You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
किरिट सोमय्या गाडीहल्ला प्रकरण नेमकं काय? त्यावर भावना गवळी काय म्हणाल्या?
शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांच्यातील वाद विकोपाला पोहोचत असल्याचं पाहायला मिळत आहे. शुक्रवारी किरिट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाला. त्यावरून सोमय्या यांनी आणखी आरोप केले आहेत.
भाजप नेते किरिट सोमय्या यांनी वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर आरोप केले आहेत. भावना गवळी यांच्या संस्थेमध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा हा आरोप करण्यात आला आहे.
किरिट सोमय्या यांनी आधीच सोशल मीडियाच्या माध्यमातून वाशीमला या भ्रष्टाचाराबाबत माहिती घेण्यासाठी जाणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.
आरोपांची माहिती घेण्यासाठी सोमय्या वाशिमला गेले होते. त्यावेळी त्यांच्या गाड्यांवर हल्ला झाल्याचं पाहायला मिळालं. "हा हल्ला शिवसेनेच्या गुंडांनी केल्याचा" आरोप सोमय्या यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
भावना गवळी यांनी जनशिक्षण संस्था महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या कार्यालयातून सात कोटींची चोरी झाल्याची पोलीस तक्रार केली होती. या तक्रारीनंतर सोमय्या यांनी भावना गवळींच्या विरोधात ट्वीट केलं होतं.
भावना गवळी यांच्याकडं एवढी मोठी रक्कम कुठून आली याचा हिशोब त्यांना द्यावा लागणार असल्याचं सोमय्या यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं. "हा महामार्ग बांधकाम कंत्राटदारांकडून आलेल्या वसुलीचा पैसा आहेत का," असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.
त्यानंतर सोमय्या यांनी भावना गवळी यांच्या संस्थेमध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड कारखाना खरेदी प्रकरणातही मोठा भ्रष्ट्राचार गवळी यांच्या कंपनीने केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशीची मागणी त्यांनी ED,CBI, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे केली आहे. येत्या दोन आठवड्यात भावना गवळी यांच्या विरोधात कारवाई सुरू होणार असल्याचंही सोमया म्हणाले. तसंच या प्रकरणी माहिती घेण्यासाठी आणि पत्रकार परिषदेसाठी ते वाशिमला आले होते. त्यावेळी त्यांच्या गाडीवर हल्ला झाला.
कारवर शाईफेक, दगड मारले
किरिट सोमय्या यांनी सोशल मीडियावर जाहीर केल्यानुसार शुक्रवारी ते त्यांच्या कारनं वाशिममध्ये दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या कारवर काही लोकांनी हल्ला केला.
"शिवसेनेच्या गुंडांनी कारवर हल्ला केल्याचा" आरोप किरिट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी सोशल मीडियावरही याबाबत माहिती दिली.
वाशिमच्या बालाजी पार्टीकल्स बोर्ड कारखान्याकडे 100 कोटींच्या घोटाळ्याबाबत माहिती घेण्यासाठी जाताना दुपारी 12.30 च्या सुमारास हल्ला झाल्याचं सोमय्यांनी सांगितलं.
हल्ल्यांना घाबरणार नाही-सोमय्या
अशा प्रकारच्या हल्ल्यांनी भ्रष्टाचारा विरोधातील माझ्या लढ्यावर काहीही परिणाम होणार नाही. माझा लढा मी सुरुच ठेवणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे.
तसंच यावेळी केलेल्या ट्विटमध्ये सोमय्या यांनी काही दिवसांत भावना गवळी यांच्यासह इतरही शिवसेना नेत्यांवरील कारवाई अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचेल असा दावा केला आहे.
यावेळी सोमय्या यांनी मिलिंद नार्वेकर, यशवंत जाधव, यामिनी जाधन, अनिल परब आणि प्रताप सरनाईक अशा नेत्याच्या नावांचा उल्लेख केला आहे.
भावना गवळींनी आरोप फेटाळले
खासदार भावना गवळी यांनी त्यांच्यावरचे आरोप फेटाळून लावले आहेत. भूखंड माफियांचा भ्रष्ट्राचार उघड केल्यामुळे सूड घेण्यासाठी त्यांनी चालवलेला हा खटाटोप असल्याचं गवळी म्हणाल्या आहेत.
7 कोटींच्या भ्रष्ट्राचाराच्या आरोपाबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. "आम्ही स्वतः चोरीची तक्रार पोलिसात दिली होती. त्यात लिहिलेल्या मजकुरातून तेवढीच एक गोष्ट काढून ट्वीट करण्यात आली. या लोकांची अशीच घाणेरडी पद्धत आहे," असं त्या म्हणाल्या.
"आम्ही दिलेली तक्रार संस्थेच्या संदर्भात होती. त्याबाबत तक्रारही दाखल झाली आहे. त्यासंबंधी आरोप झालेल्या लोकांना जामीनही मिळाला आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. इतरांना याची चौकशी करण्याचा अधिकार नाही," असं भावना गवळी म्हणाल्यात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)