'आम्ही केवळ कट्टरतावाद्यांनाच पाकिस्तानात जाऊन मारले,' इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचे स्पष्टीकरण

फोटो स्रोत, REUTERS
- Author, कॅरोलिन डेव्हिस
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from, इस्लामाबाद
इराणनं पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. बलुचिस्तानच्या नैऋत्य भागात हे हल्ले करण्यात आले होते.
इराणनं मंगळवारी (16 जानेवारी) केलेल्या या हल्ल्यांत दोन मुलं ठार आणि तीन जण जखमी झाली आहेत, असं पाकिस्ताननं म्हटलं आहे.
'हा हल्ला आम्ही पाकिस्तानी नागरिकांवर केला नव्हता तर केवळ आम्ही कट्टरतावाद्यांना यातून लक्ष्य केले आहे', असं इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दोल्लाहियन यांनी म्हटलं आहे.
जैश अल-अदल या दहशतवादी गटाशी संबंधित दोन तळांना लक्ष्य केल्याचं इराणनं सांगितल्याचं देशाच्या सैन्याशी संलग्न असलेल्या एका वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
तर, या बेकायदेशीर हल्ल्यांचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
इराक आणि सीरियावर हल्ले केल्यानंतर काही दिवसांतच इराणच्या हल्ल्याचा फटका बसणारा पाकिस्तान हा तिसरा देश ठरला आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं कठोर शब्दांत या हल्ल्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्ताननं काय म्हटलं?
मंत्रालयानं म्हटलंय की, "इराणनं विनाकारण हवाई हद्दीत केलेल्या उल्लंघनाचा तीव्र निषेध करत आहोत.”
"ही घटना संपूर्णपणे अस्वीकार्य असून पाकिस्तान आणि इराणमधील संवादाचे अनेक माध्यम अस्तित्वात असूनही हे बेकायदेशीर कृत्य घडले आहे हे त्याहून अधिक चिंताजनक आहे.
"दहशतवाद हा सामायिक शत्रू आहे आणि त्यावर एकतर्फी कारवाई चांगल्या शेजारी संबंधांसाठी पूरक नाहीत," असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.
पाकिस्ताननं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका संबंधित वरिष्ठ अधिकार्याकडे निषेध नोंदवला आहे.
"पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे हे उघड उल्लंघन आणि याच्या परिणामांची जबाबदारी पूर्णपणे इराणवर असेल," असं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, pakistan government
इराणनं आपल्या शेजारी पाकिस्तानवर केलेला क्षेपणास्त्र हल्ला अभूतपूर्व आहे. मंगळवारच्या हल्ल्यानं दोन देशांच्या सीमेवर असलेल्या बलुचिस्तान प्रांतातील एका गावाला फटका बसला.
दोन्ही देशांची सामायिक सीमा जवळपास 900 किमी आहे आणि या सीमेची सुरक्षा ही दोन्ही सरकारांसाठी दीर्घकाळापासून चिंतेची बाब आहे.
पाकिस्तान आणि इराणने जैश अल-अदलसह सारख्या सशस्त्र फुटीरतावादी गटांशी अनेक दशकांपासून लढा दिला आहे.
तेहराननं गेल्या महिन्यात इराणच्या सीमेजवळ झालेल्या हल्ल्यांशी या गटाचा संबंध जोडला आहे. या हल्ल्यात डझनभर इराणी पोलीस अधिकारी मारले गेले होते.
त्यावेळी इराणचे गृहमंत्री अहमद वाहिदी म्हणाले होते की, “या हल्ल्यासाठी जबाबदार दहशतवादी पाकिस्तानातून इराणमध्ये घुसले होते.”
इराणनं मंगळवारी इराकच्या उत्तरेकडील शहर इरबिलमधील लक्ष्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. अमेरिकेनं या हल्ल्याचा निषेध केला आहे.
इराणचा दावा काय?
इराणच्या लष्कराशी संबंधित एका वृत्तसंस्थेनं मंगळवारी सांगितलं की, इराणनं जैश अल-अदल या दहशतवादी गटाशी संबंधित दोन स्थळांवर हल्ला केला आहे.
इराणच्या सरकारी एजन्सी IRNA च्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमधील हल्ल्यासाठी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर करण्यात आला आणि हे हल्ले दहशतवाद्यांच्या दोन अड्ड्यांवर करण्यात आले.
या हल्ल्यात दहशतवादी गटाच्या मुख्यालयाला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा सरकारी माध्यमांमध्ये करण्यात आला आहे.
इराणचं म्हणणं आहे की, गेल्या महिन्यात सीमेजवळील रस्क शहरात एका पोलिस चौकीवर हल्ला करण्यात आला होता, ज्यामध्ये डझनहून अधिक इराणी पोलिस अधिकारी मारले गेले होते.
