You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
2019 Year End : बीबीसीच्या 13 बातम्या ज्यांनी गाजवलं 2019
2019 सालात तुम्ही वाचकांनी आणि प्रेक्षकांनी बीबीसी मराठीला भरभरून प्रतिसाद दिलात.
महाराष्ट्र, भारत आणि जगात घडणाऱ्या लक्षणीय गोष्टी सहज-सोप्या आणि डिजिटल स्वरूपात तुमच्यापर्यंत आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. यातल्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या किंवा तुम्ही कौतुक केलेल्या 10 बातम्यांची, मालिका एकत्रितपणे पुन्हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न.
1. बालाकोट ते कलम 370
14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये CRPF च्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 जवानांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा होत होता, असं भारताने म्हटलं आणि पाकिस्तानात असलेल्या दहशतवादी तळांना लक्ष्य करण्याच्या हेतूने 26 फेब्रुवारीला भारत-पाक सीमेलगत पाकिस्तानच्या हद्दीत असलेल्या बालाकोट इथल्या तळावर हल्ला केल्याचा दावा केला.
या घटनेनंतर जगभरातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. बीबीसीने या घटनेचं सीमेच्या दोन्ही बाजूने रिपोर्टिंग केलं. पाकिस्तानमधील जी जागा उद्ध्वस्त केल्याचा भारताने दावा केला होता त्या जागेवरून बीबीसीने केलेले हा ग्राउंड रिपोर्ट तुम्ही खाली दिलेल्या व्हीडिओमध्ये पाहू शकता.
जम्मू - काश्मीरमध्ये या वर्षात अनेक घडामोडी घडल्या. 5 ऑगस्ट 2019 ला केंद्र सरकारने कलम 370 रद्द करणारं विधेयक संसदेत मांडून जम्मू - काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतला आणि त्याचं दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केलं. या महिन्यात काश्मीरमध्ये संचारबंदी, इंटरनेटवर ब्लॅकआऊट अशा अनेक गोष्टी घडल्या.
अनेक काश्मिरींनी लष्कराकडून छळ होत असल्याचेही आरोप केले, . पाकिस्तानने भारताच्या या निर्णयावर कडाडून टीका केली. पण पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या काश्मीरची काय स्थिती आहे याचासुद्धा बीबीसीने शोध घेतला.
पाकिस्तान प्रशासित काश्मीर खरंच किती 'आझाद' आहे? याचंही वास्तव आम्ही तुमच्यापर्यंत आणलं. काश्मीरप्रश्नी अनेक वर्षं केंद्रस्थानी राहिलेल्या आणि अनेक दशकांपूर्वी काश्मीरमधील आपलं घर सोडून जावं लागलेल्या काश्मिरी पंडितांचाही दृष्टीकोन आम्ही जाणून घेतला.
2. रिअॅलिटी चेक
2019 चं वर्ष देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी निवडणुकांचं वर्ष ठरलं. दोन्ही निवडणुकांपूर्वी सत्ताधाऱ्यांनी तसंच विरोधकांनी अनेक दावे केले. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.
पण यातल्या किती गोष्टी मुद्द्याला धरून होत्या आणि किती गोष्टी निवडणुका डोळ्यापुढे ठेवून सोयीस्कर पद्धतीने लोकांसमोर मांडल्या गेल्या हा प्रश्न अनेकांना पडला. याच प्रश्नांची उत्तरं आणि या दाव्यांमधली सत्यासत्यता तुमच्यापर्यंत आणण्यासाठी बीबीसी मराठीने केला रिअॅलिटी चेक.
मॅग्नेटिक महाराष्ट्र, शिवस्मारक, मराठा आरक्षण यांच्यासारखे मुद्दे विधानसभा निवडणुकीत प्रचंड गाजले. निवडणुकीच्या प्रचारात केल्या गेलेल्या दाव्यांचा, आरोप-प्रत्यारोपांचा रिअॅलिटी चेक रिपोर्ट तुम्ही इथे वाचू शकता.
