बिहार निवडणूकः भाजप सर्वांत मोठा पक्ष, नितीश कुमार मुख्यमंत्री होणार का?

बिहार विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत आठ जागांचे निकाल समोर आले आहेत. या आठपैकी भाजप, जेडीयू आणि आरजेडीनं प्रत्येकी 2-2 जागा जिंकल्या आहेत.

काँग्रेस आणि व्हीआयपी पक्षानं प्रत्येकी 1-1 जागा जिंकली आहे.

निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कलांनुसार एनडीए 120 जागांवर आघाडीवर आहे, तर महागठबंधन 106 जागांवर आघाडीवर आहे.

एमआयएमआयएम चार जागांवर तर बहुजन समाज पार्टी दोन जागांवर आघाडीवर आहे.

..तर नितीश कुमारांनी शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत- संजय राऊत

बिहार निवडणुकांचे कल हाती आले असून भाजप-जेडीयूप्रणित एनडीएनं आघाडी घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

संजय राऊत यांनी बिहार निवडणुकीची जबाबदारी खांद्यावर असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. त्याचबरोबर राऊत यांनी तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं.

"संपूर्ण केंद्रीय सत्ता तिथे कामाला लागली होती. मोदींनी 17 ते 18 सभा घेतल्या. तरीही 30 वर्षांचे तेजस्वी यांनी सर्वांना कामाला लावलं," असं संजय राऊत यांनी म्हटलं.

"बिहारमध्ये भाजपाचे नेते नितीश कुमार मुख्यमंत्री होतील असं एका सुरात सांगत आहेत. यासाठी नितीश कुमार यांनी शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत. शब्द फिरवल्यानंतर काय होऊ शकतं हे महाराष्ट्राने दाखवून दिलं आहे. नितीश कुमार मुख्यमंत्री होतील आणि भाजपाला त्यांना करावंच लागेल," असं संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.

ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह

हे कल हाती येत असतानाच काँग्रेसचे नेते उदीत राज यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करणारं ट्वीट केलं आहे. अमेरिकेत जर ईव्हीएम असते तर ट्रंप निवडणूक हारले असते का, असं म्हणत उदीत राज यांनी अप्रत्यक्षपणे ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

राजदला काँग्रेसची मदत नाही?

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाने काँग्रेस आणि डाव्या पक्षांसोबत आघाडी करून महागठबंधनमार्फत निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राजदची कामगिरी चांगली होत असली तरी कांग्रेस त्यांच्या डोक्यावरील बोजा ठरल्याचं दिसून येत आहे.

काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत 70 जागा लढवल्या होत्या. पण ते फक्त 21 ठिकाणी आघाडीवर आहेत.

दुसरीकडे CPI(ML)ने 19 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 14 जागांवर ते आघाडीवर आहेत.

महागठबंधनमध्ये राजदने काँग्रेसला गरजेपेक्षा जास्त जागा सोडल्याचं राजकीय विश्लेषक सांगत होते. पण या जागा निवडून येण्यासारख्या नसल्याने त्यांना सोडण्यात आल्या, असं स्पष्टीकरण राजदने दिलं होतं.

बिहार निवडणुकांचे ताजे निकाल पाहण्यासाठी इथं क्लिक करा

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)