You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

Live, महापालिका निकाल : दुपारपर्यंतचे कल पाहता राज्यात अनेक ठिकाणी भाजपला आघाडी

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी काल, 15 जानेवारीला मतदान पार पडलं. आज, 16 जानेवारीला निकाल जाहीर होईल. राज्याच्या राजधानीत ठाकरे बंधू एकत्र आल्यानं मुंबईकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

थोडक्यात

  • मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निकालांमध्ये दुपारी 12 पर्यंतचे कल आणि निकाल यात भाजप, महायुतीला आघाडी
  • मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना युतीला दुपारपर्यंतचे कल आणि निकाल यामध्ये आघाडी
  • पुण्यामध्ये कल आणि निकाल पाहता भाजप एकहातील सत्ता मिळवण्याची शक्यता, अजित पवारांना मोठा फटका
  • राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये गेलेले प्रशांत जगताप यांचा पुण्यामध्ये विजय

लाईव्ह कव्हरेज

नितीन सुलताने, बीबीसी मराठी प्रतिनिधी

  1. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारसरणीचा विजय - प्रशांत जगताप

    पुण्यातील बहुचर्चित निवडणुकीत काँग्रेसकडून प्रशांत जगताप यांचा विजय झाला. विजयानंतर त्यांनी हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारसरणीचा विजय असल्याचं म्हटलं.

    "इथे माझ्याविरोधात जवळजवळ 4 आमदार आणि 2 माजी राज्यमंत्री लढत होते. त्या सगळ्यांचा पराभव होऊन प्रशांत जगतापचा विजय झाला आहे. हा निश्चित वानवडीमधील जनतेचा माझ्यावरील विश्वास आहे. ज्यांनी मला सोडलं किंवा मला बाजूला करण्याचा प्रयत्न केला त्यांना माझा हाच सल्ला आहे की, या ठिकाणी शिव, शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा कालही जिवंत होती आणि आजही आहे, उद्याही जिवंत राहील.

    प्रशांत जगतापची निष्ठा नक्कीच जिंकली. माझ्या भागातील जनतेबद्दल जी निष्ठा होती तीही जिंकली. पक्ष सोडताना जे जे माझी थट्टा करत होते, विचारधारा समाजात चालत नाही असं म्हणत होते त्यांना माझा सल्ला आहे की, विचारधारा कालही जिवंत होती आणि आजही जिवंत आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारधारा कुणीही पुसू शकत नाही. त्यामुळे सर्वांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा," असं प्रशांत जगताप म्हणाले.

  2. महानगर पालिका निकाल : दुपारी 12 वाजेपर्यंतचे कल आणि निकाल काय सांगतात?

    राज्यातील 29 महानगर पालिकांची मतमोजणी सुरू असून अनेक ठिकाणचे कल आणि निकाल समोर येत आहेत. त्यात वेगवेगळ्या ठिकाणी नेमकी परिस्थिती काय आहे? हे जाणून घेऊयात.

    ठाणे

    एकूण जागा - 131

    भाजप - 12

    शिवसेना - 24

    राष्ट्रवादी - 5

    मनसे -

    काँग्रेस -

    शिवसेना (उबाठा) - 1

    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 5

    एआयएमआयएम - 5

    अपक्ष - 1

    --------------

    नाशिक

    एकूण जागा - 122

    भाजप - 27

    काँग्रेस - 4

    शिवसेना - 11

    शिवसेना(उबाछा) - 2

    राष्ट्रवादी काँग्रेस- 3

    मनसे - 2

    इतर - 4

    ------------

    अकोला

    एकूण जागा - 80

    भाजप - 35

    शिवसेना - 04

    राष्ट्रवादी - 04

    काँग्रेस - 10

    शिवसेना (उबाठा) - 09

    राष्ट्रवादी (शरद पवार) - 4

    इतर - 11

    ------------

    परभणी

    एकूण जागा - 65

    भाजप - 13

    राष्ट्रवादी काँग्रेस - 01

    काँग्रेस- 10

    शिवसेना (उबाठा)- 22

    एआयएमआयएम - 01

    ------------

    कोल्हापूर

    भाजप – 27

    शिवसेना – 9

    राष्ट्रवादी – 2

    काँग्रेस – 23

    शिवसेना (उबाठा)– 0

    राष्ट्रवादी (शरद पवार)–

    जनसुराज्य – 1

    इतर

    ------------

    सांगली, मिरज आणि कुपवाड

    भाजप - 13

    शिवसेना - 01

    राष्ट्रवादी - 04

    शिवसेना UBT - 00

    मनसे - 00

    राष्ट्रवादी SP - 00

    काँग्रेस - 06

    इतर - 00

    ------------

    अमरावती

    एकूण जागा - 87

    भाजप - 09

    शिवसेना - 00

    राष्ट्रवादी काँग्रेस - 06

    काँग्रेस - 09

    शिवसेना (उबाठा) - 01

    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) -

    युवा स्वाभिमान पक्ष - 04

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना -

    एआयएमआयएम - 04

    बसपा - 01

  3. पुणे निकाल : पवार एकत्र येण्याचा कुणाला फायदा? कुणाला तोटा?, शीतल पवार यांचे विश्लेषण