3. किसान मार्चच्या शेकूबाई आणि कर्जमाफी
वर्षं बदलली, ऋतु बदलले, सरकारं बदलली तरी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. कर्जमाफीची चर्चा गेली अनेक वर्षं सुरूच आहे. ती चांगली की वाईट, सोयीची की आवश्यक यांबद्दलही खूप चर्चा झाली.
पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना याचा किती लाभ झाला आणि याचा आधीच नाजूक अवस्थेत असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार याचा उहापोह आम्ही केला. 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीमुळे महाराष्ट्रात काय होईल याबद्दल तुम्ही या लेखातून जाणून घेऊ शकता.
गेला काही काळ शेतकऱ्यांचे प्रश्न वारंवार राज्यात केंद्रस्थानी येतात. पण ही चर्चा संपल्यानंतर हे प्रश्न आणि शेतकरी यांचा सर्वांना विसर पडतो अशी खंत अनेक जण बोलून दाखवतात.
ज्यांचे रक्ताळलेले पाय नाशिक-मुंबई किसान लाँग मार्चशी समानार्थी झाले होते त्या शेतकरी शेकूबाई वागले यांचं नंतर पुढे काय झालं हा प्रश्न अनेकांना होता, याचंच उत्तर शोधण्यासाठी बीबीसी मराठीची टीम पोहोचली शेकूबाई वागलेंकडे.
लाँग मार्चनंतर एक वर्ष जाऊनही शेकूबाई त्या कसत असलेली जमीन त्यांच्या नावे होण्याची वाट पाहत होत्या. बीबीसी मराठीने या परिस्थितीवर प्रकाश टाकल्यानंतर स्थानिक प्रशासनालाही जाग आली आणि काही दिवसांतच त्यांना मिळालेलं आश्वासन अखेर पूर्ण झालं. पण एवढ्यावर ही कहाणी संपत नाही.
सरकारी कागदपत्रांचा डोंगर पार केल्यानंतरच्या पहिल्या हंगामात स्वतःच्या मालकीच्या जमिनीत सुखाने पीक घेण्याचा योग शेकूबाईंना येणार नव्हता. अवकाळी पावसाने उभं पीक डोळ्यादेखत वाया जाताना शेकूबाईंनी पाहिलं. बीबीसी मराठीने याहीवेळी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांची हकिकत लोकांपर्यंत पोहोचवली. अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या कष्टांचं हे एक प्रातिनिधिक चित्र होतं.
4. ब्रेक्झिट आणि युके निवडणुका
गेली तीन वर्षं युकेमध्ये ब्रेक्झिटच्या मुद्द्यावरून अनिश्चिततेचं वातावरण आहे. 2019 साल उजाडलं ते सुद्धा ब्रेक्झिटच्या सावलीतच. ब्रेक्झिटमधून युके बाहेर पडणार हे निश्चित असलं तरी ही प्रक्रिया कधी होईल आणि कशी होईल याबद्दल प्रचंड अनिश्चितता होती.
याच मुद्द्यावर ब्रिटीश संसदेत सातत्याने गदारोळ झाला आणि पाच वर्षांत तिसऱ्यांदा निवडणुकाही झाल्या. ही गुंतागुंतीची प्रक्रिया मराठी जगतात आणण्याची जबाबदारी आम्ही नेटाने पार पाडली. ही त्याची काही उदाहरणं.
ब्रेक्झिटच्या मुद्द्यावरच ब्रिटनमध्ये डिसेंबरमध्ये निवडणुका झाल्या. आता तुम्ही विचाराल की, युके निवडणुकांचा आमच्याशी काय संबंध? पण लंडन आणि इतरत्र स्थायिक झालेल्या मराठी माणसांचा या निवडणुकांशी जवळचा संबंध होता.
आणि म्हणूनच आम्ही युकेमधील मराठी लोकांना या मुद्द्यांवर बोलतं केलं
5. 'पाण्याचा प्रश्न नाही तर स्त्रियांचा प्रश्न'
बीबीसी मराठीने सुरुवातीपासूनच महिलांचे प्रश्न आणि त्यांना महत्त्वाचे वाटणारे मुद्दे मांडण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे.
पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यात 18 वर्षांची यशोदा झोले पिण्याच्या पाण्यासाठी तिला कराव्या लागणाऱ्या कष्टांची कहाणी आम्हाला सांगत होती. BA करता करता पाण्यासाठी वणवण करणाऱ्या यशोदाची कहाणी बीबीसी मराठीच्या माध्यमातून जगभरात पोहोचली.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट होती निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांची. विनोदी शैलीतली त्यांची कीर्तनं ऐकल्यानंतर काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला, 'इंदोरीकरमहाराजांना महिलांशी काय प्रॉब्लेम आहे?' पण हा प्रश्न सोशल मीडियावर मांडलेल्या एका महिलेला प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं.
बीबीसी मराठीने या महिलेचा अनुभव जाणून घेतला आणि महिलांविषयीच्या 'आक्षेपार्ह' विधानांबद्दल खुद्द इंदोरीकर महाराजांनाही बाजू मांडण्याची संधी दिली. पण जेव्हा आमचे प्रतिनिधी तिथे पोहोचले तेव्हा काय घडलं, ते तुम्हाला या लिंकवर वाचायला मिळेल.
6. कुठे दुष्काळ तर कुठे महापूर
2019 या एकाच वर्षात महाराष्ट्राला दुष्काळाने सतावलं तसंच पुरानेही झोडपलं. उन्हाळ्याचा दाह पाणीटंचाई आणि त्यापाठोपाठ आलेल्या चाराटंचाईमुळे अधिक तीव्र झाला. पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी अनेक चर्चा झाल्या, बैठका झाल्या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काय स्थिती होती हेदेखिल आम्ही तुमच्यापर्यंत आणलं. सोलापूरजवळच्या चारा छावणीतून बीबीसी मराठीने केलेला हा ग्राउंड रिपोर्ट तुमच्या लक्षात असेल.
ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात पश्चिम महाराष्ट्राला जोरदार पाऊस आणि त्यापाठोपाठ आलेल्या पुराने हवालदिल केलं. अनेकांचं सर्वस्व यात वाहून गेलं. मोठ्या प्रमाणावर बचावकार्य आणि मदतकार्य सुरू असतानाच प्रत्यक्ष पुराने केलेल्या नुकसानाचा प्रत्यक्ष रिपोर्ताज आम्ही तुमच्यापर्यंत आणला.
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून या कुसुमाग्रजांच्या कवितेची आठवण करून देणारी ही कहाणी तुम्ही बीबीसी मराठीच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता.
7. 'आदर्श गावांचं' काय झालं?
'सांसद आदर्श ग्राम' च्या धर्तीवर महाराष्ट्रात आमदार आदर्श ग्राम योजना सुरू करण्यात आली होती. 2015 मध्ये ही योजना सुरू झाली, 2019 मध्ये निवडणुकीपूर्वी आम्ही ठरवलं की 4 प्रमुख नेत्यांच्या दत्तक गावांना भेटी द्यायच्या आणि पाहायचं की या गावांचा किती विकास झाला.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी या गावात चार वर्षांत काय बदललं आणि कुठल्या गोष्टी 'जैसे थे' आहेत याचा बीबीसी मराठीच्या टीमने आढावा घेतला.
यात पिण्याचं पाणी, वीजपुरवठा, स्वच्छतागृहं या बाबतीत गावात प्रगती झाल्याचं आढळून आलं पण जागोजाग खणलेले रस्ते आणि उघड्या नाल्या याबद्दल गावकरी नाराज असल्याचंही आमच्या निदर्शनास आलं. याबद्दलची सविस्तर बातमी तुम्ही इथे वाचू शकता. याशिवाय पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या दत्तक गावांचाही 'स्टेटस चेक' तुम्ही या बातम्यांमध्ये वाचू शकता.
