You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राखी सावंत बिग बॉसच्या घरात हमसून हमसून रडून राहुल वैद्यला नवऱ्याबद्दल काय सांगत होती?
- Author, अमृता कदम
- Role, बीबीसी मराठी
अभिनेत्री रुबीना दिलैक राखी सावंतच्या अंगावर रागानं पाणी फेकत आहे... कलर्स वाहिनीवर सुरू असलेल्या 'बिग बॉस' या कार्यक्रमाचा हा प्रोमो. याच प्रोमोत राखी सावंत या घरातील स्पर्धक असलेल्या अभिनव शुक्लासोबतही जोरजोरात वाद घालताना दिसते.
'बिग बॉस' आणि राखी सावंत सध्या चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच राखी सावंतने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आणि या घरातलं वातावरणच बदलून गेलं... एरव्ही 'बिग बॉस'मधील वाद-विवादांची, त्या घरात होणाऱ्या 'कथित' प्रेमप्रकरणांची चर्चा होत असते. मनोरंजनाचा एक भाग म्हणून त्याकडे पाहिलं जातं.
पण सध्या 'बिग बॉस'च्या चौदाव्या सीझनमध्ये राखी सावंत जे करत आहे, त्याकडे मनोरंजन किंवा एन्टरटेन्मेंट म्हणून पाहायचं का असा प्रश्न सध्या उपस्थित आहे.
बिग बॉसच्या घरात स्पर्धक असलेली अभिनेत्री रुबीना दिलैक राखी सावंतला 'एन्टरटेन्मेंटच्या नावाखाली असं वर्तन खपवून घेतलं जाणार नाही. एका मर्यादेत राहणं चांगलं' असं बजावताना दिसली. सोशल मीडियावरही राखी सावंतला ट्रोल व्हावं लागलं.
राखी सावंतवर आता टीका का होत आहे? बिग बॉससारख्या कार्यक्रमात अनेकदा तुम्ही प्रेक्षकांना एन्टरटेन करणं अपेक्षित आहे, असं सांगितलं जातं. मग राखी सावंतच्या या वर्तनाला एन्टरटेन्मेंट म्हणायचं का? आणि एकूणच राखी सावंत सातत्यानं चर्चेत का असतं?
आता हे प्रश्न उपस्थित होण्याचं आणि रुबीना दिलैकच्या रागाचं कारण आहे, राखी सावंतचं अभिनेता आणि रुबीना दिलैकचा पती अभिनव शुक्लासोबतचं वर्तन.
'बिग बॉस'च्या चौदाव्या सीझनमध्ये अभिनव आणि रुबीना स्पर्धक म्हणून घरात आले. पहिल्या दिवसापासून हे कपल 'बिग बॉस'च्या घरात आहे. तर राखी सावंत काही दिवसांपूर्वीच घरात आली आहे.
राखी यापूर्वी 'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. बिग बॉसच्या 14 व्या सीझनमध्ये काही जुन्या स्पर्धकांना घरात एन्ट्री देण्यात आली. राखीही त्यापैकी एक.
घरात आल्यानंतर राखीने अभिनव शुक्लासोबत 'फ्लर्ट' करायला सुरूवात केली. सुरूवातीला हे सगळं गमतीत आणि हसत-खेळत सुरू होतं.
मात्र एकदा राखीने लिपस्टिकने आपल्या अंगभर 'I love ABhinav' लिहिलं आणि घरभर फिरत होती. आपल्याला अभिनव आवडतो असंही ती सातत्यानं सांगायला लागली. एका टास्कदरम्यान तर तिने अभिनवच्या शॉर्ट्सची नाडीच ओढली. हा प्रकार अभिनव आणि रूबीनाला आवडला नाही. इतकंच नाही एका टास्कमध्ये मदत केली नाही, म्हणून घरात जाऊन राखीने अभिनवची अंतर्वस्त्रच कात्रीने कापली.
या एकापाठोपाठ एक घडलेल्या घटनांनतर सोशल मीडियावर राखी सावंतला ट्रोल करण्यात आलं.
राखीचं हे वर्तन अशोभनीय आणि हिणकस असल्याचं युजर्सनं म्हटलं आहे.
राखीच्या या वर्तनाला एन्टरटेन्मेंट म्हणता येणार नाही, असंही काही युजर्सनं म्हटलं आहे.
"मुळात 'बिग बॉस' हे काहीतरी खूप गहन, आशयघन असा शो नाहीये. त्यामुळे तसं काही अर्थपूर्ण करण्यासाठी राखी या शोमध्ये नाहीये. बिग बॉसचा जो प्रेक्षक आहे, तो अशा गोष्टी एन्जॉय करतो. हे माहीत असल्यामुळेच राखी सावंतला या शो मध्ये घेतलं आहे. तिचं वर्तन चूक किंवा बरोबर हा वेगळा भाग, पण त्यामुळे कार्यक्रमाची चर्चा होत आहे," असं मत बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनचा विजेता शिव ठाकरे याने बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.
'बिग बॉस'मध्ये जेव्हा स्पर्धकांना घेतलं जातं, तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार होतो आणि वेगवेगळ्या विचारांचे लोक एकाच घरात येतात. एवढ्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाचे लोक एकत्र राहायला लागल्यावर स्वाभाविकपणे आपल्यासाठी लहानसहान वाटणाऱ्या गोष्टींवरही वाद होऊ शकतात. लोकांना हे रंजक वाटू शकतं, असं शिव ठाकरे याने म्हटलं.
