You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बालाकोट हवाई कारवाईत किती ठार? अमित शाह यांच्या दाव्यावरून वाद
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भारताने पाकिस्तानातील बालाकोट इथं केलेल्या हवाई हल्ल्यात जैश ए मोहम्मदचे 250 कट्टरपंथी मारले गेले असा दावा केला आहे. पण भारत सरकारच्या वतीने अधिकृतरीत्या कोणतीही माहिती दिलेली नसताना अमित शाह यांनी भाजपच्या केलेल्या या वक्तव्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत.
विशेष म्हणजे भारतीय वायुसेनेचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी एका पत्रकार परिषदेत, 'आम्ही फक्त लक्ष्यभेद करतो, मृतांचे आकडे मोजत नाही,' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "अशा हल्ल्यांत किती जण मारले गेले ही आम्ही मोजू शकत नाही. हे आमचं काम नाही. किती लक्ष्य भेदले हे आम्ही सांगू शकतो. आम्हाला जे टार्गेट दिलं होतं ते आम्ही भेदू शकलो."
भाजपच्या वतीने या कारवाईत या कारवाईतील मृतांच्या संख्येबद्दल वक्तव्य करणारे अमित शाह पहिलेच नेते आहेत, हीसुद्धा विशेष बाब आहे.
अहमदाबाह इथं आयोजित एका प्रचारसभेत बोलताना शाह म्हणाले, "उरीनंतर आमच्या सैनिकांनी सर्जिकल स्टाईक केला. आमच्या सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेतला. पुलवामानंतर सर्जिकल स्टाईक होणार नाही, असं सर्वजण म्हणत होते. पण फक्त 13 दिवसांत आम्ही हवाई हल्ला केला, त्यात 250पेक्षा जास्त 'दहशतवादी' मारले गेले."
वायुसेनेच्या हल्ल्याचं भाजप राजकारण करत असल्याच्या आरोपाचा त्यांनी इन्कार केला.
शाह यांच्या दाव्यावर प्रश्न
शनिवारी इतर काही नेते आणि केंद्रीय मंत्री एस. एस. अहलुवालिया यांनी माध्यमांत अनधिकृत आकडे का दिले जातात, असा प्रश्न विचारला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी अधिकृतरीत्या कोणतीही संख्या सांगितली नसताना माध्यमं अनधिकृत आकडेवारी कशी सांगत आहेत, असा त्यांचा आक्षेप होता.
काही माध्यमांनी या कारवाईत 300 कट्टरपंथी मारले गेल्याच्या बातम्या दिल्या होत्या. त्यातच अमित शाह यांनी हा दावा केल्याने त्यावर विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
काँग्रेसचे नेते मनीष तिवारी म्हणतात, "वायुसेनेचे वरिष्ठ अधिकारी आर. जी. के. कपूर यांनी मृतांसंदर्भात काही आकडा जाहीर करणं घाईचं होईल, असं म्हटलं होतं. तर आता आमित शाह म्हणतात या कारवाईत 250 जण मारले गेले. हा हवाई हल्ल्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न नाही का?"
स्वाती चर्तुवेदी यांनी अमित शाह यांना ही संख्या कशी समजली, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
निधी राजदान यांनीही असाच प्रश्न उपस्थित केला आहे.
शमा मोहम्मद यांनी भाजप लष्कराचा उपयोग राजकीय फायद्यासाठी करत आहे, अशी टीका केली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही अमित शाह यांना लक्ष्य केलं आहे. "अमित शाह यांच्या मते लष्कर खोटं बोलत आहे का? निवडणुकीच्या फायद्यासाठी अमित शाह आणि भाजप लष्काराला खोटं ठरवत आहेत," असं ते म्हणाले.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)