You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लग्नाला उशीर अन् वधू पक्षाने नवरदेवाला दिलं हाकलून, दुसऱ्या मुलाशी लावून दिलं लग्न
लग्न म्हणजे आयुष्यातला आनंदाचा आणि महत्त्वाचा क्षण. या क्षणी झालेल्या उशिरामुळे लग्न मोडण्याची वेळ एका मुलावर ओढवली आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांगरा इथे आयोजित लग्नात वऱ्हाडी तरुणांच्या नाचगाण्यामुळे नवरदेवासह वराकडील वर्हाडी मंडळी लग्न मंडपात खूप उशिरा आले. त्यामुळे वधू-वराकडील मंडळीत परस्परांत पेटलेल्या वादातून हळद लावलेल्या नवरदेवाला ओल्या हळदीसह लग्नमंडपातून बिना लग्नाचे घरी परतावे लागल्याची घटना घडली आहे.
लग्नात नाचगाणी, धांगडधिंगा आणि यामुळे झालेल्या उशिरामुळे मुलीकडच्यांनी थेट लग्नातूनच माघार घेतली.
सिंदखेडराजा तालुक्यातील कंडारी येथील एका युवकाचे नातेवाईक असलेल्या परिसरातीलच मलकापूर पांगरा येथे लग्न ठरले होते. 23 एप्रिलला दुपारी लग्नाचा मुहूर्त होता. 23 एप्रिलला सकाळीच मलकापूर पांगारा येथील नवरी मुलगी ही साजश्रृंगार करून नवरदेवाची वाट बघत होती. सर्वत्र लग्नाची जोरदार तयारी करण्यात आली.
मुहुर्त जवळ आल्याने बरीच पाहुणे मंडळी येऊन मंडपात बसली होती. मात्र नवरदेवच मंडपात येण्यास सातत्याने उशीर होत होता. नवरदेवाची मित्र मंडळी मद्यधुंद होऊन बॅण्डबाजाच्या तालावर नाचतच होती. दुपारी उशिरा गावात दाखल होऊन त्यानंतर काढलेल्या वरातीमुळे नवरदेव मंडपात यायला रात्रीचे 8 वाजले.
त्याच वेळेस नवरीकडील मंडळींनी नवरदेव यायला उशीर का झाला? म्हणून वराकडील मंडळीला विचारणा केली असता असे विचारताच वाद होऊन मुद्द्यावरून वाद गुद्द्यावर आला. आणि बघता बघता हातात स्वयंपाकाचे उलथणे घेऊन वराकडील वर्हाडी मंडळीला वधूकडील मंडळींनी चांगलेच धुतले.
त्यानंतर आमच्या मुलीचे तुमच्या मुलासोबत लग्न लावायचे नाही, अशी रोखठोक भूमिका घेत नवरदेवाला भर मंडपातून लग्न न लावताच ओल्या हळदीने आल्या पावली हाकलून देण्यात आले. त्यामुळे आनंदाच्या वातावरणात विरजण पडलेले बघायला मिळाले.
नवरदेवाचे दुसर्या मुलीसोबत तर नवरीचे दुसर्या मुलासोबत लग्न
वधूकडील मंडळींनी हळद लावलेल्या नवरीला ठेवायचे कसे म्हणून वधूपित्याने शोधाशोध करून दुसरबीड येथील नात्यातीलच एक मुलगा बघितला आणि रात्रीच त्याच्यासोबत वर-वधूचे शुभमंगल पार पाडले. तर दुसऱ्या दिवशी मुलाचेही दुसरी मुलगी पाहून लावून दिले.
लग्न त्यानंतर दुसरे दिवशी सकाळीच कंडारी येथून वराकडील प्रतिष्ठित मंडळी मलकापूर पांगारा येथे येऊन तुम्ही असे का केले म्हणून विचारणा केली. त्यानंतर मान्यवरांनी मध्यस्थी करून नवरी मुलीला केलेले दागदागिने आणि मानाच्या साड्या परत केल्या. त्यामुळे वाढणारा वाद मिटला.
त्यानंतर देऊळगाव कोळ येथील आत्याच्या मुली सोबत ओल्या हळदीने बसलेल्या नवरदेवाचा लग्नाचा बार शेवटी उडवून दिला. दोघांचे वेगवेगळ्या ठिकाणी शुभमंगल उरकले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)