You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानवर 'सर्जिकल स्ट्राईक' करण्याची भारताची योजना- शाह मेहमूद कुरैशी
भारत पाकिस्तानवर 'सर्जिकल स्ट्राईक' करण्याची योजना आखत असल्याची माहिती गुप्तचर सूत्रांकडून मिळाल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरैशी यांनी म्हटलं आहे.
"भारतानं त्यांच्या देशांतर्गत आणि भारत प्रशासित काश्मीरमधील परिस्थितीवरून जनतेचं लक्ष वळवण्यासाठी भारत हे पाऊल उचलणार आहे," असं त्यांचं म्हणणं आहे.
पाकिस्तानी नागरिकांना आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची माहिती देणं हा आपला उद्देश असल्याचं कुरैशी यांनी अबूधाबीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
भारताकडून अशा प्रकारची कुठलीही कारवाई झाल्यास पाकिस्तान त्याला सडेतोड उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला.
इतर देशांनाही भारताच्या योजनेची माहिती असावी, यासाठी त्यांनाही याबद्दल सांगितल्याचं कुरैशी म्हणाले.
मात्र कुरैशी यांच्या या आरोपावर भारताने अजूनतरी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
कोरोना विषाणू संसर्गामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झाल्याचं कुरैशी म्हणाले.
"इतकंच नाही तर अल्पसंख्याकांसोबत होणारा भेदभाव आणि द्वेषपूर्ण कायद्यांचा संपूर्ण भारतात निषेध सुरू आहे. या परिस्थितीवरून जगाचं लक्ष वळवण्यासाठीच अशी काहीतरी कारवाई (सर्जिकल स्ट्राईक) करण्याचा भारताचा मानस आहे," असं कुरैशी यांचं म्हणणं आहे.
पाकिस्तानने गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय समुदायाला एक डोसियर देऊन भारत पाकिस्तानात दहशतवाद पसरवत असल्याचं सांगितल्याचं ते म्हणाले.
युरोपीय महासंघाचा डिसइन्फोलॅब अहवाल नुकताच जारी करण्यात आला आहे. या अहवालाचा दाखला देत पाश्चिमात्य देशात गेल्या 15 वर्षांपासून एक नेटवर्क सुरू असल्याचं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला बदनाम करून भारताला फायदा पोहोचवणं, हा या नेटवर्कचा उद्देश असल्याचंही कुरैशी म्हणाले.
भारत अशा प्रकारचं कुठलंही बेजबाबदार कृत्य करणार असेल तर अफगाण शांतता प्रक्रियेसह परिसरातील शांतता आणि स्थिरतेला मोठा धोका निर्माण होईल, असा इशाराही कुरैशी यांनी दिला.
शाह मेहमूद कुरैशी यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेनंतर पाकिस्तानचे पतंप्रधान इमरान खान यांचे राष्ट्रीय सुरक्षा विषयाचे विशेष सहाय्यक मोईद युसूफ यांनी अनेक ट्वीट केले. एका ट्वीटमध्ये ते लिहितात, "अण्वस्त्र सज्ज पाकिस्तानावर आपण हल्ला करू शकतो, असं जर भारताला वाटत असेल तर भारताची अस्वस्थता हास्यास्पद पातळीपर्यंत वाढली आहे."
पाकव्याप्त काश्मीरमध्ये यूएनच्या गाडीवर भारताकडून गोळीबार : पाकिस्तानचा आरोप
दुसरीकडे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जाहीद चौधरी यांनी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन शुक्रवारी सकाळी भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील चिरीकोट सेक्टरमध्ये गोळीबार केला आणि यात संयुक्त राष्ट्रांच्या एका गाडीचं नुकसान झाल्याचा आरोप केला.
गाडीत भारत आणि पाकिस्तानात यूएनच्या ऑब्जर्व्हर मिलिट्री ग्रुपचे (UNMOGIP) दोन अधिकारी बसले होते. गोळीबारात गाडीचं नुकसान झालं असलं तरी दोन्ही अधिकारी सुरक्षित असल्याचं चौधरी यांनी सांगितलं.
पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांनीही या गोळीबाराचा उल्लेख करत संयुक्त राष्ट्रांची गाडी लांबूनच ओळखता येत असल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या मिलिट्री ऑब्जर्व्हर मिशनचं पूर्ण समर्थन करतो आणि कर्तव्य बजावण्यासाठी त्यांचं अभिनंदनही करतो, असंही ते म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)