भारत चीन सीमेवरील परिस्थिती सध्या नाजूक- लष्करप्रमुख नरवणे

भारत-चीन सीमेवरील परिस्थिती सध्या नाजूक असल्याचं लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी म्हटलं आहे.

पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यालगतची जैसे थे परिस्थिती बदलण्यासाठी नुकतेच चीनने प्रयत्न केले होते. त्याचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी गुरुवारी लडाखचा दोन दिवसांचा दौरा सुरू केला.

लष्करप्रमुख मनोज नरवणे म्हणाले, "लेहमध्ये पोहोचल्यानंतर मी अनेक ठिकाणांना भेट दिली. मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसंच तयारीचाही आढावा घेतला. जवानांचं मनोबल उंचावलेलं असून सर्व आव्हानांचा सामना करण्यास ते तयार आहेत.

"नियंत्रण रेषेवरील परिस्थिती थोडी तणावाची आहे. परिस्थिती लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सैन्य तैनात करण्यात आलं आहे. यामुळे आपली सुरक्षा आणि अखंडतेचं रक्षण होईल," असं नरवणे म्हणाले.

"भारताच्या लष्करातील अधिकारी आणि जवान जगात सर्वोत्तम असून आम्ही फक्त लष्कर नव्हे तर देशालाही अभिमान वाटेल अशी कामगिरी करू तसंच चर्चेच्या माध्यमातून वाद मिटेल," असा विश्वास लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केला आहे.

भारत आणि चीनच्या संरक्षणमंत्र्यांतील बैठक संपली

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंघे यांच्यात आज (5 सप्टेंबर) मॉस्कोमध्ये बैठक झाली. दोन्ही संरक्षण मंत्री शांघाय सहकार्य संघटना (SCO) च्या बैठकीत सहभागी होण्यासाठी मॉस्को येथे उपस्थित आहेत.

ही बैठक सुमारे 20 मिनिटे चालली.

भारतीय माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, या मुलाखतीचा प्रस्ताव चीनच्या संरक्षणमंत्र्यांनीच मांडला होता.

दोन्ही संरक्षणमंत्र्यांची बैठक भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर होत असल्यामुळे याला वेगळंच महत्त्व आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन सीमेवर प्रचंड तणाव आहे, हिंसक झटापटही याठिकाणी झालेली आहे.

ऑल इंडिया रेडिओने दिलेल्या बातमीनुसार, SCO संघटना, सोव्हिएत संघातून वेगळ्या झालेल्या स्वतंत्र राष्ट्रांची संघटना CIS आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा करार संघटना (CSTO) या तिन्ही संघटनांच्या सदस्य देशांच्या संयुक्त बैठकीत भाषण करताना राजनाथ सिंह म्हणाले, "भारत देश स्वतंत्र, पारदर्शक, सर्वसमावेशक आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांशी संबंधित जागतिक सुरक्षेबाबत कटीबद्ध आहे."

"जगाने एकमेकांवर विश्वास बाळगावा, आंतरराष्ट्रीय कायद्याप्रति सन्मान, एकमेकांना सहकार्य करत आपल्या हितांबाबत संवेदनशील असणं गरजेचं आहे. आपल्यातील मतभेद शांततापूर्ण पद्धतीने सोडवले पाहिजेत," असं राजनाथ सिंह म्हणाले.

भारत दहशतवादाचे सगळे स्वरूप आणि प्रकारांचा निषेध करतो. त्यांच्या पाठीराख्यांचा विरोध करतो, असंही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

"आपण अजूनही सर्वांसाठी सुरक्षा आणि विकासाचं ध्येय पूर्ण करण्यात यशस्वी ठरलो नाही. अफगाणिस्तानातील स्थिती चिंताजनक आहे," असंही सिंह म्हणाले.

भारत चीन दरम्यानचा सध्याचा वाद

चिनी सैनिक मे महिन्यात भारताच्या सीमेत दाखल झाल्याच्या बातम्या काही भारतीय माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या.

पण भारतीय राज्यकर्त्यांनी या बातम्या फेटाळून लावल्या.

LAC वर 15 आणि 16 जूनला झालेल्या हिंसक झटापटीने सर्वांचे डोळे उघडले.

या लढाईत भारतीय लष्करातील एका कर्नलसह तब्बल 20 सैनिक मारले गेले. भारताच्या मते, या झटापटीत काही चीनी सैनिकही मारले गेले, पण त्यांच्या संख्येबाबत काहीच स्पष्ट होऊ शकलं नाही.

या सैनिकांबाबत चीनने कधीच अधिकृत घोषणा केली नाही.

या लढाईपूर्वी आणि नंतरही भारत आणि चीनच्या लष्करांमध्ये बातचीत होत होती. पण सीमेवरचा तणाव कायम होता. नुकतेच 29-30 ऑगस्ट रोजी पुन्हा एक झटापट झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

पण याबाबत अजूनही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

भारत आणि चीन याप्रकरणी एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)