You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मनोज चौधरी आत्महत्या: एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर सरकारचा निर्णय, दोन महिन्यांचा पगार जमा करणार
माझ्या आत्महत्येला एसटी महामंडळातील कार्यपद्धती आणि ठाकरे सरकार जबाबदार असल्याची सुसाईड नोट लिहून जळगावातील एका कंडक्टरनं आत्महत्या केली आहे, असं जळगाव ग्रामीण पोलिसांनी सांगितलं आहे.
सध्या पोलिसांच्या ताब्यात सुसाईड नोट आली असून त्यातील हस्ताक्षर हे मनोज चौधरी यांचेच असल्याचे प्रथमदर्शनी दिसते असे पोलिसांनी सांगितले आहे.
त्यानंतर आता राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना एका महिन्याचं वेतन आणि दिवाळी बोनस आज, तर एका महिन्याचं वेतन दिवाळीपूर्वी करण्याचं आश्वासन दिलं आहे.
प्रकरण काय?
जळगाव आगारातील एसटी महामंडळात काम करणाऱ्या कंडक्टर मनोज चौधरी यांनी राहत्या घरी आत्महत्या केली.
त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, "एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार आहे. (शिवसेना)
"माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझ्या पीएफ आणि एलआयसी विमा हा माझ्या कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. ही विनंती," असं चौधरी यांनी लिहिलं आहे.
विरोधी पक्षाची टीका
हे प्रकरण समोर आल्यानंतर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची यांनी सरकारवर टीका केली.
त्यांनी म्हटलं, "एसटी कर्मचा-यांना गेले तीन महिने पगार न मिळाल्यामुळे कर्मचा-यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या दोन दिवसात एसटीच्या दोन कर्मचा-यांनी पगार मिळत नसल्यामुळे आत्महत्या केली आहे. तरीही हे ठाकरे सरकार अजूनही झोपले आहे. त्यामुळे या एसटी कर्मचा-यांच्या आत्महत्येला जबाबदार असणा-या ठाकरे सरकारवर 302 कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी आमची मागणी आहे."
तसंच कर्मचा-यांचे थकित पगार दिवाळपूर्वी द्या अन्यथा भाजपाच्यावतीने टोकाची भूमिका घेण्यात येईल, असंही ते म्हणाले.
सरकारचं काय म्हणणं?
सरकारने हे आवाहन केलं आहे की कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये.
"एसटी कर्मचा-यांचं वेतन थकलं गेलंय ही वस्तुस्थिती आहे. एसटीची आर्थिक परिस्थिती बिकट आहे त्यामुळे हे वेतन थकले आहे. आज मी एक महिन्याचं वेतन आणि सणाची अग्रम रक्कम मिळेल हे मी नक्की केलेलं आहे. अजूनही पैशांची व्यवस्था करून अजून एका महिन्याची रक्कम आम्ही दिवाळीपूर्वी देण्याची व्यवस्था करणार आहे. मी आवाहन करतो की आत्महत्येसारखं पाऊल उचलू नका," असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केलं आहे.
"ज्या दोन कर्मचा-यांनी आत्महत्या केली त्यांना काही आर्थिक दिलासा द्यायचा का, याबाबत अधिकार्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. 302 कलम कधी लागतं याचा अभ्यास प्रविण दरेकर यांनी करावा," असंही त्यांनी म्हटलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)