You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'नरेंद्र मोदींची RSS ची विचारसरणी भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये अडचण'-इम्रान खान
भारतात मोदी सरकार नसतं, तर दोन्ही (भारत आणि पाकिस्तान) देशांमधील समस्येवर मार्ग काढला गेला असता, असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं. इम्रान खान यांनी न्यूयॉर्क टाइम्सला मुलाखत दिली. त्यात त्यांनी असं म्हटलं.
इम्रान खान यांचं हे विधान पाकिस्तानातील माध्यमांनीही प्रसिद्ध केलं आहे आणि पाकिस्तानच्या माध्यमविश्वात याबाबत प्रचंड चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या आठवड्यात इम्रान खान यांनी 'एचबीओ एक्सिओज'ला दिलेली मुलाखत चर्चेत होती, तर या आठवड्यात न्यूयॉर्क टाइम्सला दिलेली मुलाखत चर्चेचं केंद्र बनलीय.
भारतासोबतच्या संबंधांबाबत न्यूयॉर्क टाइम्सच्या मुलाखतकारानं प्रश्न विचारला की, "भारतात मोदी वगळता तर कुणाचं सरकार असतं, तर पाकिस्तानचे भारतासोबतचे संबंध अधिक चांगले असते का?"
या प्रश्नावर उत्तर देताना इम्रान खान म्हणाले, "पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर बसल्यानंतर मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क केला होता. त्यांना मी सांगितलं होतं की, सत्तेत येण्याचा एकच उद्देश आहे तो म्हणजे पाकिस्तानातून गरिबी दूर करायचीय. त्यासाठी भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सामान्य आणि व्यावसायिक व्हायला हवेत. यामुळे दोन्ही देशांना फायदाच होईल."
इम्रान खान पुढे म्हणाले, "मोदी मानत असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा भिंतीसारखी अडथळा बनून उभी आहे आणि त्यामुळेच दोन्ही देशांमधील संबंध सुधारू शकले नाहीत."
भारतात मोदी सरकारव्यतिरिक्त इतर कुणाचं सरकार असतं, तर दोन्ही देशांनी संवादाच्या माध्यमातून काहीतरी मार्ग काढला असता, असंही इम्रान खान म्हणाले.
दरम्यान, इम्रान खान यांच्या या वक्तव्यावर भारतातून अद्याप कुठल्याही स्वरुपाची प्रतिक्रिया आलेली नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)