भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप 2019 LIVE: भारताचा पाकिस्तानवर 89 धावांनी विजय

वर्ल्ड कप स्पर्धेतील बहुचर्चित लढतीत टीम इंडियाने पाकिस्तानवर 89 धावांनी विजय मिळवला. 140 धावांसह भारताचा डाव रचणारा रोहित शर्मा सामनावीर ठरला.

भारताने प्रथम फलंदाजी करताना 336 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकिस्तानने सहा गडी गमावून 212 धावा केल्या. पावसामुळे लावण्यात आलेल्या डकवर्थ लुईस मेथडनुसार टीम इंडियाने 89 रन्सने बाजी मारली.

रोहित शर्माने 140 धावांची खेळी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. गोलंदाजीत विजय शंकर, हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

त्यानंतर जगभरातल्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. पाहा मँचेस्टरमधली दृश्यं

पाकिस्तानचा डाव

टीम इंडियाने दिलेल्या 337 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव काही काळ स्थिरावल्यानंतर कोसळू लागला आहे. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा पाकिस्तानच्या 6 बाद 116 धावा झाल्या आहेत.

भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त झाल्याने पाचारण करण्यात आलेल्या विजय शंकरने पहिल्याच बॉलवर इमाम उल हकला आऊट केलं. त्याने 7 धावा केल्या.

22 ओव्हर्समध्ये एका विकेटच्या मोबदल्यात शंभरी गाठली. चहलच्या गोलंदाजीवर षटकार खेचत फखर झमनने अर्धशतक पूर्ण केलं.

पण त्यानंतर पाकिस्तानच्या एकामागून एक तीन विकेट पडल्यामुळे पाकिस्तानची 129 वर पाच विकेट, अशी अवस्था झाली. यापैकी एक विकेट चहलच्या फिरकी बॉलवर गेली तर दोन हार्दिक पांड्याने टाकलेल्या भेदक बॉल्सवर गेल्या.

विजय शंकरने पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमदला त्रिफळाचीत केलं. त्याने 12 धावा केल्या.

मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे भुवनेश्वनर पॅव्हेलियनमध्ये परतला. डाव्या पायाच्या मांडीचे स्नायू दुखावल्याने भुवनेश्वर या सामन्यात खेळू शकणार नाही असं समालोचकांनी सांगितलं.

भुवनेश्वरने 2.4 ओव्हर्समध्ये 8 रन्स देत पाकिस्तानच्या फखर झमन आणि इमाम उल हक यांना जखडून ठेवलं होतं. मात्र दुखापत गंभीर असल्याने तो या सामन्यात खेळू शकणार नाही.

दरम्यान मँचेस्टर पुढच्या दोन तासात पाऊस पडणार नाही असं इंग्लंडमधील वेधशाळेनं म्हटलं आहे. आमचे प्रतिनिधी विनायक गायकवाड यांचं ट्वीट -

दिनेश कार्तिकऐवजी विजय शंकरला प्राधान्य देण्यात आल्याने अनेकांनी टीका केली. जाणून घ्या कोण आहे विजय शंकर?

वर्ल्ड कप मध्ये पहिल्याच बॉलवर विकेट मिळवणारा विजय हा केवळ तिसरा बॉलर आहे. बर्म्युडाचा मलाची जोन्स आणि ऑस्ट्रेलियाचा इयान हार्वे यांनी आधी हा पराक्रम केला होता.

भारताचा डाव

थोडा काळ पावसाने व्यत्यय आणल्यानंतरही भारताचा डाव अखेर पूर्ण झाला. रोहित शर्माचं शतक तसंच लोकेश राहुल आणि विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर टीम इंडियाने पाकिस्तानला 337 धावांचं लक्ष्य दिलं आहे.

पावसामुळे आलेल्या ब्रेकपूर्वी पाकिस्तानविरुद्ध मजबूत सुरुवात करत भारताने 300चा पल्ला पार केला होता. रोहित शर्माचं शतक तसंच लोकेश राहुल आणि विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर टीम इंडियाने 300 धावा पूर्ण केल्या आहेत. पावसाचं आगमन झालं तेव्हा भारताच्या 46.4 ओव्हर्समध्ये 4 बाद 305 धावा झाल्या होत्या.

अखेर सामना पुन्हा सुरू झाला आणि भारताने कोहलीची विकेट गमावत 336-5 असा डाव संपवला.

पाहा मँचेस्टरमध्ये आलेल्या या पावसामुळे कसा आहे स्टेडिअमबाहेरचा माहोल? बीबीसी मराठी प्रतिनिधी विनायक गायकवाड सांगत आहेत -

आमच्या मंडळींचं विश्लेषण

तुम्हाला काय वाटतं?

आतापर्यंत काय झालं?

रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी वनडेत पहिल्यांदाच एकत्र ओपनिंग करत पाकिस्तानविरुद्ध 18 ओव्हर्समध्ये शतकी ओपनिंग करून दिली.

