You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिहार निवडणूकः चिराग पासवानांचा नितिश कुमारांवर निशाणा पण त्यांच्या खांद्यावरची बंदूक कोणाची?
- Author, सलमान रावी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
जनता दल युनायटेडच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षश्रेष्ठींवर एनडीएतून बाहेर पडून निवडणूक लढवण्यासाठी दबाव वाढवला आहे. लोक जनशक्ती पार्टी एनडीएमधून बाहेर पडल्यावर जदयूमध्येही विचारमंथन सुरू असल्याचं पक्षाचे नेते सांगत आहेत.
लोक जनशक्ती पार्टीची भूमिका पाहाता अशा प्रकारच्या आघाडीमधून निवडणूक लढवणं आपल्या पक्षाच्या हिताचं नाही असं जदयूचे खासदार आणि आमदार ज्येष्ठ नेत्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
भागलपूरचे जदयूचे खासदार अजय मंडल यांनी बीबीसीला सांगितले, लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांची ज्या प्रकारची विधानं प्रसिद्ध होत आहेत त्यातून अनेक प्रकारचे संकेत मिळत आहेत.
ते सांगतात, "हे चिराग पासवान बोलत नसून त्यांच्याकडून हे कोणीतरी बोलवून घेत आहे. जदयू कार्यकर्ते आणि नेत्यांशिवाय सामान्य जनतेलाही याचा अंदाज आला आहे. हे पडद्याआडून कोण करत आहे हे सगळ्यांना समजत आहे. मला कोणाचं नाव घ्यायचं नाहीये."
त्यांनी बिहारमध्ये लोक जनशक्ती पार्टीतर्फे लावण्यात आलेल्या पोस्टर्सचा उल्लेख केला. त्यावर, "मोदी से बैर नहीं, नीतीश तुम्हारी ख़ैर नहीं" असं लिहिलेलं आहे.
ते म्हणतात, "या पोस्टर्सनंतर काही शंका उरते का? आता सर्व काही स्पष्ट दिसत आहे."
जनता दल युनायटेडच्या आणखी एका नेत्यांनी आपलं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं, "असे प्रकार होत राहिले तर आघाडीत काहीच अर्थ राहात नाही. पक्षश्रेष्ठींनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणंच चांगलं."
जदयूबरोबर आघाडी नव्हतीच
लोक जनशक्ती पार्टीचे पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते अजय कुमार यांनी कोणत्याही आघाडीला एक संयुक्त किमान कार्यक्रम असतो असं सांगितलं.
जेव्हा त्यासाठी सर्वसहमती बनली होती तेव्हा भारतीय जनता पार्टी जनता दल युनायटेड आणि लोक जनशक्ती पार्टीची आघाडी होती. सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती आणि बिहारमध्ये सरकारही स्थापन केलं होतं.
ते पुढे सांगतात, "नितिशकुमार अचानक आघाडी सोडून वेगळे झाले. त्यांनी राजद आणि काँग्रेसच्या आघाडीबरोबर सरकार तयार केलं. मग ती आघाडीही मोडली आणि भाजपाबरोबर सरकार तयार केलं. आमच्या पार्टीबाबत बोलायचं झालं तर आमच्या पक्षाची या सरकारबरोबर कोणत्याही मुद्द्यावर अजेंडा ठरला नाही की एखाद्या मुद्द्यावर आम्ही सहमत झालो... त्यामुळे आमच्याबरोबर आघाडी होतीच कुठे? "
लोक जनशक्ती पार्टीनं बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये 143 जागांवर आपले उमेदवार निवडणूक लढतील असं स्पष्ट केलं तर भाजपाने 121 जागांवर लढण्याची घोषणा केली आहे.
लोक जनशक्ती पार्टीचे प्रवक्ते म्हणतात, भाजपाकडूनही चूक झाली आहे. ते म्हणतात, "नितिश कुमार यांच्या आडमुठ्या वागण्याने भाजपाला एकदा ठेच लागली आहे. देशातल्या सर्वांत मोठ्या पक्षाला वाटलं असतं तर ते स्वबळावर लढले असते."
ते म्हणतात आमच्या पक्षानं नितिश कुमार यांना विरोध करणं काही अचानक झालेलं नाही. वेळोवेळी सराकरच्या कामकाजावर आपला पक्ष प्रश्न उपस्थित करत होता. मजुरांचं पलायन असो, पूर असो किंवा कोरोना काळातली व्यवस्था, सर्वच वेळी प्रश्न उपस्थित केले आहेत.
जदयुचे अली अन्वर राज्यसभेत दोन वेळा खासदार होते. आता त्यांनी पक्षाला रामराम केला आहे. पक्षातल्या घडामोडी जवळून पाहाणाऱ्या अन्वर यांच्या मते लोक जनशक्ती पार्टी स्वतंत्र लढल्यामुळे फक्त भाजपालाच फायदा होईल.
भाजपाला व्हायचंय मोठा भाऊ
ते म्हणतात, सध्याच्या स्थितीत नितिश कुमार यांच्या जदयू आणि भाजपात भावाभावाचं नातं आहे. त्यात नितिशकुमार मोठे बंधू आहेत.
ते म्हणतात, "भाजपाकडे साधनं आहेत. त्यांची निवडणुकीची व्यवस्था जदयूपेक्षा चांगली आहे. त्यांच्याकडे केंद्रात मजबूत सरकार आहे. अशा स्थितीत भाजपाला बिहारमध्ये मोठा भाऊ व्हायचं आहे. लोक जनशक्ती पार्टी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे."
बिहार प्रदेश भाजपाच्या मते "लोक जनशक्ती पार्टीच्या भूमिकेमुळे तयार झालेली सध्याची स्थिती फार गंभीर आहे."
पक्षाच्या मतानुसार लोजपा आणि जदयूमध्ये चर्चा व्हावी, मतभेद मिटावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले मात्र त्यांना एकत्र चर्चेला आणता आलं नाही. चिराग पासवान हे सगळं भाजपाच्या इशाऱ्यावर करत असल्याच्या चर्चेला त्यांनी नाकारलं.
ज्या भाजपा नेत्यांशी बीबीसीनं चर्चा केली त्यांच्यामते प्रत्येक राजकीय पक्ष आपला राजकीय लाभ शोधत असते. बिहारमध्ये स्थान बळकट करण्यासाठी चिराग तसा प्रयत्न करत असतील तर त्यात वाईट काही नाही, भाजपाचा त्याच्याशी संबंध नाही.
भारतीय जनता पार्टीच्या बिहार प्रदेशचे महासचिव देवेश कुमार यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की लोजपा आणि जदयू यांच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे लवकरच काही तोडगा निघेल.
न
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)