You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, रायगडमध्ये सर्कतेचा इशारा
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र अधिक खोलवर गेल्यानं त्याची दिशा पश्चिम-वायव्य अशी राहिल, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे.
"11 ते 17 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात कोकणासह आतल्या भागात पाऊस पूर्णत: सक्रीय राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. ढगांच्या गडगडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापणीला आलेल्या पीकांवरती दाट प्रभाव होण्याची शक्यता आहे," असं ट्वीट मुंबईच्या हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी केलं आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांनी चिंता करू नये, असं म्हटलं आहे.
11 ऑक्टोबरला राज्यातील जनतेला संबोधित करताना त्यांनी म्हटलं, "अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे, याची सरकारला कल्पना आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. पण, जी जी पीकं येतील त्यांच्या आम्ही बाबतीत खबरदारी घेत आहोत. जिथं जिथं नुकसान झालं, तिथं तिथं पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे."
रायगड जिल्ह्याला इशारा
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियंत्रण कक्षाकडून नागरिकांना आणि यंत्रणांना सावधानतेचा आणि सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे. दिनांक 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबरदरम्यान रायगड आणि परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
या कालावधीत समुद्र खवळलेला असल्याने मच्छिमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये. अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सखल भागात नागरिकांनी सतर्क रहावे. विजेच्या कडकडाटासह वादळी वारा वाहणार असल्याने मोकळ्या जागेत उभे राहू नये. विजेचे खांब, लोखंडी वस्तू, विद्युत वस्तूंपासून दूर रहावे. सुके अन्न पदार्थ, बॅटरी, पुरेशी औषधे, पिण्यासाठी पाणी इ. व्यवस्था करण्यात यावी. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, अशी सूचना प्रशासनाने केली आहे.
आंध्रात पूर आणि भूस्खलन
महाराष्ट्राप्रमाणेच आंध्र प्रदेश, तेलंगण या राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचलं. वादळीवाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी जमीन खचल्याची माहिती मिळाली आहे.
तेलंगणची राजधानी हैदराबाद शहरात मंगळवारी दुपारनंतर पावसाने जोर धरला. याचा लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच अतिवृष्टीमुळे आंध्र प्रदेशात सात जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)