8. विधानसभा निवडणूक
गेल्या दोन दशकांतली सगळ्यांत नाट्यमय विधानसभा निवडणूक महाराष्ट्राने 2019 साली पाहिली. निवडणुकीपूर्वी युतीचं तळ्यात-मळ्यात संपत नव्हतं, आघाडीतून नेत्यांची गळती सुरू होती, अनेक मातब्बर राजकीय घराण्यांची पुढची पिढी निवडणुकीच्या रिंगणात उतरत होती. पण या सगळ्यावर कडी केली ती निवडणूक निकालानंतर घडलेल्या नाट्याने.
सरकार कोण स्थापन करणार आणि ते कधी करणार याबद्दल कुठलीच स्पष्टता येत नसताना भाजपच्या गोटातून बराच काळ 'गोड बातमी' येण्याचं आश्वासन दिलं जात होतं. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपकडून बरेच प्रयत्न सुरू होते. इतर पक्षाच्या आमदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न अनेक पक्ष करत होते अशात, भाजपचे राज्यसभा खासदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बीबीसी मराठीकडे एक धक्कादायक खुलासा केला.
शिवसेनेचे काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचं सांगतानाच 'बाजारात अजूनही अनेक आमदार शिल्लक आहेत' असं म्हणत त्यांनी आमदार फोडाफोडीच्या राजकारणाची एक अप्रत्यक्ष कबुलीच देऊन टाकली. बीबीसी मराठीने सर्वप्रथम ही बातमी आपल्या वाचक आणि प्रेक्षकांसाठी आणल्यानंतर इतरही माध्यमांनी याचा पाठपुरावा घेतला.
त्याचवेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीबद्दलही अनेक अटकळी बांधल्या जात होत्या. शिवसेनेबरोबर आघाडी करण्यासाठी काँग्रेसच्या गोटातून अत्यंत आग्रहाने बाजू लावून धरणारे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही ही आघाडी आकार घेण्यापूर्वी तिच्या रूपरेषेबद्दल बीबीसी मराठीशी मोकळेपणे बातचित केली होती. शिवसेना शिष्टमंडळ राज्यपालांकडे गेलं तेव्हा इतर दोन्ही पक्षांनी त्यांना पाठिंब्याचं पत्र का दिल नव्हतं याबद्दलही त्यांनी खुलासा केला.
9. किस्से महाराष्ट्राचे
मराठी भाषिकांचं राज्य म्हणून महाराष्ट्राने यंदा साठीत पदार्पण केलं. 2019 च्या सुरुवातीपासूनच राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. गेल्या पाच वर्षांत काय घडलं काय घडलं नाही याची चर्चा सुरू होती.
पण सध्याच्या अनेक घटनांचे संदर्भ हे गेल्या सहा दशकांच्या इतिहासात सापडतात. हा सगळा पट उलगडून दाखवण्याच्या हेतूने बीबीसी मराठीने तुमच्यापर्यंत आणले 'किस्से महाराष्ट्राचे'. 10 अशा गोष्टी ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला, समाजकारणाला, अर्थकारणाला आणि अर्थातच सत्ताकारणाला आकार दिला.
महाराष्ट्राची निर्मिती, वेगवेगळ्या कारणांनी गाजलेले राज्याचे मुख्यमंत्री, बाबरीसारख्या घटनेचे महाराष्ट्रात उमटलेले पडसाद, आघाड्यांच्या राजकारणाचा महाराष्ट्रातला इतिहास या सगळ्याचा उहापोह आम्ही या किस्स्यांमध्ये केला. तुम्ही अजूनही हे वाचले किंवा पाहिले नसतील तर वर्षं संपण्याआधी हे सत्कार्य करून टाका!
10. लोकसभा निवडणूक
2019 मध्ये कडाक्याच्या उन्हाळ्यातच रंगला लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम. लोकसभा निवडणुकीची प्रत्येक बातमी आम्ही तुमच्यापर्यंत देशाच्या आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पोहोचवली. लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये रंगणाऱ्या सामन्याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं.
ममता बॅनर्जी विरुद्ध नरेंद्र मोदी या संघर्षात सरशी कोणाची होणार याचा आढावा बीबीसी मराठीच्या टीमने घेतला थेट कोलकात्यातून. इतकंच नाही तर पश्चिम बंगालमध्ये चिनी भाषेतून होणाऱ्या प्रचाराची आगळीवेगळी कहाणीसुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत आणली.
