You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना अफगाणिस्तानच्या पत्रकारानं भारताच्या मुद्द्यावर कसं घेरलं?
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी अफगाणिस्तानमधील न्यूज चॅनेल 'टोलो न्यूज'ला दिलेली मुलाखत चर्चेचा विषय ठरली आहे. 'टोलो न्यूज'चे प्रमुख लोतफुल्लाह नझफिझादा यांनी ही मुलाखत घेतली आहे.
'टोलो न्यूज'नं या मुलाखतीतील अनेक व्हीडिओ क्लिप्स ट्विटरवर शेयर केल्या आहेत. यांतील प्रश्नांची उत्तरं देताना पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री गोंधळात पडल्याचं दिसून येतं.
या मुलाखतीत कुरैशी यांनी अफगाणिस्तानातील भारताच्या उपस्थितीविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत.
अफगाणिस्तानात भारताचे किती दुतावास आहेत, असा प्रश्न 'टोलो न्यूज'नं विचारल्यावर कुरैशी म्हणाले, "अधिकृतरित्या तर 4 आहेत, पण अनधिकृतरित्या किती आहेत ते तुम्ही सांगू शकाल. मला वाटतं की अफगाणिस्तानची सीमा भारताला लागून नाही. अफगाणिस्तानचा भारताशी एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून संबंध आहे."
ते पुढे म्हणाले, "दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंध आहेत. भारतासोबत द्विपक्षीय संबंध ठेवणं तुमचा अधिकार आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार होतो आणि यात मला काही अडचण नाहीये. पण, मला असं वाटतं की, अफगाणिस्तानात भारताची उपस्थिती ही जितकी पाहिजे त्याहून अधिक आहे, कारण दोन्ही देशांदरम्यान कोणती सीमा लागत नाही."
लोतफ़ुल्लाह यांनी तुम्हाला भारताची उपस्थिती त्रासदायक का वाटते, असं विचारल्यावर कुरैशी म्हणाले, "पाकिस्तानच्या जमिनीचा वापर पाकिस्तानच्याच विरोध केला तर ती अडचणीची गोष्ट आहे."
लोतफुल्लाह यांच्या एका प्रश्नावर कुरैशी गोंधळलेले दिसले.
तालिबानचे नेते हैबतुल्लाह अखुंदझादा, मुल्ला याकूब अथवा सिराजुद्दीन हक्कानी पाकिस्तानात नाहीयेत का, या प्रश्नावर कुरैशी म्हणाले, "हे तुम्ही तुमच्या सरकारला विचारा. तुम्ही आरोप करणं चालूच ठेवा."
कुरैशी यांना मधातच थांबवत लोतफुल्लाह यांनी म्हटलं, "गेल्या महिन्यात तालिबानचे नेते शेख अब्दुल हकीम अफगाणिस्तानात आपल्या नेत्यांशी चर्चा करायला आले होते. आपण पाकिस्तानातून आल्याचं त्यांनी सार्वजनिकरित्या सांगितलं होतं."
यावर कुरैशी यांनी हसतहसत म्हटलं की, "त्यांनी माझ्याशी संपर्क केलेला नव्हता. त्यामुळे मला याबाबत काही माहिती नाहीये."
त्यांनी पुढे म्हटलं, तालिबानलाही अफगाणिस्तानात शांतता हवी आहे.
यावर लोतफुल्लाह यांनी विचारलं की, तालिबानला अफगाणिस्तानात शांतता हवी हे तुम्हाला कसं माहिती?
कुरैशी यांनी यावर म्हटलं, "त्यांच्याशी चर्चा होत राहते. मी तालिबान आणि अफगाणिस्तान सरकारच्या चर्चेत सहभागी होऊ शकत नाही."
पण, अशी कोणतीही चर्चा झालेली नाहीये असं लोतफुल्लाह यांनी सांगितलं. तेव्हा कुरैशी यावर काही ठोस उत्तर देऊ शकले नाही.
त्यांनी म्हटलं, "अफगाणिस्तान अजून एक गृहयुद्ध सहन करू शकत नाही."
लोतफुल्लाह यांनी पुढे विचारलं की, डूरंड लाईनला (पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांना वेगळं करणारी सीमा) आंतरराष्ट्रीय सीमा मानायला हवं, यावर उत्तर देताना कुरैशी म्हणाले, "जर तुम्हाला पुढे जायचं आहे तर एका चांगल्या सहकाऱ्याप्रमाणे सहअस्तित्वाची भावना जपत डूरंड लाईनला आंतरराष्ट्रीय सीमेच्या रुपात स्वीकारलं गेलं पाहिजे."
