कंपाऊंडरचा डॉक्टरांवर दगडाने हल्ला : #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. कंपाऊंडरचा डॉक्टरांवर दगडाने हल्ला

लातूरमध्ये कंपाऊंडरने डॉक्टरवर हल्ला करण्याची घटना बुधवारी (19 ऑगस्ट) घडली आहे. लातूरमधील गायत्री हॉस्पिटलमध्ये ही घटना घडल्याची बातमी एबीपी माझाने प्रसिद्ध केली आहे.

20 दिवसांच्या पगारावरून ही घटना घडल्याचं समजतं. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून त्यात डॉक्टरांचा मदतनीस डॉक्टरांवर दगडाने वारंवार हल्ला करत असल्याचं दिसतं.

कंपाऊंडरच्या हल्ल्यामध्ये डॉक्टरांच्या डोक्याला दुखापत झाली असून हातही मोडला आहे. हल्ल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

2. प्रवाशांचे प्राण वाचवल्यावरच सोडले ड्रायव्हरने प्राण

आग्रा-लखनौ मार्गावर प्रवासी बस चालवणाऱ्या ड्रायव्हरची तब्येत अचानक बिघडली. ही बस शाहगंज येथून दिल्लीला जात होती. कन्नौज सारिख भागातून पुढे जात असताना ही घटना घडली आहे.

ड्रायव्हरला बस चालवत असतानाच अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. या बसमध्ये 56 प्रवासी होते. ड्रायव्हरची तब्येत बिघडल्याचे पाहून प्रवाशांमध्ये घबराट पसरली. पण ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या बाजूला नेऊन गाडी थांबवली. काहीवेळातच त्याचा मृत्यू झाला. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

3. भगतसिंह कोश्यारी यांनी स्वीकारला गोव्याच्या राज्यपालपदाचा भार

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त भार स्वीकारला आहे. महाराष्ट्रात मराठीतून शपथ घेतली होती त्याप्रमाणे त्यांनी गोव्यात कोकणीमधून शपथ घेतली आहे. कोकणीतून शपथ घेणारे ते पहिलेच राज्यपाल आहेत.

एस. पी. मलिक यांची मेघालयच्या राज्यपालपदी बदली झाल्यानंतर गोव्याच्या राज्यपालपदाचा भार कोश्यारी यांनी स्वीकारला आहे.

मलिक यांची मेघालयला बदली झाल्याबद्दल गोव्यात अनेक प्रकारच्या चर्चा होत आहे. दोनापावलमध्ये नवं राजभवन बांधण्याला त्यांनी हरकत घेतली होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्यामध्ये मतभेद होते अशा चर्चाही होत आहेत. ही बातमी लोकमतने प्रसिद्ध केली आहे.

4. '4 महिन्यात 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या'

गेल्या 4 महिन्यात 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या असून 2 कोटी कुटुंबांचं भविष्य अंधःकारात आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे.

फेसबुकच्या माध्यमातून भ्रम पसरवून बेरोजगारी लपणार नाही तसंच अर्थव्यवस्थेचं झालेलं नुकसानही लपणार नाही अशा शब्दांमध्ये त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

लोकांच्या नोकऱ्या हिसकावल्या, आजवरची पुंजी तप्त केली, कोरोनाचा प्रसारही रोखता आला नाही फक्त खोटी स्वप्नं दाखवत राहिले, असं लिहून त्यांनी भारतात एप्रिलपासून किती नोकऱ्या गेल्या हे सांगणारी बातमी ट्वीट केली आहे. ही बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध झाली आहे.

5. महाराष्ट्रातल्या जिम सुरू करणे आवश्यक- सुप्रिया सुळे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही जिम सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिम बंद करण्यात आल्या आहेत. परंतु आता अनलॉकची प्रक्रिया सुरू असल्याने जिम पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे. राज्यातील अनेक जिमचालकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

तसंच या ट्वीटमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील सर्व व्यायामशाळांचे प्रतिनिधी रामदास इंगळे यांचं पत्र जोडलं आहे. ही बातमी लोकसत्ताने प्रसिद्ध केली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)