You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या: CBI ची टीम मुंबईत दाखल, तपास सुरू
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठीसाठी
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी CBI ची टीम मुंबईत दाखल झाली असून, तपासही सुरू करण्यात आला आहे.
मुंबईतील सांताक्रुझ येथे सीबीआयच्या टीमनं शुक्रवारी (21 ऑगस्ट) सकाळी बैठक घेतली, अशी माहिती ANI वृत्तसंस्थेनं दिली.
या बैठकीनंतर सीबीआयच्या टीमनं एका अज्ञात व्यक्तीला गाडीत बसवून, चौकशीसाठी गेस्टहाऊसवर नेलं.
तर सीबीआयच्या दुसऱ्या टीमनं वांद्रे पोलीस ठाण्यात जाऊन मुंबई पोलिसांनी आधी केलेल्या तपासाची माहिती घेतली.
सुशांतनं वांद्रे येथील ज्या इमारतीत आत्महत्या केली, त्या इमारतीतील खोलीतही सीबीआयची टीम जाणार आहे.
19 ऑगस्टलाच सुप्रीम कोर्टानं सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपण्यास सांगितले. या प्रकरणाचा तपास आधी मुंबई पोलीस करत होते.
'सुशांत सिंह प्रकरण CBIकडे, पण टार्गेट मात्र आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे'
सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयला सुपूर्द केलीय. एकीकडे सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महाराष्ट्र सरकारसाठी मोठा धक्का मानला जातोय. तर, दुसरीकडे सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीमुळे राज्याच्या राजकारणाकही वादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार, बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी म्हणजे येत्या काळात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे भाजपच्या टार्गेटवर असतील.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत बीबीसीशी बोलताना ज्येष्ट राजकीय विश्लेषक निखिल वागळे म्हणाले, "सुशांत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय अपेक्षित होता. मात्र, यामुळे खरे प्रश्न सुटणार नाहीत. सीबीआयचा चौकशीचा रेकॉर्ड संशयास्पद आहे. CBI नेहमीच राजकीय दबावाखाली काम करते. त्यामुळे सुशांत प्रकरणी सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना टार्गेट करण्याचं काम केलं जाईल."
युवासेना अध्यक्ष आणि मंत्री आदित्य ठाकरे नाव सुशांत आत्महत्या प्रकरणी थेट कोणीच घेतलेवं नाही. शिवसेनेचे कट्टर विरोधक आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेता सुशांत प्रकरणी आरोप केले होते.
राणेंसोबत अनेक नेत्यांनी नाव न घेता आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्ष आरोप केले. त्यानंतर आदित्य ठाकरेंनीही सुशांत प्रकरणी काहीही संबंध नसल्याचा खुलासा केला होता.
सीबीआय चौकशीचा आदित्य ठाकरेवर काय परिणाम होईल. या प्रश्नावर बोलताना निखिल वागळे पुढे म्हणाले, "आदित्य ठाकरेंचा या प्रकरणात रोल अजूनही समोर आलेला नाही. पण, येत्या काळात त्यांनाही सीबीआय चौकशीसाठी तयार रहावं लागेल. बॉलीवूडच्या लोकांची चांगले संबंध हा काही गुन्हा नाही. पण, सुशांतच्या मुद्यावर भाजप उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल असा संशय मला आहे."
आतापर्यंत काय काय घडलंय?
14 जूनला अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वांद्र्यातील आपल्या रहात्या घरी आत्महत्या केली.
27 जुलैला राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली.
पार्थ पवार यांच्या मागणीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नातव्याच्या बोलण्याचा किंमत नाही, ते अपरिपक्व आहेत, अशी टिका केली.
30 जुलै - भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करून सीबीआय चौकशीची मागणी केली.
31 जुलै- भाजपचे आमदार अतुल भातळखकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून सुशांत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. महाविकास आघाडीतील एका तरुण मंत्र्याच्या या प्रकरणात सहभाग असल्याचा त्यांनी आरोप केला.
4 ऑगस्ट- उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे आणि राज्याचे वाहतूक मंत्री अनिल परब यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नसल्याचं विधान केलं. सुशांत प्रकरणी ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा डाव असल्याचं परब यांनी म्हंटलं होतं.
9 ऑगस्ट- शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनामध्ये या प्रकरणाचा स्क्रिन-प्ले आधीच लिहिण्यात आला होता, असं वाटतंय असं विधान केलं होतं.
18 ऑगस्ट- महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनीही सीबीआय चौकशी करण्यास हरकत नाही, असं वक्तव्य केलं.
'ठाकरे पितापुत्र टार्गेट'
सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचा राज्याच्या राजकारणावर काही परिणाम होईल का? याबाबत बीबीसीने ज्येष्ठ पत्रकार संजय जोग यांचं मत जाणून घेतलं.
ते म्हणाले, "सुशांत सिंह राजपूतच्या सीबीआय चौकशीचा थेट असा राज्याच्या राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही. पण, बिहार निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर भाजपला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्याचा एक मुद्दा मिळाला आहे. भाजप या मुद्द्याचा फायदा करून घेत उद्धव आणि आदित्य ठाकरेंना कोंडित पकडण्याचा प्रयत्न करेल."
"महाराष्ट्र निवडणुकीदरम्यान शिवसेना-भाजपचे फाटलेले संबंध. निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी भाजपला सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय. यामुळे भाजप नेते दुखावले होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत काही प्रमाणात असणारी गैर-मराठी वोटबॅंक हासुद्ध मुद्दा आहे. शिवसेनेकडे ही वोटबॅंक नाही. त्यामुळे याचा फायदा भाजप नक्की उचलण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे भाजपचा संपूर्ण प्लॅन यापुढे ठाकरेंना टार्गेट करण्याचा असेल," असं संजय जोग पुढे म्हणाले.
संजय जोग यांच्या सांगण्यानुसार, बिहार निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचं नाव प्रभारी म्हणून पुढे येत आहे. त्यांना या निवडणुकीत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे आता त्या नजरेतूनही पाहाणं महत्त्वाचं आहे.
दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर "अब बेबी पेंग्विन तो गियो, इट्स शो टाईम," असं ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)