    पुणे महानगर पालिकेच्या दुपारी 12 वाजेपर्यंत आलेल्या निकालांचे नेमके अर्थ काय? याबाबत बीबीसी मराठीच्या प्राची कुलकर्णी यांनी पुणे सकाळच्या संपादक शीतल पवार यांच्याशी चर्चा केली.

    यावेळी निकालाच्या कलांबाबत बोलताना पवार म्हणाल्या की, "पुण्याची निवडणूक भाजपसाठी एकतर्फी वाटत होती. मात्र, निवडणूक जशी पुढे गेली तशी अजित पवार यांचा आवाज वाढताना दिसला. त्यांनी माध्यमांमध्येही जागा व्यापली.

    मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इलेक्टिव्ह मेरिट फार महत्त्वाचं ठरतं. देवेंद्र फडणवीस यांनीही हा शब्द वापरला. मागील निवडणुकीत (2017) भाजपकडे दोन्ही महानगरपालिकांमध्ये सत्ता होती. त्यांचे 100 पेक्षा अधिक नगरसेवक होते. त्या बळावर आधीपासून भाजप आघाडीवर होता.

    शेवटच्या टप्प्यात भाजपनं पुणे शहरात आरोप प्रत्यारोपांना बगल दिली आणि त्यांचं सगळं नरेटिव्ह विकासाकडे शिफ्ट केलं होतं. त्यामुळे पुणे शहराचे निकाल मला अजिबात आश्चर्याचे वाटत नाहीत."

    पिंपरी चिंचवड

    शीतल पवार यांनी पिंपरी चिंचवड मनपाच्या निकालांचंही विश्लेषण केलं.

    “पिंपरी चिंचवडमध्ये अपक्ष निवडून आलेल्या उमेदवारांचा फरक खूप कमी आहे. त्यातील भाजपमधीलच एक बंडखोर नगरसेवक आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षसंघटनेवर पक्षफुटीनंतर झालं नव्हतं. त्यातल्या त्यात अजित पवार एकटे खिंड लढवत होते. मात्र, त्यांच्या पक्षाबाबतही वारंवार बोललं जात होतं की, खालची यंत्रणा कमी पडत होती. त्यांना मुलाखतीत काहींनी हेही विचारलं होतं की, त्यांचे स्थानिक उमेदवार विरोधात बोलत नाहीत.

    स्थानिक निवडणुकीत प्रत्येकाची गणितं असतात. प्रत्येकजण आपला गड राखण्याचा, आपला प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. मात्र अजित पवारांना नरेटिव्हच्या पातळीवर जागा मिळेल याची त्यांना खूप खात्री होती. मात्र, तसं आकड्यांमध्ये दिसत नाही. पुन्हा भाजप आघाडीवर दिसत आहे.

    2017 च्या महापालिका निवडणुकीत सर्वाधिक संख्येने भाजपचे नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे त्यांच्याकडे ताकदीचे उमेदवार नक्कीच होते. शेवटच्या टप्प्यात ज्या पद्धतीने पक्षांतरं करून घेतली गेली, स्थानिक मजबूत इलेक्टिव्ह मेरिट असलेले उमेदवार राष्ट्रवादीकडे फार उरले नव्हते. त्यांच्या स्थानिक नेत्यांनीही संघटना वाढण्यासाठी किंवा ताकदीचे उमेदवार देण्यासाठी फार प्रयत्न केले नाहीत. याउलट भाजपकडे ताकदीचे उमेदवार होते.

    पिंपरी चिंचवडचे राजकारण गावकी-भावकीचे आहे. त्यात उमेदवाराचा संपर्क किती, तो किती शक्तीशाली यावरही हे राजकारण अवलंबून असतं. त्यामुळे हे कल इलेक्टिव्ह मेरिटकडे जाणारे आहेत.

