगतात, "कोणत्याही पोलसाठी अगोदर एक सॅंपल बनवलं जातं. ज्यामध्ये काही हजार माणसांचा समावेश असतो. ज्या राज्यात निवडणूक आहे त्या राज्यातलेच हे मतदार असतात आणि त्यांची संख्याही त्याच प्रमाणात असते, जेवढी राज्यात असते.
"यात ग्रामीण, शहरी, वेगवेगळे धर्म, जाती, लिंग आणि समुदायाच्या लोकांना त्याच प्रमाणत घोतलं जातं जेवढं त्यांचं त्या राज्यात प्रमाण असतं. या सर्वांशी चर्चा करून त्यांनी कुणाला मत दिलं किंवा देणार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो."
या सर्व बाबींची काळजी घेतल्यास अंदाज बऱ्यापैकी खरे ठरतात. पण सॅंपलमधील प्रमाण चुकीचं असेल तर अंदाज उलटण्याची शक्यता असते.
एक्झिट पोल्स विश्वसनीय असतात का?
बीबीसीनं 2014 ते 2018 या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलचा अभ्यास केला.
त्यातून असं लक्षात आलं की, एक्झिट पोलमुळे आपल्याला कोण जिंकणार याचा अंदाज येतो, पण कोणत्या पक्षाच्या किती जागा येतील, हे नेमकेपणे समजू शकत नाही.
याचं उदाहरण म्हणजे 2017च्या गुजरात निवडणुकीत भाजप जिंकेल असं भाकीत एक्झिट पोलनं केलं होतं.
C-Voterनं असं भाकीत केलं होतं की भाजप 111 जागा जिंकेल आणि काँग्रेसच्या 71 जागा येतील. टुडे'ज चाणक्यनं म्हटलं होतं की भाजपला 135 जागा मिळतील आणि काँग्रेसला 47 जागा मिळतील.
65 टक्के जागा या भाजपला मिळतील असा अंदाज बहुतांश एजन्सीजनं बांधला होता. पण जर प्रत्यक्ष निकालावर नजर टाकली तर भाजपच्या अंदाजापेक्षा 10 टक्के जागा कमी झाल्या आहेत. भाजपला या निवडणुकीत 99 जागा मिळाल्या होत्या.
'नेमक्या किती जागा मिळतील हे सांगता येत नाही'
एक्झिट पोलमधून विजेता पक्ष कोण याचा अंदाज बांधता येतो, पण कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळतील हे सांगता येत नाही.
हा फरक कसा राहतो, याचं उत्तर Centre for the Study of Developing Societiesचे संचालक संजय कुमार देतात.
ते सांगतात, "एक्झिट पोलसाठी जो सर्व्हे केला जातो, त्यात कोणत्या पक्षाला किती मतं मिळतील याचा अंदाज घेतला जातो आणि मग त्या मतांच्या टक्केवारीवरून त्या पक्षाच्या किती जागा निवडून येतील, याचा आडाखे बांधला जातो."
उदाहरणार्थ, एखाद्या पक्षाला 25 टक्के मत मिळणार असेल तर त्या आधारावर त्या पक्षाच्या किती जागा निवडून येतील, हे ठरवलं जातं.
"पण कधीकधी एखाद्या पक्षाच्या मतांची टक्केवारी आणि निवडून आलेल्या जागांमध्ये फरक दिसून येतो. खरं तर मतांची टक्केवारी तेवढीच असते, मात्र संबंधित पक्षानं फार कमी फरकानं जागा जिंकलेली किंवा हरलेली असते. यालाच first-past-the-post असं म्हणतात," ते पुढे सांगतात.
Psephologist आणि C-voterचे संस्थापक यशवंत देशमुख यांच्या मते, "कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, हा एक्झिट पोलच्या सर्व्हेचा भाग नसतो. कोणत्या पक्षाला किती मतं मिळतील, एवढं सांगायचं काम फक्त एक्झिट पोल करत असतो."
एक्झिट पोलचे अंदाज किती खरे ठरतात?
एक्झिट पोलचे अंदाज किती खरे ठरतात, याचं उत्तर ज्येष्ठ पत्रकार प्रणय रॉय आणि दोराब सोपारीवाला यांच्या 'The Verdict…Decoding India's Election' या पुस्तकात मिळतं.
या पुस्तकात 1980 ते 2018दरम्यान झालेल्या 833 एक्झिट पोलचे अंदाज देण्यात आलेले आहेत.
त्यात ते लिहितात, "एक्झिट पोल खरे ठरण्याचा अंदाज 84 टक्के इतका आहे."
एक्झिट पोल महत्त्वाचे का?
निकडणुकीचे निकाल सांगणं आणि प्रेक्षकांची उत्सुकता भागवणं इतकंच एक्झिट पोलचं काम नसतं.
यशवंत देशमुख यांच्या मते, "कोणता पक्ष पुढे आणि कोणता मागे, हे सांगणं एक्झिट पोलचं पहिलं काम असतं. दुसरं म्हणजे प्रत्यक्षात निकाल लागल्यानंतर तो निकाल एक्झिट पोलशी कम्पेअर केला जातो, यातून मग डेमोग्राफिक्स कळतं. म्हणजे महिलांनी कुणाला मत दिलं, शेतकरी किंवा तरुणांनी कुणाला मत दिलं.
"कारण निवडणूक आयोग कोण जिंकेल किंवा हारेल, एवढचं सांगतं, पण कुणी कुणाला मत दिलं, हे एक्झिट पोलच सांगू शकतात."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)