उद्धव ठाकरे: केंद्र सरकारकडून महाराष्ट्राच्या हक्काचे 38 हजार कोटी येणं बाकी

उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.

त्यानंतर जनतेला संबोधित करताना त्यांनी 10 हजार कोटी रुपयांचं पॅकेज शेतीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी जाहीर केलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे-

1. महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून अनेकदा अतिवृष्टी झाली होती.

2. सरकारनं आतापर्यंत 30 हजार 800 कोटी रुपये विविध कारणांसाठी शेतकऱ्यांना दिले आहेत, यामध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा समावेश आहे.

3. निसर्ग चक्रीवादाळासाठी 1,065 कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे केली आहे, पण अद्याप पैसे आले नाहीत. पूर्व विदर्भात पूर आला त्यावेळचे 800 कोटी रुपये केंद्राकडे थकित आहे, एकूण 38 हजार कोटी केंद्राकडून येणं बाकी आहे.

4. केंद्राकडून आताच्या शेती नुकसान पाहणीसाठी पथक आलेलं नाही. आम्ही तीनदा मागणी करूनही पथकं आलेलं नाहीये.

5. शेतीमुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकार 10 हजार कोटी रुपये जाहीर करत आहोत. दिवाळीपर्यंत ही मदत पोहोचवण्यात येईल.

6. केंद्र सरकार नुकसान भरपाई म्हणून जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी 6,800 प्रती हेक्टर देतं, आम्ही 10 हजार रुपये प्रती हेक्टर 2 हेक्टरपर्यंत देण्याचं मान्य केलं आहे. फळपिकांसाठी केंद्र सरकार 18,000 मदत देतं ती 25,000 प्रतीहेक्टर आम्ही जाहीर करत आहोत.

विरोधकांची टीका

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या पॅकेजवर टीका केली आहे.

त्यांनी म्हटलं, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द फिरवत आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे आहे. बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना, त्यांनी निव्वळ बहाणे शोधले. शेतकर्‍यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे.

"यापूर्वी 25,000 आणि 50,000 रूपये हेक्टरी मदतीची मागणी त्यांनीच केली होती. फळबागांसाठी तर एक लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. पण, आता ती मदत द्यायची नाही, म्हणून केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करीत आहेत."

स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही ही मदत अपुरी असल्याचं म्हटलं आहे.

त्यांनी म्हटलं, "अतिवृष्टीसाठी राज्य सरकारने 10 हजार कोटींची मदत जाहीर केली याचे स्वागतच .पण ही मदत अपुरी आहे एवढ्याने शेतकऱ्यांचे समाधान होणार नाही. राज्य सरकारने आता केंद्राकडे अधिक मदतीसाठी पाठपुरावा करावा व राज्यातील विरोधी पक्षाने त्यासाठी पुढाकार घ्यावा."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)