    लोकसभा किंवा विधानसभेला हिंदुत्वासारखं 'ब्रॉड कार्पेट नरेटिव्ह' आणलं जातं आणि त्याचा परिणाम होताना आपण बघतो. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असं होतं नाही. या निवडणुकांमध्ये स्थानिक उमेदवारांच्या ताकदीवर खूप काही अवलंबून असतं. या ताकदीत स्थानिक वोटबँक, आर्थिक क्षमता या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. भाजपनं जिंकण्यासाठी जे जे करावं लागतं ते केलं आणि आज विजयाचं पारडं त्यांच्याकडे आहे,” असं त्या म्हणाल्या.

  4. जालन्यात रावसाहेब दानवेंचे भाऊ आणि वहिनी विजयी, असे आहेत UPDATES

    राज्यातील महानगर पालिका निवडणुकीचे निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे. दुपारी 12 पर्यंत हाती आलेल्या निकालांपैकी काही प्रमुख निकाल खालीलप्रमाणे.

    - मुंबईत शिंदे गटाच्या उमेदवार रेखा यादव वार्ड 1 मधून विजयी. दहिसर वार्ड क्रमांक 1 मध्ये शिंदेंच्या उमेदवार रेखा यादव विरुद्ध ठाकरे गटाच्या उमेदवार फोरम परमार असा सामना होता.

    - मुंबई प्रभाग 182 मधून मिलिंद वैद्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विजयी. तर प्रभाग क्रमांक 183 मधून काँग्रेसच्या आशा काळे विजयी.

    - मुंबईत राहुल शेवाळे यांना धक्का. वहिनी वैशाली शेवाळे पराभूत.

    - ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने खाते उघडले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग १० मधील नजीब मुल्ला, पूनम माळी, वहिदा खान, सुहास देसाई मोठ्या मताधिक्याने विजयी. नजीब मुल्ला हे प्रदेश सरचिटणीस आणि जिल्हा अध्यक्ष आहेत

    - जालन्यात भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे आणि त्यांच्या पत्नी सुशीला भास्कर दानवे प्रभाग क्रमांक 1 मधून विजयी. प्रभाग 1 मधील भाजपचे पाचही उमेदवार विजयी.

  5. ठाणे महानगर पालिका

    ठाणे महानगर पालिकेत सकाळी 11.30 पर्यंतचे कल पाहता महायुतीला आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना 14 तर भाजप 10 ठिकाणी आघाडीवर आहे. तर शिवसेना उबाठा गटाला 3 जागी आघाडी आहे.

  6. मुंबई मनपा निवडणूक : तेजस्वी घोसाळकर, नवनाथ बन यांचा विजय

    मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत निकाल समोर यायला सुरुवात झाली आहे. दहिसर वार्ड क्रमांक 2 मधून भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या आहेत. तसंच नवनाथ बन यांचाही मानखुर्द वार्ड क्रमांक 135 मधून विजय झाला आहे.

    मुंबईच्या वार्ड क्रमांक 183 मधून काँग्रेसच्या आशा काळे विजय झाल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे.

    कुर्ला पश्चिमच्या वार्ड क्रमांक 165 मधून काँग्रेसचे अश्रफ आझमी विजयी झाले आहेत.

    तर नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांचा पराभव झाला आहे.

  7. महानगरपालिका निवडणूक निकाल

  8. छत्रपती संभाजीनगर : मतमोजणी केंद्राबाहेर गोंधळ, पोलिसांचा लाठीचार्ज; माजी महापौर जखमी

    राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. मतमोजणीला सुरुवात होण्याआधी अनेक ठिकाणी कार्यकर्ते केंद्रांबाहेर गर्दी करत असल्याचं पाहायला मिळालं.

    छत्रपती संभाजीनगरमध्येही शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील मतमोजणी केंद्रावर उमेदवारांच्या प्रतिनिधींना आत सोडत असताना गोंधळ झाला.

    त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला आहे. यात माजी महापौर विकास जैन जखमी झाल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.

    या प्रकरणी संबंधित पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी शिंदेसेनेच्या उमेदवार हर्षदा शिरसाट यांनी केली आहे.

  9. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीत अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास ‘पाडू’ (Printing Auxiliary Display Unit) या यंत्राचा वापर करून निकाल बघण्याची सुविधा उपलब्ध आहे.

    मात्र पाडूचा वापर सरसकट केला जाणार नाही. तांत्रिक अडचणीच्या प्रसंगी अत्यंत अपवादा‍त्मकरीत्या त्याचा वापर केला जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

    भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची मतदान यंत्रे केवळ बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीच वापरली जात आहेत. ही यंत्रे भारत निवडणूक आयोगाची असून ती ‘एम3ए’ या प्रकाराची आहेत.

