You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अजित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर दाखल
दिवसभरांच्या राजकीय घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शरद पवार यांच्या मुंबईमधील निवासस्थानी पोहोचले आहेत.
महाविकास आघाडीच्या बैठकीत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं, की अजित पवार यांची उपस्थिती नाही, हे आज खटकते आहे. ही आघाडी मजबूत करण्यासाठी त्यांची गरज आहे. माझी विनंती आहे की सगळ्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी अजित दादांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत आणण्याची जबाबदारी घ्यावी, असं मत छगन भुजबळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना पुन्हा स्वीकारणार का, हा प्रश्न उपस्थित होत होता.
दरम्यान, 23 नोव्हेंबरला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा दिला.
बहुमत नसल्यामुळे राजीनामा-देवेंद्र फडणवीस
राष्ट्रपती राजवट दूर करण्यासाठी अजित पवार यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि ते आमच्यासोबत आले. आज कोर्टाच्या निर्णयानंतर अजित पवार यांनी राजीनामा देत असल्याचं सांगितलं. त्यामुळे आमच्याकडे बहुमताचा आकडा नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.
"सुरुवातीपासूनच शिवसेनेने नंबर गेम करण्यासाठी कधीही न ठरलेल्या गोष्टीची मागणी केली. न ठरलेल्या बाबींचा बाऊ करून शिवसेनेने कोणासोबतही जाण्याची धमकी शिवसेनेने दिली होती. यावर भाजपने तात्विक भूमिका घेत जे ठरलंय तेच देण्याचा निर्णय घेतला," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी युती तुटल्याचं खापर शिवसेनेवर फोडलं.
या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला.
मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेपूर्वीच काही वेळ आधी अजित पवारांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला होता.
संध्याकाळी 5.35 वाजता- उद्धव ठाकरे सत्तास्थापनेचा दावा करतील : नवाब मलिक
"सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल आल्यानंतर भाजपकडे बहुमत नसल्याचं सिद्ध झालं होतं. घोडेबाजार करण्यासाठीच त्यांनी हा शपथविधी केला होता. हा विजय महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचा विजय आहे," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं.
"शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच अपक्षांची बैठक होईल. त्यात नेत्यांची निवड होईल. उद्धव ठाकरे यांचीच निवड होईल. त्यानंतर उद्धव ठाकरे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे जातील," असंही नवाब मलिक यांनी म्हटलं.
संध्याकाळी 5.30 वाजता- माझा राजीनामा सार्थकी लागला : अरविंद सावंत
राज्यपाल यांच्याकडे जाऊन आम्ही सरकार स्थापनेची मागणी करू आणि लवकरच आमचे मुख्यमंत्री शपथविधी घेतील. माझा राजीनामा सार्थकी लागला याचा मला अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केली.
दुपारी 4.30 वाजता- बहुमत नसल्यामुळे राजीनामा : एकनाथ खडसे
"बहुमताचा आकडा मिळवता न आल्यानेच राजीनामा द्यावा लागला. जे बहुमतसोबत आहे असं वाटलं होतं, ते नव्हतं. त्यामुळे ही परिस्थिती ओढावली," अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.
दुपारी 4.20 वाजता- हे होणारच होतं : एकनाथ शिंदे
"आज जे घडलं ते होणारचं होतं. म्हणून, कालच आम्ही 162 आमदारांच्या सह्यांच निवदेन राज्यपालांना दिलं होतं," असं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
"सध्याचं सरकार अल्पमतात असून आम्हाला सरकार स्थापनेची संधी द्यावी ही मागणी आम्ही केली होती. संख्याबळ अपुरं असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला," असंही शिंदे यांनी म्हटलं.
दुपारी 4.10 वाजता- हा महाराष्ट्राच्या जनतेचा विजय: नवाब मलिक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा हा महाराष्ट्राच्या जनतेचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केली.
क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं, असं भाजप नेते नितीन गडकरी यांनी म्हटलं होतं. पण, ते हे विसरले होते की, शरद पवार ICCचे अध्यक्ष राहिले आहेत. केलं ना क्लीन बोल्ड? असं म्हणत नवाब मलिक यांनी भाजपला टोला हाणला.
