पुलवामा : लष्कराचा ताफा जाताना सामान्य वाहतूक रोखणार - राजनाथ सिंह

काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर शुक्रवारी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली.

हल्ल्यात प्राण गमावलेल्या जवानांना श्रद्धांजली दिल्यानंतर आणि त्यांच्या पार्थिवाला खांदा दिल्यावर ते बोलत होते. पीडित कुटुंबियांची प्रत्येक प्रकारे मदत केली जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे.

सर्व मोठ्या अधिकाऱ्यांशी बोलणी केल्यानंतर त्यांनी योग्य कारवाईचे आदेश दिले आहेत. आमच्या लष्कराचं मनोधैर्य प्रबळ आहे आणि दहशतवादाविरोधात आपला जो लढा सुरू आहे त्यात आपल्याला यश नक्की मिळेल, असं राजनाथ सिंह म्हणाले.

"सीमेपलीकडून जे लोक दहशतवाद पसरवण्याचं काम करत आहे त्यांचे मनसुबे कधी पूर्ण होणार नाहीत. सीमेपलीकडील जहालवादी संघटना आणि ISI यांच्यासोबत इथल्या काही संघटनांचं साटंलोटं आहे आणि त्यामुळे जम्मू काश्मीरच्या जनतेचं भवितव्य धोक्यात येऊ शकतं."

काश्मीरमधील फुटीरतावादी संघटनांचे नाव न घेता ते म्हणाले, पाकिस्तान आणि ISI कडून पैसे घेणारे काही घटक या ठिकाणी आहेत. पाकिस्तान आणि ISI कडून पैसे घेणाऱ्या लोकांना मिळालेल्या सुरक्षेचं अवलोकन व्हायला हवं.

जेव्हा काश्मीरमधून लष्कराचचा ताफा जाईल तेव्हा सर्वसाधारण ट्राफिक थांबवलं जाईल, असंही ते म्हणाले.

राजनाथ सिंह यांनी शांततेसाठी आवाहन केलं आहे. "अशा वेळी धार्मिक तणाव वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. असा प्रयत्न करू इच्छिणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल."

हल्ल्यात जखमी झालेल्या सैनिकांना त्यांनी रुग्णालयात जाऊन भेट दिली.

तर ओमर अब्दुल्ला यांनी मात्र सैन्याच्या तफ्याच्या प्रवासावेळी सामान्य वाहतूक रोखण्यापेक्षा रेल्वेचा वापर करावा असा सल्ला राजनाथ सिंह यांना दिला आहे.

दरम्यान या हलल्यात ठार झालेल्या जवानांची संख्या 46 वर गेली आहे. जैश-ए-मोहम्मद या जहालवादी संघटनेनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

या हलल्या नंतर भारतानं पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना कडक शब्दांत समज दिली आहे.

परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त सोहेल महमूद यांना शुक्रवारी दुपारी दोन वाजता परराष्ट्र मंत्रालयात बोलावून ही समज दिली.

त्यावेळी गोखले यांनी पुलवामा हल्ल्याचा पाकिस्तानशी असलेल्या संबंधांवरून महमूद यांची कानउघडणी केली. पाकिस्ताननं जैश-ए-मोहम्मदविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.

अशा कुठल्याही संघटनेला खतपाणी घालू नये तसंच या संघटनांना पाकिस्तानच्या भूमीवरून हालचाली करू देऊ नये, असं परराष्ट्र सचिवांनी महमूद यांना सांगितलं.

राजनाथ सिंह घेणार बैठक

गृहमंत्री राजनाथ सिंह हे सुरक्षेचं अवलोकन करण्यासाठी एक बैठक घेणार आहेत. त्याचबरोबर ते फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि केंद्रीय एजन्सीच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहेत.

या हल्ल्याच्या तपासात सरकार काही कमी पडू देणार नाही, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

सरकारने सुरक्षा दलांसाठी निर्देश दिला आहेत की लष्करानं आपला ताफा वेगळ्या मार्गाने घेऊन जाऊ नये. दक्षिण काश्मीरमध्ये इंटरनेट बंद करण्यात आलं आहे आणि श्रीनगरमध्ये इंटरनेट स्पीड कमी करण्यात आला आहे.

फुटीरतावादी नेत्यांनी केला हल्ल्याचा निषेध

फुटीरतावादी नेते सैय्यद अली शाह गिलानी, मीरवाइज उमर फारूक आणि यासीन मलिक यांनी सैनिकांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.

काश्मीरमधील फुटीरतावादी संघटना जॉइंट रेसिस्टन्स लीडरशिप (JRL) नं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं की, "आम्ही आमच्या तरुणांच्या शवपेट्या रोज उचलतो. मृतांच्या कुटुंबीयांची स्थिती कशी असेल याचा आम्हाला अंदाज आहे. आम्ही त्यांचं दुःख समजू शकतो. हिंसा आणि प्रतिहिंसा थांबल्यानंतर काश्मीर वादाचं समाधान शक्य आहे."

चीनची प्रतिक्रिया

जैश-ए-मोहम्मदच्या म्होरक्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास चीनने पुन्हा एकदा नकार दिला आहे.

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात यावं असा प्रस्ताव भारतानं संयुक्त राष्ट्रांमध्ये केला आहे. त्या प्रस्तावावर सही करण्यास चीनने नकार दिला आहे.

पुलवामा हल्ल्याने आम्हाला जबर धक्का बसला असल्याचं चीननं म्हटलं आहे.

मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करायचे की नाही या प्रश्नाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं की अशा प्रस्तावांवर विचार करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. याबाबतीत या समितीचा निर्णय अंतिम राहील.

जम्मूमध्ये हिंसा

हल्ल्च्या घटनेनंतर जम्मूच्या काही भागंमध्ये लोकांनी विरोध आणि निदर्शनं केली. काही ठिकाणी जाळपोळ सुद्धा करण्यात आली. त्यामुळे जम्मूच्या काही भागांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसंच काही भागात लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे.

स्थानिक पत्रकार मोहीत कंधारी यांनी सांगितलं, डिव्हिजनल कमिश्नर संजीव वर्मा म्हणाले की स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जम्मू शहर आणि बाहेरच्या भागात तणाव निर्माण झाल्याने कर्फ्यू लावण्यात आला आहे.

अधिकारी आणि घटनेच्या साक्षीदारांनी सांगितलं की शुक्रवारी मुस्लीमबहुल भागात पार्किंगमध्ये ठेवण्यात आलेल्या गाड्यांना पेटवण्यात आलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)