    त्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी कंट्रोल युनिटला (सीयू) बॅलेट युनिट (बीयू) जोडूनच करावी, फक्त तांत्रिक अडचण आली तरच अत्यंत अपवादा‍त्मकरीत्या पाडूचा वापर करावा, असे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आहेत.

    बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी 140 पाडूंची उपलब्धता करून देण्यात आली आहे. अत्यंत अपवादा‍त्मक परिस्थितीत मतमोजणीसाठी पाडूची गरज भासल्यास बेल कंपन्याच्या तंत्रज्ञांच्या उपस्थितीत त्याचा वापर करावा.

    त्याचबरोबर पाडूच्या वापराबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना या यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रात्यक्षिक दाखविले आहे.

  10. मुंबईत निकालाआधीच भाजपची जल्लोषाची तयारी, तर पुण्यात महापौरांच्या नावाचे पोस्टर

    गुरुवारी (15 जानेवारी) झालेल्या मतदानानंतर शुक्रवारी मतमोजणी होत आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असली तरी त्याआधीच भाजपनं काही ठिकाणी जल्लोषाची तयारी केल्याचं पाहायला मिळालं.

    भाजपनं निकालाच्या आधीच मुंबईत जल्लोषाची तयारी केल्याचं पाहायला मिळालं आहे. भाजपच्या नरिमन पॉइंट या ठिकाणी भाजपनं जल्लोषाची तयारी केल्याचं दिसून आलं.

    पुण्यात पोस्टरबाजी

    पुण्यामध्येही निकालाच्या आधीच पोस्टरबाजी झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपकडून विजयी उमेदवारांचे पोस्टर लावण्यात आलेले पाहायला मिळाले.

    तसंच भाजप उमेदवार गणेश बीडकर यांच्या नावासमोर महापौर लिहत होर्डिंग लावण्यात आले.

    तसंच नुकतेच भाजप मध्ये गेलेले सचिन दोडके यांच्याही नावासमोर भावी आमदार लिहीत पोस्टरबाजी करण्यात आली.

  11. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत 59.82 टक्के

    छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत 59.82 टक्के मतदान पार पडले. एकूण 11 लाख 18 हजार 284 मतदारांपैकी 6 लाख 69 हजार 1 मतदारांनी मतदान केले.

    ठाणे महानगर पालिका

    ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी गुरूवारी (15 जानेवारी) झालेल्या मतदानाच्या प्राप्त आकडेवारीनुसार एकूण 55.59 टक्के मतदान झाल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली.

    ठाणे महानगरपालिकेच्या एकूण 33 प्रभागांमध्ये एकूण 2013 मतदान केंद्रावर गुरूवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या 33 प्रभागांमध्ये 8 लाख 63 हजार 879 पुरूष, 7 लाख 85 हजार 831 महिला आणि 159 इतर असे एकूण 16 लाख 49 हजार 869 मतदार होते.

    त्यापैकी 4 लाख 83 हजार 698 पुरूष, 4 लाख 33 हजार 385 स्त्री आणि 40 इतर असे एकूण 9 लाख 17 हजार 123 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

  12. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेसाठी 52.94 टक्के मतदान, मतमोजणीसाठी 23 कक्षात प्रक्रिया सुरू

    बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी गुरुवारी (15 जानेवारी) झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी समोर आली आहे. महानगरपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार एकूण 52.94 टक्के मतदारांनी याठिकाणी मतदानाचा हक्क बजावला आहे.

    बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अंतर्गत 15 जानेवारीला झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया आज (16 जानेवारी) सकाळी 10 वाजल्यापासून विविध ठिकाणच्‍या 23 मतमोजणी कक्षात होणार आहे.

    महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण 227 निवडणूक प्रभागांकरता एकूण 23 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी प्रक्रियेकरिता प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय अंतर्गत अभिरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम) व मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

    मतमोजणीसाठी 759 पर्यवेक्षक आणि 770 सहायक यांच्‍यासह 770 अन्य सहकारी कर्मचारी यांची नियुक्त करण्यात आली आहे. मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांना पूर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतमोजणी केंद्र परिसरात वाहतूक नियंत्रण, वाहनतळ व्यवस्था तसेच प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत.

    निकाल जाहीर करताना अचूकता व पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी अधिकृत प्रतिनिधी, उमेदवार, तसेच माध्‍यम प्रतिनिधींनी वेळेत उपस्थित राहावे. मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक विभागाने ज्या व्यक्तींना ओळखपत्र दिले आहे, अशा पात्र व्यक्तींनाच मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती आयोगाने दिली.