आणि या सगळ्याची ग्रँड फायनल ठरली ती म्हणजे निवडणूक निकालांचं कव्हरेज. मराठीत सर्वप्रथम तुमच्यापर्यंत आम्ही आणलं लोकसभा निवडणूक निकालांचं पूर्णपणे डिजिटल कव्हरेज. 9 तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या लाईव्ह कव्हरेजमध्ये आम्ही निकालाचे सर्व अपडेट्स आणि त्या निकालांचं विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचवलं.
11. क्रिकेट वर्ल्ड कप कव्हरेज
2019 चा क्रिकेट वर्ल्डकप अनेक अर्थांनी लक्षणीय ठरला. आजवर एकदाही विश्वविजेतेपदावर नाव कोरू न शकलेल्या दोन संघांनी अंतिम फेरी गाठली. मॅच टाय झाली आणि ते कमी होतं की काय म्हणून सुपर ओव्हरही टाय झाली. अखेर विश्वविजेतेपदाचा फैसला झाला कुणी जास्त चौकार मारले यावरून.
मैदानातला हा इतिहास सगळ्यांच्या लक्षात राहीलच आणि तितकाच त्याचा पूर्णतः डिजिटल अनुभवही तुच्या लक्षात राहिला असेल अशी आशा आहे. मराठीमध्ये पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषकाचं डिजिटल कव्हरेज भारतात न्यूजरूममधून आणि इंग्लंडमध्ये मैदानातून आणि सामन्यांच्या शहरांतून बीबीसी मराठीने केलं.
प्रत्येक मॅचनंतर त्याचं विश्लेषण करणारं फेसबुक लाईव्ह असो किंवा क्रिकेटमधल्या कठीणात कठीण भानगडी समजवून सांगणारे लेख आणि व्हीडिओज असोत बीबीसी मराठी दररोज तुमच्यापर्यंत एक नवी डिलीव्हरी आणत होतं आणि खुद्द लिटल मास्टर सुनील गावस्कर आणि पाकिस्तानचा घणाघाती बॅट्समन इंझमाम उल हक यांचे सामन्यापूर्वीचे इंटरव्ह्यू कोण विसरू शकेल?
वाचक-प्रेक्षकांच्या साथीने हा वर्ल्ड कप आमच्यासाठीही संस्मरणीय ठरला. आता तयारी ऑलिम्पिकची!
12. शिवस्मारक अजूनही कागदावरच
महाराष्ट्रात गेली काही वर्षं अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचा मुद्दा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिलाय. 2014 साली काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने या स्मारकाच्या उभारणीची घोषणा केली आणि तेव्हापासून घोषणा वारेमाप झाल्या, खर्चाचे आकडे फुगत गेले, जलपूजन झालं पण शिवस्मारक काही उभं राहिलं नाही.
हे स्मारक उभं राहण्यात नेमक्या अडचणी कुठे आहेत आणि त्याला पर्यावरणाच्या तसंच रोजगार आणि जीवनमनाच्या मुद्द्यावर विरोध का होतोय याचा सविस्तर लेखाजोखा आम्ही तुमच्यासमोर मांडला.
13. आरेची कारशेड स्थगित
मेगा सिटी मुंबईच्या मेट्रोचं काम गेली काही वर्षं सुरू आहे. पण 2019 मध्ये मेट्रोपेक्षा जास्त चर्चा झाली ती मेट्रोच्या प्रस्तावित कारशेडची. आरे जंगलात मेट्रोची प्रस्तावित कारशेड जाहीर झाल्यानंतर त्याला पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी, राजकीय पक्षांनी तसंच सामाजिक संस्थांनी कडाडून विरोध केला.
पाहता 'आरे बचाव' आंदोलन वाढत गेलं. इथले आदिवासी याला का विरोध करतात, विद्यार्थी तसंच नोकरदार लोक हिरीरीने या आंदोलनात का उतरले या सगळ्याचा आढावा आम्ही घेतला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)