दुपारी 3.15 वाजता- अजित पवारांनी सक्रिय राजकारणात राहावं : धनंजय मुंडे
अजित पवार यांनी सक्रिय राजकारणात राहावं हीच सदिच्छा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्याची निवड आज संध्याकाळी 6.30 वाजता होईल, असं धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं. "अजित पवार यांच्यासोबत गेल्याने माझी प्रतिमा मलिन झालेली नाही. मला महाराष्ट्राची जनता चांगली ओळखते. याविषयी मी अधिक बोलणार नाही," असंही मुंडे यांनी म्हटलं.
अजित पवारांच्या शपथविधीवेळी धनंजय मुंडे उपस्थित होते की नाही यावरून झालेल्या वादाकडे मुंडे यांचा रोख होता.
दुपारी 3 वाजता- अजित पवार आमच्यासोबत : संजय राऊत
अजित पवारांच्या राजीनाम्याचं वृत्त माध्यमातून येत असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी अजित पवार आमच्यासोबत आहेत असं म्हटलं.
'अजित पवारांशी आमचा संपर्क आणि संवाद झालेला आहे. त्यांनी राजीनामा दिला आहे. ते आमच्यासोबत आहेत. सर्वकाही ठीक आहे,' असं संजय राऊत यांनी म्हटलं.
पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे-
- विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला जनतेने संपूर्ण बहुमत दिलं. भारतीय जनता पक्षाला संपूर्ण जनादेश देत जनेतेने 105 जागा दिल्या. म्हणून आम्ही जनतेच्या मनातलं सरकार निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न केला.
- सुरुवातीपासूनच शिवसेनेने नंबर गेम करण्यासाठी कधीही न ठरलेल्या गोष्टीची मागणी केली. न ठरलेल्या बाबींचा बाऊ करून शिवसेनेने कोणासोबतही जाण्याची धमकी शिवसेनेने दिली होती. मात्र भाजपने तात्विक भूमिका घेत जे ठरलंय तेच देण्याचा निर्णय घेतला.
- त्यावर शिवसेनेने चर्चा करण्याऐवजी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला. मातोश्रीमधूनन कधीही बाहेर न जाणारे लोक बाहेर जाऊन चर्चा करायला लागले.
- राज्यपालांनी प्रत्येक पक्षाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं. तेव्हा आम्ही सत्ता स्थापन करायला नकार दिला. त्यानंतर शिवसेनेने पोकळ दावा करून आपलं हसं करून घेतलं.
- कोणीही सत्ता स्थापन करू शकले नाही तेव्हा राष्ट्रपती राजवट राज्यात लागली.
- त्यानंतर भिन्न विचाराधारा असलेले हे पक्ष एकत्र आले आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवू लागले. केवळ भाजपला दूर ठेवण्याचा हा कॉमन मॅक्झिमम प्रोग्राम होता.
- राष्ट्रपती राजवट दूर करण्यासाठी अजित पवार यांनी आमच्याशी संपर्क साधला. म्हणून अजित पवार आमच्यासोबत आले.
- पण, आज कोर्टाच्या निर्णयानंतर अजित पवार यांनी मी तुमच्यासोबत सत्तेत येऊ शकत नसल्याचं सांगत राजीनामा दिला. घोडेबाजार करायचा नाही हे आम्ही आधीच ठरवलं होतं. त्यानुसार मी आता राजीनामा देत आहे.
- येणाऱ्या सरकारला माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र महाराष्ट्रात येणाऱ्या सरकारबद्दल मला साशंकता आहे. आपल्याच ओझ्याखाली हे सरकार दबून जाईल. हे सरकार ऑटोरिक्षासारखं आहे. या रिक्षेची चाकं तीन दिशेला धावून महाराष्ट्राचं नुकसान होण्याची मला भीती वाटते.पाच वर्षांत आमच्या सरकारने वेगवेगळे महत्त्वाचे निर्णय घेऊन जनतेचं भलं करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि 5 वर्षं सरकार चालवून जनतेच्या विश्वासाला
- आम्ही पात्र ठरलो. यात काही गोष्टी चुकल्या असतील, राहिल्या असतील. पण, जनतेचं काम करणं हेच आमचं ध्येय होतं.
- पंतप्रधान मोदी आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष यांचा आम्हाला भक्कम पाठिंबा होता, म्हणून मी त्यांचे आभार मानतो.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)