डॉन वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, जैश अल-अदलने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
इराणचे परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
'हा हल्ला आम्ही पाकिस्तानी नागरिकांवर केला नव्हता तर केवळ आम्ही कट्टरतावाद्यांना यातून लक्ष्य केले आहे', असं इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दोल्लाहियन यांनी म्हटलं आहे.
दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या परिषदेत त्यांनी हे सांगितले.
इराणचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, "तिथं जैश-अल आदल नावाचा इराणी कट्टरवादी गट होता, त्यांनी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात आश्रय घेतला होता. आम्ही त्याबद्दल पाकिस्तान आणि त्यांच्या संरक्षण दलांशी याबद्दल अनेकवेळा बोललो आहोत. त्या गटाच्या लोकांनी आमच्या संरक्षण दलातील लोकांना इराणमध्ये येऊन मारलं. त्याला आम्ही प्रत्युत्तर दिलं."
"आम्ही फक्त इराणी कट्टरवाद्यांना पाकिस्तानच्या भूमीत जाऊन मारलं. यापूर्वी मी पाकिस्तानच्या पराष्ट्रमंत्र्यांशी बोललो, आम्ही पाकिस्तान आणि इराकच्या सार्वभौमत्वाची आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर करतो असं मी त्यांना सांगितलं. परंतु आमच्या राष्ट्राच्या सुरक्षेशी छेडछाड खपवून घेतली जाणार नाही तसेच राष्ट्रहिताचा विषय आल्यावर आम्ही कारवाई करायला संकोच करत नाही," असं अब्दोल्लाहियन यांनी म्हटले आहे.
जैश अल-अदल काय?
यूएस डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्सच्या कार्यालयानुसार, “जैश अल-अदल हा सिस्तान-बलुचिस्तानमध्ये कार्यरत असलेला सर्वांत सक्रिय आणि प्रभावशाली सुन्नी दहशतवादी गट आहे.”
आधी या गटाचं नाव जुनदल्लाह असं होतं. पण, 2012 मध्ये या गटाचं नाव बदललं. नॅशनल इंटेलिजन्सच्या वेबसाइटनुसार, या गटाला 'पीपल्स रेझिस्टन्स ऑफ इराण' असंही म्हटलं जातंय
अब्दुल मलिक रेगी यांनी 2002-2003 मध्ये हा गट स्थापन केला आणि अनेक वर्षे ते त्याचे नेते राहिले.
2003 मध्ये इराणमधील सरकारी कार्यालयांवर हल्ले केल्यानंतर आणि माजी अध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा गट चर्चेत आला होता.
18 ऑक्टोबर 2009 रोजी या गटानं इराणच्या पिशिन शहरात हल्ला केला होता. पाकिस्तानातून सीमा ओलांडून आलेल्या आत्मघातकी बॉम्बरनं इराणी बलुच आदिवासी नेत्यांच्या बैठकीत बॉम्बस्फोट केला, असं इराणनं म्हटलं होतं. या बैठकीत इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे वरिष्ठ कमांडरही सहभागी झाले होते.
या हल्ल्यात देशाचे सर्वोच्च नेते आयतोल्लाह अली खामेनेई यांच्या जवळचे मानले जाणारे रिव्होल्युशनरी गार्ड्सचे उप-कमांडर नूर अली शुश्तारी मारले गेले होते.
या हल्ल्याने दोन्ही देशांमधील संबंधांची दिशाच बदलली होती.
अब्दुल मलिक रेगी यांना इराणनं अटक करून 2010 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर हा गट अनेक भागात विभागला गेला. यापैकी जैश अल-अदल सर्वांत प्रभावी गट म्हणून पुढे आला.
हा गट मुख्यतः इराणी सुरक्षा दलांना लक्ष्य करतो. तसंच सरकारी अधिकारी आणि सामान्य शिया मुस्लिमांवर देखील हल्ले करतो. या गटाच्या हल्ल्याच्या पद्धतींमध्ये गोळीबार, अपहरण, खून आणि आत्मघाती स्फोट यांचा समावेश आहे.
या गटानं सीमेवरील चेक पॉईंट आणि तेथून जाणाऱ्या वाहनांवरही लहान शस्त्रे आणि रॉकेटने हल्ले केले आहेत.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं, 4 नोव्हेंबर 2010 रोजी जुनदल्लाह गटाला परदेशी दहशतवादी संघटना घोषित केलं. नंतर यात सुधारणा करण्यात आली आणि 2019 मध्ये जैश अल-अदलचे नाव त्यात समाविष्ट करण्यात आलं.
