You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे बॉलिवुड असं ठप्प पडलंय
- Author, हारून राशिद
- Role, मनोरंजन प्रतिनिधी, बीबीसी एशियन नेटवर्क
कोरोनामुळे जग ठप्प झालेलं असताना त्याचा फटका बॉलिवुडलाही बसला आहे. बंद असलेली चित्रपटगृहं, रिकामे पडलेले फिल्म सेट्स आणि घरी बसलेले कलाकार…बॉलिवुड या निर्माण झालेल्या पोकळीशी झुंजत आहे.
मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जगभरातील बॉलिवुड फॅन्स अतिशय खूश होते, कारण रोहित शेट्टीचा बहुचर्चित 'सूर्यवंशी' 24 मार्चला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार होता.
'सूर्यवंशी'ला बंपर ओपनिंग मिळेल अशी अपेक्षा होती, कारण यादिवशी सरकारी सुट्टीही होती. मात्र कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला.
'सूर्यवंशी'चं प्रदर्शन अनिश्चित काळासाठी थांबविण्यात आलं. हे केवळं सूर्यवंशीसोबत झालं नाहीये.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
1983 साली भारतानं पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता. या विजयाचीच गोष्ट सांगणारा कबीर खानचा स्पोर्ट्स ड्रामा '83'ची प्रदर्शनाची तारीख 10 एप्रिल निश्चित झाली होती.
कपिल देवच्या भूमिकेत रणवीर सिंह दिसणार आहे, मात्र आता त्याची तारीखही पुढे गेली आहे. दिग्दर्शक कबीर खानने चित्रपटाचा रिलीज टळल्यानं आपण निराश झाल्याचं 'फिल्म कम्पॅनियन' या मनोरंजन पोर्टलशी बोलताना म्हटलं होतं.
"आमचा चित्रपट जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रचंड उत्सुक होतो. मात्र काही गोष्टी यापेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत. आज सगळं जग ठप्प झालं आहे. त्यामुळेच चित्रपट पाहणं हे आता सगळ्यात शेवटचं काम असेल."
शूटिंगही बंद
केवळ चित्रपटाच्या रिलीजवरच परिणाम झालाय, असं नाही. लॉकडाऊन जाहीर होण्याच्या आधी अभिनेत्री कंगना राणौत तामिळनाडूमध्ये आपला नवीन चित्रपट 'थलायवी' शूटिंग करण्यात येत आहे.
बॉलिवुड न्यूज वेबसाइट 'पिंकव्हिला'शी बोलताना कंगनाने सांगितलं, "मी तिथं 45 दिवस राहणार होतं. मात्र त्यानंतर आम्हाला शूटिंगसाठी लोकांना एकत्र करण्याची परवानगी नाही मिळाली. आम्ही शूटिंग थांबवलं आणि मी मुंबईला परत आले."
अभिनेत्री दीपिका पदुकोण स्वतःला नशीबवान समजते, कारण लॉकडाऊन सुरू होण्याच्या काही दिवस आधीच ती आपल्या नवीन चित्रपटाच्या शूटिंगसाठी श्रीलंकेला जाणार होती. तिने प्रसिद्ध सिनेसमीक्षक राजीव मसंद यांना दिलेल्या एका इंटरव्हयूमध्ये म्हटलं, "पण सुदैवानं आम्ही मुंबईतून बाहेर पडलो नाही आणि त्यामुळे बाहेर कुठे अडकलो नाही. मी अशा काही जणांना ओळखते ज्यांच्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण व्हायला काही दिवसच बाकी आहेत."
सोशल मीडियावरच्या रंजक पोस्ट
कायम शूटिंग, चित्रपट प्रमोशन, कार्यक्रमामध्ये बिझी असलेल्या कलाकारांना अचानक रिकामा वेळ मिळाला आहे. त्यांचे सोशल मिडिया अकाउंट्स पाहिले तरी ते हा रिकामा वेळ कसा घालवतायत, याची झलक पाहायला मिळते.