  13. पुण्यात 52.42 टक्के मतदान, तर नागपूरमध्ये 51 टक्के

    पुण्यात एकूण मतदान 52.42 टक्के झालं. गेल्या वेळी साधारण 55 टक्के झालं होतं. सर्वात कमी मतदान औंध, बोपोडी येथे झालं. सर्वाधिक मतदान शिवणे प्रभागात झालं. नागपूर महानगरपालिका निवडणुकीत सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत जवळपास 51 टक्के मतदान झालं. मागील निवडणुकीत (2017) हेच मतदान 53 टक्के झालं होतं.

    पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी (15 जानेवारी) 4 हजार 11 मतदान केंद्रांवर मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता अतिशय शांततामय वातावरणात मतदान पार पडले, अशी माहिती निवडणूक कार्यालयाने दिली.

    पुण्यात सकाळी 10 वाजल्यापासून 15 निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून सुनिश्चित करण्यात आलेल्या 15 ठिकाणी मतमोजणी होणार आहे.

    दरम्यान, महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली होती. मुंबई महानगरपालिकेसाठी 11 हजार 349 कंट्रोल युनिट आणि 22 हजार 698 बॅलेट युनिटची व्यवस्था केली होती. मुंबई वगळता अन्य सर्व 28 महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने झाली. बृहन्मुंबई महानगरपालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यावयाचा होता. त्यामुळे प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावे लागले. इतर 28 महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणत: चार जागा होत्या. काही महानगरपालिकांच्या प्रभागांत तीन किंवा पाच जागाही होत्या.

  14. ‘शाई’वरून आरोप-प्रत्यारोप,

    15 जानेवारी रोजी राज्यातल्या 29 महानगर पालिकांसाठी मतदान झालं. या मतदान सर्वाधिक चर्चेत आला तो मुद्दा म्हणजे शाईचा. मतदान झाल्यावर बोटावर लावली जाणारी शाई लगेच पुसली जात आहे, अशी तक्रार अनेकांनी केली. यावरुन आरोप प्रत्यारोपदेखील झाले.

    मतदानानंतर राज्यातील विविध राजकीय पक्षासह मतदारांनीही मार्करच्या ‘शाई’वरुन प्रश्न उपस्थित केले.

    मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

    राज ठाकरे म्हणाले की, "यापूर्वी बोटाला शाई लावली जायची. पण आता त्यांनी पेन आणला आहे. या पेनबाबत सगळीकडून तक्रारी येत आहेत. मतदान करून बाहेर पडल्यानंतर त्या शाईवर सॅनिटाझर लावल्यानंतर ती शाई जाते. शाई पुसा, परत जा आणि पुन्हा मतदान करा, असा प्रकार सुरू आहे."

    दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा आरोप नाकारला असून निकालानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी विरोधक करत असल्याचं फडणवीस म्हणाले.

    मार्करच्या शाईवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच निवडणूक आयोगानेदेखील यावर आपली बाजू मांडली.

    राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं.

    ते म्हणाले, "महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी ज्या मार्कर पेनची जी शाई वापरण्यात आली, त्याबाबत बराच संभ्रम पसरवला जातो आहे. त्याबाबत माझं सांगणं असं आहे की, ही शाई जी आहे, ती इंडेलिबल इंक आहे. भारत निवडणूक आयोग जी इंडेलिबल इंक वापरतो, तीच ही इंक आहे. मात्र, ती मार्कर पेनच्या स्वरुपात आहे. असे मार्कर पेन 2011 पासून वापरात आहेत. ही शाई पुसली जात नाही. शाई लावल्यानंतर बारा ते पंधरा सेकंदांनंतर ती ड्राय होते. या शाईविषयी कुठल्याही प्रकारची शंका उत्पन्न करणे, तसे व्हीडिओ बाहेर प्रसारित करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय."

    एकंदरीत कालचा दिवस 'शाई' आणि 'शाही' प्रकरणावरून गाजला, यावर विविध मीम्सदेखील व्हायरल झाले.

  15. नमस्कार

    बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजवर आपले स्वागत आहे. आज महानगर पालिका निवडणुकांचे निकाल आहेत. या पेजवर तुम्हाला निवडणुकीसंबंधी सर्व अपडेट, विश्लेषण पाहायला आणि वाचायला मिळतील.

    मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले. नऊ वर्षांनी होणारी ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची ठरली.

    थोड्याच वेळात आता मतमोजणीला सुरुवात होईल आणि कोणत्या महानगर पालिकेवर कुणाची सत्ता राहील हे आपल्याला समजेल.

    धन्यवाद.