बीबीसी न्यूजच्या प्रतिनिधी शुमायला जाफरी यांचं विश्लेषण
पाकिस्तानच्या भूमीत जैश अल अदल या कट्टरवादी गटाच्या कथित तळावर इराणने हल्ले केल्यानंतर मध्य-पूर्वेतील तणाव आता या प्रदेशाबाहेरही पसरल्याची भीती व्यक्त होत आहे. पाकिस्तानच्या सरकारने हे हल्ले झाल्याची आणि त्यात दोन मुलं मारली गेल्याचं स्पष्ट केलं आहे.
आपल्या 'सार्वभौमत्वाला धक्का' पोहोचवण्याची ही कृती पूर्णतः 'अस्वीकारार्ह' आहे आणि अशाप्रकारे आपल्या हवाई हद्दीत अकारण घुसखोरी केल्यास प्रत्युत्तर देईल अशी ताकीदही पाकिस्तानने दिली आहे.
जैश अल अदल हा सुन्नी कट्टरवाद्यांचा गट पाकिस्तान-इराण सीमेवर कार्यरत असून त्याला अमेरिका आणि इस्रायलचं पाठबळ आहे असं इराणचं म्हणणं आहे. इराणच्या संरक्षण दलांवर हल्ले केल्याची जबाबदारी या गटाने यापूर्वी अनेकवेळा घेतलेली आहे.
पाकिस्तानने जरी कठोर शब्दांत पत्रक प्रसिद्ध केलं असलं तरी पाकिस्तान जशास तसं 'प्रत्युत्तर' देण्यापासून स्वतःला रोखेल असं तज्ज्ञांचं मत आहे. इस्लामाबादमध्ये इराणच्या प्रभारी राजदुतांना बोलावून घडलेल्या घटनेबद्दल कठोर शब्दांत नापसंती व्यक्त करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
इराणीयन रिव्होल्युशन गार्डनी इराक आणि सीरियातील स्थळांवर हल्ले केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे हल्ले झाले आहेत. पाकिस्तानसाठी हा धक्का होता असं पाकिस्तानचे माजी मंत्री आणि परराष्ट्र धोरणतज्ज्ञ मुशाहिद सय्यद सांगतात.
“हे हल्ले होण्यापूर्वी काही तास आधीच इराणचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानच्या काळजीवाहू पंतप्रधानांना दावोसमध्ये अगदी खेळीमेळीच्या वातावरणात भेटले होते. या घटनेबद्दल दोन्ही देशांत कोणताही संवाद, ताळमेळ नसल्यामुळे पाकिस्तान अचंबित झाला आहे. माझ्या विश्लेषणानुसार याकडे इराणीयन रिव्होल्युशनरी गार्डची गुप्त मोहीम म्हणून आणि जरा मोठ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे.”
दावोसची ही भेटच नव्हे तर 16 जानेवारी रोजी दोन्ही देशांच्या नौदलांनी होर्मुजच्या सामुद्रधुनीत आणि तेथील आखातात सरावही केला होता असं आयआरएनए वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे.
मुर्शिद म्हणतात, हा हल्ला म्हणजे द्वीपक्षीय करारांचा भंग आणि आंतरराष्ट्रीय संकेतांचा भंग आहे. गाझामध्ये वंशच्छेद सुरू असताना इस्लामी एकतेचं महत्त्व आणखी क्षीण केल्यासारखं आहे.
आपलं वैफल्य इस्रायलच्या दिशेनं काढण्याऐवजी इराण मुस्लीम देशांवरच काढत आहे अशी टीकाही त्यांनी केली.
असं ढोंग आणि दुहेरी मापदंड लावण्याच्या वृत्तीवर कठोर टीका केली पाहिजे असंही ते म्हणाले.
इतिहासाकडे वळून पाहिल्यास पाकिस्तान आणि इराणमध्ये अनेक चढउतार आलेले आहेत. 1947 साली पाकिस्तानला देश म्हणून मान्यता देणारा तो पहिला देश होता आणि पाकिस्तानची परदेशातला दुतावास पहिल्यांदा तेथेच स्थापन झाला. दोन्ही देशांनी शीतयुद्धाच्या काळात एकमेकांना मदत केली आणि एकाच गटात राहिले.
1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात इराणने पाकिस्तानला पाठिंबा दिला. मात्र 1979 साली इराण क्रांतीनंतर आणि पाकिस्तान अफगाण जिहादच्या काळात सौदीपुरस्कृत वहाबी प्रवाहाकडे झुकल्यावर दोहोंमध्ये अविश्वास निर्माण झाला.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








