पाकिस्तान : लाकूड तस्करी प्रकरणात गाढवं आरोपीच्या पिंजऱ्यात

न्यायालयात साधारणपणे माणसे आरोपी किंवा साक्षीदार म्हणून हजर केली जातात. पण पाकिस्तानात एक आश्चर्यजनक प्रकार समोर आला आहे.

गुरुवारी (20 ऑक्टोबर) येथील एका न्यायालयात गाढवांना आरोपी म्हणून हजर करण्यात आलं.

पाकिस्तानच्या चित्राल जिल्हा परिसरातील जंगलांमध्ये लाकडांची तस्करी सातत्याने होत असल्याच्या बातम्या येत असतात.

सरकार ही तस्करी रोखण्याचा प्रयत्न करत आहे. पण येथील जंगल वेगाने घटताना दिसत आहे.

चित्राल येथील दरोशचे सहायक आयुक्त तौसिफुल्लाह यांच्या न्यायालयात पाच गाढवांना हजर करण्यात आलं. दरोश येथील लाकडाच्या स्मगलिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोप या गाढवांवर होता.

नंतर या गाढवांना या प्रकरणात संपत्ती म्हणून दर्शवण्यात आलं. यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे गाढवाचा ताबा देण्यात आला.

गाढवांचा वापर तस्करीसाठी केला जात आहे किंवा नाही, याची खात्री पटवण्यासाठी त्यांना न्यायालयात आणलं गेलं, असं चित्रालच्या सहायक आयुक्तांनी यावेळी सांगितलं.

गाढवांना हजर करण्याचं कारण काय?

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, लाकडाच्या तस्करीची सूचना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. यावेळी तीन गाढवं वन विभागाला आढळून आली.

त्यांच्या पाठीवर चार लाकडांची पोती बांधण्यात आली होती. यादरम्यान एका आरोपीला ताब्यातही घेण्यात आलं होतं. तर गाढवं जप्त करून पोलिसांनी एका स्थानिक नागरिकाकडे ही गाढवं देखभालीसाठी दिली.

या घटनेच्या दोन दिवसांनंतर प्रशासनाला आणखी एक टीप मिळाली. त्यानुसार करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान पुन्हा तीन गाढवं पोलिसांना आढळून आली.

पण यावेळी वन अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की देखभालीसाठी दिलेल्या गाढवांपैकीच यामध्ये एक गाढव आहे. तर इतर दोन गाढवं वेगळी होती.

याच प्रकरणात न्यायालयाने वन अधिकाऱ्यांना सगळ्या गाढवांना हजर करण्याचा आदेश दिला.

यानंतर तस्करीच्या कामात एकूण किती गाढवांचा वापर करण्यात येतो, हे स्पष्ट करण्याच्या दृष्टीने त्या सर्वांना कोर्टात हजर करण्याचा आदेश त्यांनी दिला होता.

खात्री पटवल्यानंतर न्यायालयाने वन अधिकाऱ्यांच्या कामावर समाधान व्यक्त केलं. त्यानंतर गाढवांना त्यांच्याकडेच सोपवण्यात आलं.

गाढवंच का?

वन विभागाच्या वतीने इतर अधिकारी आणि कर्मचारीही न्यायालयात हजर झाले.

तौसिफुल्लाह म्हणाले की सरकारी ताब्यात असताना या गाढवांची देखभाल करणं अवघड आहे. त्यांची देखभाल आणि खुराक या सगळ्या गोष्टींची व्यवस्था करावी लागते.

त्यामुळे वन विभाग साधारणपणे गाढवं जप्त केल्यानंतर त्यांची जबाबदारी एका माहितगार व्यक्तीला देण्यात येते.

प्रकरणात गाढवं ही संपत्ती म्हणूनच दर्शवली जातात. सुनावणी होईपर्यंत ते ताब्यात असतात.

दूर्गम भागात लाकडाची वाहतूक करण्यासाठी वाहनांचा वापर करता येत नाही. तिथे अशा गाढवांचा वापर करूनच गाढवे डोंगरावरून खाली आणली जातात.

शिवाय, गाढवांना रस्ताही लक्षात असतो. त्यामुळे ते स्वतः ओझं वाहून नेतात. या कामासाठी कोणत्याही माणसाची गरज नसते. त्यामुळे या तस्करीसाठी गाढवाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

तस्कर कोण आहेत?

तस्कर कोण आहेत, याविषयी मतमतांतरं आहेत. या कामात बड्या व्यक्तींचा सहभाग असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. पण हे काम प्रत्यक्षात करण्यासाठी त्यांना स्थानिक गरीब मजूर मदत करत असतात.

स्थानिकांच्या मते, गाढवांच्या पाठीवर लाकडाची छोटी पोती बांधली जातात. पण अशा पद्धतीने मोठ्या स्वरुपात तस्करी करणं शक्य नाही. कारण मोठ्या स्वरुपात तस्करी करण्यासाठी ट्रकची गरज असते. त्यासाठी वेगळ्या रस्त्यांचा वापर करावा लागतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)