गुप्तेश्वर पांडे यांचा नितीश कुमार यांच्या जेडीयूत प्रवेश

बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी जेडीयू अर्थात जनता दल युनायटेड पक्षात प्रवेश केला आहे.

त्यांनी म्हटलं, "मला मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बोलावलं होतं आणि पक्ष प्रवेश करण्यासाठी विचारणा केली होती. पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती मी पार पाडायला तयार आहे. मला राजकारण समजत नाही. मी एक साधा माणूस आहे, ज्यानं त्याचं आयुष्य तळागाळातल्या लोकांसाठी काम करण्यात घालवलं आहे.

वृत्तसंस्था ANIनं ही बातमी दिली आहे."

सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून चर्चेत आलेले बिहारचे पोलीस महासंचालक (DGP) गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. राज्य सरकारने त्यांचा राजीनामा स्वीकारला असून होमगार्डचे महासंचालक एस. के. सिंघल यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.

बिहारमध्ये नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरच गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली असून ते निवडणूक लढवणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाने पांडे यांना निवडणुकीचं तिकीट देण्याचं आश्वासन दिलं आहे, अशीही चर्चा आहे.

गुप्तेश्वर पांडे पोलीस महासंचालक पदावर असताना राजकीय वक्तव्य करण्यावरून चर्चेत राहायचे.

गेल्या काही दिवसांत त्यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं होतं. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी त्यांची काही वक्तव्य वादग्रस्त ठरली होती.

या संपूर्ण प्रकरणात त्यांनी मुंबई पोलिसांवर सडकून टीका केली होती. अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेवरूनही ते वादात अडकले होते.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीका करण्याची रिया चक्रवर्तीची 'लायकी' नाही, असं गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं होतं.

2009 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीही पांडे यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता. पण त्यांना बक्सर मतदारसंघाचं तिकीट मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी आपला अर्ज मागे घेतला होता.

गुप्तेश्वर पांडे हे 1987 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. बिहारच्या नितीश कुमार सरकारने 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली होती. 22 सप्टेंबर हा दिवस त्यांचा या पदावरचा शेवटचा दिवस ठरला.

गुप्तेश्वर पांडे यांचं मूळ गाव बिहारच्या बक्सर जिल्ह्यातच आहे. त्यांनी पटना युनिव्हर्सिटीमधून संस्कृत विषयात पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. UPSC परीक्षेसाठीसुद्धा त्यांनी संस्कृत विषयच निवडला होता.

पहिल्या प्रयत्नातच ते UPSC परीक्षा पास झाले. त्यावेळी त्यांची आयकर अधिकारी पदावर नियुक्ती झाली. तर दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी IPS पद मिळवण्यात यश मिळवलं.

पांडे यांनी आतापर्यंत नक्षलप्रभावित औरंगाबाद, जहानाबाद, अरवल, बेगूसराय आणि नालंदा या जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलं. त्यानंतर ते मुंगेर आणि मुजफ्फरपूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक बनले होते.

नवरूणा अपहरण प्रकरण आणि सीबीआय चौकशी

2014 मध्ये गुप्तेश्वर पांडे आणि बिहार पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांची सीबीआय चौकशी झाली होती. 2012 ला मुजफ्फरपूरमधून 12 वर्षांच्या नवरूणा चक्रवर्ती हिचं अपहरण झालं होतं. या प्रकरणात ही चौकशी करण्यात आली होती.

त्यावेळी गुप्तेश्वर पांडे मुजफ्फरपूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक होते. नवरूणा चक्रवर्ती त्यावेळी आठवीमध्ये शिकत होती. घरावर कब्जा हवा असल्याने भू-माफियांनी नवरूणा हिचं अपहरण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता.

नवरूणा बेपत्ता झाल्यानंतर एका महिन्याने घराजवळच एका नाल्यात एक हाडांचा सांगाडा सापडला होता. डीएनए चाचणीत हा सांगाडा नवरूणाचा असल्याचं समोर आलं होतं. पण कुटुंबीयांनी आपली मुलगी परतण्याची आशा सोडली नाही. हे प्रकरण अजूनही बंद झालं नसून सीबीआय पाच वर्षांपासून याचा तपास करत आहे.

गुप्तेश्वर पांडे बिहारचे पोलीस महासंचालक झाल्यानंतर नवरूणाचे वडील अतुल्य चक्रवर्ती यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती.

"मी माझ्या मुलीच्या अपहरण प्रकरणात गुप्तेश्वर पांडे यांना आरोपी बनवलं होतं. आता तेच बिहारचे महासंचालक झाले आहेत. आता आमच्या सगळ्या आशा संपल्या आहेत," असं ते त्यावेळी म्हणाले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)