दीपिका आणि कटरिनानं जेवण बनवतानाचे तसंच अगदी झाडून काढताना, फरशी पुसतानाचे आपले व्हीडिओ सोशल मीडियावर टाकलेत.
दुसरीकडे, आलिया भट आणि हृतिक रोशन नवीन कौशल्य शिकताना दिसत आहेत. अर्थात काही स्टार्सना या गोष्टीचं गांभीर्य समजलं नाहीये आणि त्यांचं वर्तन असंवेदनशील असल्याची टीकाही काही जणांनी केली.
कलाकारांचा मदतीचा हात
चित्रपट दिग्दर्शक फराह खाननं इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ पोस्ट केला. त्यात त्यांनी बाहेर पडून वर्कआउट करणाऱ्या लोकांना खडसावलं. "जर तुम्ही वर्कआउटचे व्हीडिओ पोस्ट करणं बंद केलं नाही, तर मी तुम्हाला अनफॉलो करेन," अशी धमकीच फराहनं दिली.
फराह खानं यांनी म्हटलं, "तुम्ही सगळे अगदी खात्या-पित्या घरचे आहात आणि या एवढ्या संकटातही तुम्हाला तुमच्या फिगरची चिंता आहे. पण आमच्यापैकी अनेकांना चिंता करण्यासारखे इतरही विषय आहेत.
काही कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सना सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व समजावलं.
अभिनेता कार्तिक आर्यननं विनोदी व्हीडिओ पोस्ट करत लोकांना आपल्या घरातच राहण्याचं आवाहन केलं. इन्स्टाग्रामवर हा व्हीडिओ एक कोटीपेक्षा अधिक वेळा पाहिला गेलाय.
तर आयुष्मान खुरानाने डॉक्टरांचे आणि इतर आरोग्य सेवकांचे आभार मानले आहेत.
अक्षय कुमार आणि अनुष्का शर्मानं पंतप्रधान मोदी यांच्या पीएम केअर फंडला मोठी देणगी दिली.
इंडस्ट्रीमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियानं एक फंड बनवला आहे. या फंडासाठीही बॉलिवुड कलाकारांनी देणगी दिली आहे.
चित्रपटगृहांना प्रतीक्षा प्रेक्षकांची
लॉकडाऊन वाढवण्याचे संकेच मिळत असल्यानं चित्रपट निर्मातेही आगामी काळातील तरतूद करत आहे.
निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आपल्या मुघल काळावरील सिनेमा 'तख्त'चं शूटिंग एप्रिल महिन्यात करणार होते. त्यांच्या टीमने त्यासाठी युरोपमध्ये सेट उभारणीचं कामही सुरू केलं होतं.
राजीव मसंद यांच्याशी बोलताना करण जोहर यांनी सांगितलं, की भविष्याबद्दल आता अनिश्चितता आहे. "आम्ही इटलीमध्ये, स्पेनमध्येच शूटिंग करत होतो. त्यासाठी आम्ही दोन वर्षं मेहनत केली होती. मात्र सध्याच्या घडीला आपल्याला यापेक्षाही मोठ्या संकटाचा सामना करायचा आहे."
करण जोहरचे दोन चित्रपट रिलीजसाठी तयार आहेत आणि सात इतर चित्रपटांच्या प्रॉडक्शनचं काम सुरू आहे.
"ही परिस्थिती धर्मा प्रॉडक्शनची आहे. इतरही प्रॉडक्शनला कमी-अधिक फरकानं याचं समस्येला सामोर जावं लागतंय. लोक आता चित्रपटगृहात कधी परतणार याचीच प्रतीक्षा आहे."
चित्रपट व्यवसायाचे अभ्यासक सांगतात, की ज्या चित्रपटांचं प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आलंय, ते केव्हाही रिलीज झालं तरी त्यांना नुकसान झेलावं लागणार."
मात्र दिग्दर्शक कबीर खान आशादायी आहेत. चार महिन्यात बॉलिवूड सावरेल अशी आशा त्यांना आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)