तुम्ही यासाठी अफगाणिस्तान प्रशासनाशी चर्चा कराल का, असं विचारल्यावर कुरैशी म्हणाले, "मला असं वाटतं की तुम्ही देशांतर्गत राजकीय गोष्टींमुळे हे मान्य करणार नाही, पण ही सीमा तर निश्चितच आहे. माझ्या मते, डूरंड लाईन ही आंतरराष्ट्रीय सीमा आहे. यावर काही चर्चा करायची गरज नाहीये."
'टोलो न्यूज'नं घेतलेली ही संपूर्ण मुलाखत शनिवारी (19 जून) रात्री प्रसारित केली जाईल.
तालिबान आणि पाकिस्तानची मैत्री
तालिबान जोपर्यंत अफगाणिस्तानात होतं तोपर्यंत त्यांची देशातील स्थिती अत्यंत मजबूत अशी होती. पण 9/11 च्या हल्ल्यानंतर परिस्थिती बदलली आणि अफगाणिस्तानात लोकनियुक्त सरकार सत्तेवर आलं.
लोकनियुक्त सरकार आल्यानंतर पाकिस्तानची अफगाणिस्तानातील स्थिती कमकुवत झाली आणि पाकिस्तान भारताच्या उपस्थितीविषयी प्रश्न उपस्थित करत राहिला. पाकिस्तान फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप अफगाण सरकार सातत्यानं करत आलं आहे.
गेल्या महिन्यातच अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्लाह मोहिब यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी नाराजी दर्शवली होती.
"माझं रक्त सळसळत आहे," असं कुरैशी म्हणाले होते. मोहिब हे पाकिस्तानवर अफगाणिस्तानात अस्थिरता पसवण्याचा आरोप करत आले आहेत.
अमेरिका अफगाणिस्तानातील आपल्या सैन्याला परत बोलावत आहे. 11 सप्टेंबरला अफगाणिस्तानातून सगळे अमेरिकी सैन्य वापस येईल, अशी घोषणा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केली आहे.
11 सप्टेंबर याच दिवशी अल्-कायदानं अमेरिकेत हल्ला घडवून आणला होता. दुसरीकडे तालिबानच्या एका कमांडरने वृत्तसंस्था एएफपीला म्हटलंय की, अफगाणिस्तानचं सरकार जास्त दिवस टिकणार नाही.
20 वर्षं इथं वास्तव्य केल्यानंतर अमेरिका आणि ब्रिटिश सैन्य अफगाणिस्तान सोडत आहे. एप्रिल महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी घोषणा केली होती की, अडीच-तीन हजार सैनिक 11 सप्टेंबरपर्यंत परत येईल. ब्रिटनही आपल्या 750 सैनिकांना परत बोलावत आहे.
अल्-कायदा या संघटनेनं 9/11चा हल्ला अफगाणिस्तानातून केला होता, असं अमेरिकेला वाटतं. यानंतर अमेरिकेच्या नेतृत्वात नियोजनबद्धरित्या अफगाणिस्तानातून तालिबानला सत्तेवरून हटवण्यात आलं आणि अल्-कायदाला बाहेर करण्यात आलं.
ड्युरंड लाइन
अफगाणिस्ताननं ड्युरंड लाईनला आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मान्यता दिलेली नाहीये. अफगाणिस्तान हे पाकिस्तान लगतची सीमा आणि सिंधु नदीशेजारील काही भागांवर आपला दावा सांगत आलं आहे.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये सीमा वादाचं मूळ 19व्या शतकापासूनचं आहे. ब्रिटिश सरकारनं भारताच्या उत्तर भागावर आपलं नियंत्रण मजबूत करण्याच्या उद्देशानं 1893मध्ये अफगाणिस्तानासोबत 2640 किमीची सीमारेषा आखली होती.
हा करार ब्रिटिश इंडियाचे तत्कालीन परराष्ट्र सचिव सर मॉरिटमर ड्युरंड आणि अमिर अब्दुर रहमान खान यांच्यात काबुलमध्ये झाला होता. याच रेषेला ड्युरंड लाईन म्हटलं जातं. ही रेषा पश्तून प्रांतातून जाते.
ड्युरंड लाईन करारानुसार अफगाणिस्तानाला काही जिल्हे सोडावे लागत होते. यात स्वात, चित्राल आणि चागेल यांचा समावेश होता. याबदल्यात नुरिस्तान आणि अस्मार हे जिल्हे अफगाणिस्तानला मिळणार होते. या जिल्ह्यांवर अफगाणिस्तानचं नियंत्रण नव्हतं.
या करारामुळे पहिल्यांदाच अफगाणिस्तान आणि भारताच्या दरम्यान सीमारेषा आखण्यात आली. डूरंड लाईन करारापूर्वी भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान कोणतीही सीमा नव्हती.
कॉपी - रजनीश कुमार
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)