You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सायरस मिस्त्री मृत्यू : डॉ. अनाहिता पंडोल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
उद्योगपती सायरस मिस्त्री मृत्यूप्रकरणी पालघर पोलिसांनी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनाहिता पंडोल यांच्याविरोधात बेदरकारपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सायरस मिस्त्री ज्या कारमध्ये होते, ती कार अनाहिता पंडोल या चालवत होत्या.
शापूरजी पालनजी समूहाचे प्रमुख सायरस मिस्त्री यांचं पालघर जिल्ह्यात 4 सप्टेंबर 2022 रोजी रस्ते अपघातात निधन झालं.
पालघर पोलिसांनी काय माहिती दिली :
सायरस मिस्त्री मर्सिडीज कारमधून गुजरातमधील अहमदाबादमधून मुंबईकडे येत असताना दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कार दुभाजकाला धडकल्याची माहिती पालघर पोलिसांनी दिली.
कारमध्ये एकूणच चारजण होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं आहे.
सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे माजी प्रमुख होते.
टाटा समूहाच्या 144 वर्षांच्या इतिहासात हे पद सांभाळणारे ते सहावे व्यक्ती बनले होते. तसंच टाटा कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीला दुसऱ्यांदा या पदाची जबाबदारी मिस्त्री यांच्या रुपात मिळाली होती.
सायरस मिस्त्री यांच्या नावाची रतन टाटा यांनी घोषणा केली त्यावेळी सायरस यांच्या नावाची प्रचंड चर्चा झाली होती. कारण टाटा समूहाच्या बाहेर त्यांना सार्वजनिक जीवनात फारसं ओळखलं जात नव्हतं.
अखेर रतन टाटा यांच्यासोबतच्या वादानंतर त्यांना टाटा समूहाच्या प्रमुखपदावरून दूरही करण्यात आलं होतं.
सायरस मिस्त्री हे सध्या शापूरजी पालनजी समूहाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.
सायरस मिस्त्री : आयर्लंडमध्ये जन्म, लंडनमध्ये शिक्षण
सायरस मिस्त्री हे शापूरजी पालोनजी यांचे सर्वात लहान पुत्र. त्यांचं कुटुंब आयर्लंडमध्ये सर्वाधिक श्रीमंत भारतीय कुटुंबांपैकी एक म्हणून ओळखलं जातं.
सायरस यांचा जन्मही आयर्लंडमध्येच झाला होता. पुढे लंडन बिझनेस स्कूल येथून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं.
सायरस यांनी शापूरजी पालोनजी अँड कंपनीत 1991 पासून काम सुरू केलं. त्यानंतर 1994 साली त्यांना शापूरजी पालनजी समूहाचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलं.
सायरस यांच्या नेतृत्वात शापूरजी पालनजी अँड कंपनीने तुफान नफा कमावला. त्यांचा व्यवसाय दोन कोटी पाऊंडवरून सुमारे दीड अब्ज पाऊंडपर्यंत पोहोचला.
कंपनीने जहाजबांधणी, तेल-गॅस आणि रेल्वे क्षेत्रात काम केलं. यादरम्यान कंपनीचा बांधकाम व्यवसाय दहा देशांपेक्षा जास्त देशांमध्ये पसरला.
सायरस यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कंपनीने भारतात अनेक विक्रम प्रस्थापित केले. यामध्ये सर्वात उंच रहिवासी इमारत, सर्वात लांब रेल्वे पूल आणि सर्वात मोठ्या बंदराचं बांधकाम या कामांचा समावेश आहे.
टाटा सन्सच्या संचालक मंडळात सायरस मिस्त्री यांचा समावेश 2006 साली करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार एम. के. वेणू यांच्या माहितीनुसार टाटा सन्सचे सर्वाधिक शेअर्स सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबाकडेच आहेत.
मिस्त्री यांच्या निधनाने धक्का बसला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
ते म्हणाले, "सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे.
ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केलं.
राष्ट्रवादीच्या खासदार आणि मिस्त्री कुटुंबाच्या निकटवर्तीय सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करून प्रतिक्रिया दिली.
त्या म्हणाल्या, "माझा भाऊ सायरस मिस्त्री याचं निधन अत्यंत धक्कादायक आहे. विश्वास बसत नाही. आदरांजली, सायरस."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)