अर्थात, हिंदी बिग बॉस आणि मराठी बिग बॉसचा प्रेक्षक वर्ग वेगळा आहे. त्यामुळे हिंदी बिग बॉसमध्ये ज्या गोष्टी चालतात, ते मराठी चालेलच असं नाहीये. म्हणूनच मराठीत बिग बॉस आणताना काही सीमारेषा काटेकोर आखल्या गेल्याचंही शिव ठाकरेनं आवर्जून नमूद केलं.
नवऱ्याबद्दल राखीनं असं काय सांगितलं?
'बिग बॉस'च्या घरात आल्यानंतर राखी सावंत चर्चेत येण्याचं एकमेव कारण अभिनव शुक्ला हे नाहीये. राखी सावंतचं लग्न आणि तिच्या नवऱ्यावरूनही घरातील काही स्पर्धकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.
राखी सावंतने 2019 मध्ये आपलं लग्न झाल्याचं जाहीर केलं होतं. आपल्या पतीचं नाव रितेश असून तो अनिवासी भारतीय आहे आणि व्यावसायिक आहे, असं तिनं म्हटलं होतं. विशेष म्हणजे त्याच्यासोबतचा एकही फोटो तिनं अपलोड केला नव्हता. तिच्या पतीचा एकही फोटो आतापर्यंत प्रसिद्ध झाला नाही. त्यामुळेच बिग बॉसच्या घरातील काही स्पर्धकांनी राखीचं खरंच लग्न झालं आहे का? अशी शंका घेतली होती.
एका एपिसोडमध्ये राखी रडून रितेशनं एकदाच सगळ्यांसमोर यावं असं आपल्या आईशी बोलताना दिसत होती. तो समोर आला म्हणजे सर्वांच्या शंका दूर होतील, असं तिचं म्हणणं होतं.
एकीकडे आपल्या नवऱ्यानं एकदाच सगळ्यांसमोर यावं असं म्हणणाऱ्या राखीनं बिग बॉसच्या घरातील स्पर्धक असलेल्या राहुल वैद्यशी बोलताना वेगळाच खुलासा केला. कलर्स वाहिनीच्या सोशल मीडिया हँडलवर हा व्हीडिओ आहे.
यामध्ये राखी सावंत आपल्या नवऱ्याचं आधीच लग्न झालं होतं, असं सांगत आहे. त्याला मूल असल्याचंही ती म्हणत आहे. आपला विश्वासघात झाल्याचं सांगताना ती हमसून हमसून रडतही आहे.
आपला एकाच लग्नावर विश्वास असल्यानं या लग्नातून आपण बाहेर पडू इच्छित नाही, असंही तिनं म्हटलं होतं.
आपल्या लग्नाबद्दल कमालीची गोपनीयता बाळगणाऱ्या राखीनं अचानक केलेला हा खुलासा ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राखी सावंत सातत्याने चर्चेत का?
एकूणच वैयक्तिक आयुष्याबद्दल केलेले बिनधास्त खुलासे असोत की व्यावसायिक आयुष्यातले निर्णय राखी सावंत अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
2006 साली एका पार्टीत गायक मिका सिंहनं राखी सावंतचं घेतलेलं चुंबन चांगलंच गाजलं होतं. या प्रकारानंतर काही महिन्यातच राखीनं बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता.
2009 मध्ये राखी सावंत 'राखी का स्वयंवर' नावाच्या रिअलिटी शोमध्ये सहभागी होत स्वतःसाठी जोडीदार निवडला होता. तिनं कॅनडाच्या इलेश परुजानवाला नावाच्या व्यक्तिची आपला जोडीदार म्हणून निवड केली होती. या कार्यक्रमानंतर त्या दोघांनी लग्न करणं अपेक्षित होतं. पण नंतर राखीने आपण इलेशशी लग्न करणार नसल्याचं जाहीर केलं. केवळ पैशांसाठी आपण हा साखरपुडा केल्याचंही तिनं नंतर एका मुलाखतीत म्हटलं होतं.
2010 साली तिनं 'राखी का इन्साफ' नावाचा एक कार्यक्रमही होस्ट केला होता. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका तरूणानं आत्महत्या केल्यानंतर वाद निर्माण झाला होता.
राजकारणातली एन्ट्री
2014 साली राखी सावंतने राजकारणाच्या रिंगणातही उडी घेतली होती. तिनं चक्क स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि लोकसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली. राष्ट्रीय आम पक्ष असं तिनं आपल्या पक्षाचं नावही ठेवलं होतं. आपल्या स्वभावाचा विचार करता आपल्याला हिरवी मिरची हे चिन्ह मिळावं अशी अपेक्षाही तिनं व्यक्त केली होती.
अर्थात, नंतर राष्ट्रीय आम पक्ष फारसा कुठेच दिसला नाही आणि मग जून 2014 मध्ये राखीनं रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. मात्र या पक्षप्रवेशानंतर राखी सावंत राजकीयदृष्ट्या फारशी सक्रिय दिसली नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )