जनता कर्फ्यू LIVE : 31 मार्चपर्यंत पॅसेंजर गाड्या रद्द करण्याचा रेल्वेचा निर्णय

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय रेल्वेनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेनं 31 मार्चपर्यंत सर्व पॅसेंजर गाड्या रद्द केल्या आहेत.

ANI या वृत्तसंस्थेनं ही बातमी दिली आहे.

जनता कर्फ्यूमध्ये फिरताना पोलिसांचा 'प्रसाद'

जनता कर्फ्यूमध्ये फिरत असलेल्या एका व्यक्तीला पोलिसांचा चोप खावा लागला. नवी मुंबईतल्या उलवे इथं ही घटना घडली.

संबंधित व्यक्ती फिरत असताना पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर त्यांच्यात काही संभाषण झालं आणि मग पोलिसांनी या व्यक्तीला काठीचा प्रसाद दिला.

एकीकडे नवी मुंबईत पोलिसांनी एका व्यक्तीला चोप दिला आहे, तर दुसरीकडे जे लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत, त्यांना घरी परत पाठवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अनोखा उपक्रम सुरू केला आहे.

दिल्ली पोलिस अशा लोकांना गुलाबाचं फूल देऊन घरी परतण्याची विनंती करत आहेत.

12.04 वाजता- भारतातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 341

इंडियन मेडिकल रिसर्च असोसिएशननं दिलेल्या माहितीनुसार भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 341 झाली आहे.

रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे दहा नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये सहा जण मुंबईचे आहेत तर चार जण पुण्याचे आहेत.

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 74 झाली आहे.

बिहारमध्ये दोन नवीन प्रकरणं समोर आली असून कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

11:40 वाजता- बिहारमध्ये कोरोनाचा पहिला बळी

बिहारची राजधानी पटनामधल्या एम्स रुग्णालयात कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. स्थानिक पत्रकार नीरज सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार हा रुग्ण मुंगेरचा रहिवासी होता.

काही दिवसांपूर्वीच तो कतारहून परतला होता. या व्यक्तीचा मृत्यू शनिवारी (21 मार्च) सकाळी नऊ वाजता झाला होता. त्यानंतर संबंधित व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला. या व्यक्तीचा मृत्यू किडनी फेल झाल्यामुळे झाला होता.

भारतात आता कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 6 झाली आहे.

11: 21 वाजता- पंजाबमध्ये पूर्ण लॉक डाऊन

कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंजाब सरकारनं लॉक डाऊन घोषित केला आहे.

कोरोनामुळे भारतात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

10.52 वाजता- इटलीहून 263 विद्यार्थ्यांना भारतात आणलं

भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 324 झालीये.

दरम्यान, इटलीच्या रोममधून आज 263 विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यात आलंय.

एअर इंडियाच्या एका विशेष विमानामधून या विद्यार्थ्यांना रविवारी (22 मार्च) भारतात आणण्यात आलं. या सर्वांना थर्मल स्क्रीनिंग आणि इमिग्रेशननंतर दिल्लीतल्या ITBP छावला क्वारिंटाइन गृहात नेण्यात येईल.

इटलीला कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका बसला आहे. आतापर्यंत या देशात कोरोनामुळे 4825 लोकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (21 मार्च) एका दिवसात इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 800 वर पोहोचला होता.

पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनता कर्फ्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर देशभरात आज सकाळी सात वाजल्यापासून जनता कर्फ्यू लागू झाला आहे.

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांचा देशातला आकडा 300 हून अधिक झाला आहे. या पार्श्वभूमीवर लोकांनी गर्दी टाळावी, सोशल डिस्टन्सिंगबद्दल जागरुक व्हावं यादृष्टिनं पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं.

19 मार्चला पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात लोकांनी घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलं होतं.

दरम्यान, जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर रविवारी देशातील 3700 रेल्वे रद्द करण्याचं रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

शनिवारी रात्री 12 वाजेपासून रविवारी रात्री 10 वाजेपर्यंत देशातल्या कोणत्याही रेल्वे स्थानकावरून कोणतीही रेल्वे सुटणार नाही, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.

आधीच प्रवासात असलेल्या रेल्वेगाड्यांना थांबवण्यात येईल आणि प्रवाशांना प्रवासी कक्षात ठेवण्यात येईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

गो एअर, इंडिगो, विस्तारासारख्या विमान कंपन्यांनी रविवारी आपली देशांतर्गत उड्डाणांची संख्या मर्यादित ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

देशभरात कसा आहे प्रतिसाद?

देशातील वेगवेगळ्या शहरांतून जनता कर्फ्यूचे फोटो समोर येत आहेत. एरवी गर्दीनं गजबजलेल्या दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरूसारखी शहरातही सामसूम दिसत आहेत. या शहरातले रस्ते, बस स्थानकं, मेट्रो स्टेशन्स ओस पडले आहेत.

मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर शुकशुकाट होता. 22 मार्चला रात्री दहावाजेपर्यंत सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

मेट्रो आणि बस सेवा बंद

दिल्ली सरकार आणि दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं रविवारी आपल्या सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं, "दिल्लीमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 26 झाली आहे. एका व्यक्तीचा मृत्यूही झाला आहे. दिल्लीतील चार प्रकरणं ही एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला झालेल्या संसर्गाची आहेत."

"पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. त्यानुसार कोणतीही ट्रेन किंवा मेट्रो चालविली जाणार नाही. ऑटो आणि टॅक्सीही रस्त्यावर उतरणार नाहीत. रविवारी केवळ 50 टक्के बसेसचा धावतील."

महाराष्ट्रातही मेट्रो सेवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकलही बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्येही मेट्रो बंद राहील. तामिळनाडू सरकारनेही बस आणि मेट्रो सेवा रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

19 मार्चला देशातील जनतेला कर्फ्यू पाळण्याचं आवाहन करताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं, की 22 मार्चच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता सायरनचा आवाज होईल तेव्हा आपण दारात, खिडकीत, बाल्कनीत उभे राहून सरकारी कर्मचाऱ्यांचे, डॉक्टरांचे आभार मानूया. टाळ्या वाजवून, घंटा वाजून आभार मानूया. जनतेनी सरकारी कर्मचाऱ्यांविषयी आदराची भावना ठेऊन यात सहभाग घ्यावा," असंही मोदी म्हणाले.

मेडिकल स्टोअर्स राहणार सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन केलं होतं.

त्यामुळे दिल्लीसह देशातील सर्व मोठ्या शहरातील व्यापार संघटनांनी एक दिवस बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात, यामधून मेडिकल स्टोअर्स आणि जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकांनांचा अपवाद करण्यात आला आहे.

पर्यटन स्थळं राहणार बंद

पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वेनं 22 मार्चला सर्व संग्रहालयं, हेरिटेज गॅलरी आणि हेरिटेज पार्क बंद ठेवणार असल्याचं जाहीर केलं आहे.

अनेक पूजा स्थळं, शॉपिंग मॉल आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची पर्यटनस्थळंही पूर्णपणे बंद राहणार आहेत.

जिथे लोक गर्दी करू शकतात अशी ठिकाणं म्हणजेच शॉपिंग मॉल्स, थिएटर, जिमही बंद ठेवण्यात येणार आहेत.

'टाळ्या वाजवून लोकांना मदत मिळणार नाही'

पंतप्रधानांच्या टाळ्या, थाळ्या वाजवण्याच्या आवाहनावर काँग्रेस नेते राहुल गांधींनी टीका केली आहे.

राहुल गांधींनी ट्वीट करून म्हटलं आहे, की कोरोना व्हायरसमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर संकट कोसळलं आहे. मजुरांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. नुसती टाळी वाजवल्यामुळे त्यांना मदत मिळणार नाही. आजघडीला त्यांना रोख मदत, टॅक्समध्ये सूट यांसारख्य मोठ्या पॅकेजेसची गरज आहे.

अर्थात, अनेकांनी पंतप्रधानांच्या या घोषणेचं स्वागतही केलं आहे.

खासदार शशी थरूर, ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता, अभिनेता अजय देवगन, अक्षय कुमार, देवेंद्र फडणवीस यांनी जनता कर्फ्यूवर ट्वीट केलं आहे.

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. "हा कठीण काळ आहे. आणखी काही उपाय योजनांची गरज असल्याचं थरूर म्हणाले. सोशल डिस्टंन्सिंगची आपल्याला गरज आहे तसेच आर्थिक स्तरावर काही उपाय योजना करणं आवश्यक आहे," असं थरूर म्हणाले.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून म्हटलं आहे, "नरेंद्र मोदी यांनी संकल्प आणि संयमचा संदेश दिला आहे. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी आपण सज्ज होऊ."

ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता म्हणतात की, "हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. जर भविष्यात पूर्ण लॉकडाउन करण्याची वेळ आली तर त्याची ही रंगीत तालीम असू शकते."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)