शिखर धवन हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे खेळू शकत नसल्याने राहुलला चौथ्या क्रमांकावरून सलामीला बढती देण्यात आली आहे. लोकेश राहुल मात्र 57 धावा करून आऊट झाला. वहाब रियाझच्या बॉलिंगवर बाबर आझमने त्याचा कॅच टिपला. राहुलने 3 चौकार आणि 2 षटकारांसह 57 धावांची खेळी केली.

रोहित शर्माने शदाब खानच्या बॉलिंगवर बाऊंड्री लगावत अर्धशतक पूर्ण केलं. दहाव्या ओव्हरमध्ये चोरटी धाव घेण्याचा रोहित-राहुलचा प्रयत्न फसला होता मात्र फखर झमनने राहुलच्या दिशेने थ्रो केल्याने रोहितला जीवदान मिळालं.

मग रोहितने शदाब खानच्या बॉलिंगवर एकेरी धाव घेत करिअरमधलं 24वं तर पाकिस्तानविरुद्धचं दुसरं शतक झळकावलं. एकेरी, दुहेरी धावा आणि चौकार, षटकार यांची सुरेख सांगड घालत रोहितने ही खेळी साकारली.

मात्र तो शेवटपर्यंत पिचवर टिकला नाही. हसन अलीने रोहितला आऊट केलं. रोहितने 14 चौकार आणि 3 षटकारांसह 140 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली.

कॅप्टन विराट कोहलीनेही आपलं अर्धशतक पूर्ण केलं आणि त्यानंतर लगेचच हार्दिक पांड्याने बाऊंड्रीवर एक सोपा झेल दिला. मोहम्मद आमिरच्या बॉलिंगवर बाबर आझमने त्याचा कॅच घेतला.

कोहलीने वनडेत 11,000 धावांचा टप्पाही गाठला.

महेंद्रसिंग धोनी एक धाव करून तंबूत परतला. आमिरनेच त्याला आऊट केलं.

मुंबईत जल्लोष

मुंबईत भारत-पाकिस्तान मॅचचा आनंद लुटणाऱ्या फॅन्सशी आमच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनी केलेली बातचीत

शिखर धवनच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली असल्याने तो या सामन्यात खेळणार नाही. त्याच्याऐवजी विजय शंकरला संधी देण्यात आली आहे.

पाकिस्तानने असिफ अली आणि शाहीन शाह आफ्रिदी यांच्याऐवजी इमाद वासिम आणि शदाब खान यांना संघात समाविष्ट केलं आहे.

मॅचआधीचं विश्लेषण

भारताविरुद्धच्या महत्त्वपूर्ण वर्ल्ड कप लढतीत पाकिस्तानने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. इथून या मॅचविषयी काय वाटतंय?

मॅँचेस्टरमध्ये भारत पाकिस्तान सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सामन्यापेक्षा तिथल्या हवामानाची चर्चा जास्त आहे. बीबीसी मराठी प्रतिनिधी विनायक गायकवाड यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार सध्या तिथे ढगाळ वातावरण आहे. पाऊस नसला तरी ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. आज सकाळनंतर पाऊस पडलेला नसला तरी बारानंतर पाऊस पडण्याची वेधशाळेने वर्तविली आहे.

भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंगने बीबीसी उर्दूला मुलाखत दिली. त्याच्यामते सध्या मैदान ओलं आहे.

भारताचा माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत भारतासमोर विजयासाठी दबाव असल्याचं म्हटलं आहे. तसंच पाकिस्तानसाठीही ही मॅच अटीतटीची असल्याचं ते म्हणाले.

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक यांनी या सामन्याकडे फक्त खेळ म्हणून पाहायला हवं असं मत व्यक्त केलं.

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांना नमवत दमदार सुरुवात केली आहे. दुसरीकडे पाकिस्तानला वेस्ट इंडिजविरुद्ध मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर पाकिस्तानने यजमान इंग्लंडला हरवत दणका दिला.

पाकिस्तानची श्रीलंकेविरुद्धची लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. ऑस्ट्रेलियाविरुद्धही पाकिस्तानला पराभवालाच सामोरं जावं लागलं. यामुळे पाकिस्तानची आतापर्यंतची वाटचाल रोलर कोस्टर राईडसारखी झाली आहे.

आता क्रिकेटमध्य मनोबलाला जास्त महत्त्व- इम्रान खान

माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत-पाक सामन्याच्या पार्श्वभूमिवर ट्वीट्स केले आहेत. पहिल्या ट्वीटमध्ये त्यांनी क्रिकेटमध्ये मनोबलाला अधिक महत्त्व असल्याचे लिहिले आहे.

आपल्या ट्वीटमध्ये ते लिहितात, जेव्हा मी क्रिकेट खेळायला सुरूवात केली तेव्हा 70 टक्के महत्त्व उपजत कौशल्याला महत्त्व होतं आणि 30 टक्के महत्त्व मनोबलाला होतं. मी जेव्हा क्रिकेट थांबवलं तेव्हा त्याचं प्रमाण 50-50 झालं होतं. पण आता ते 60 आणि 40 टक्के झाल्याच्या गावस्कर यांच्या म्हणण्याशी मी सहमत आहे. मनोबलाला आता 60 टक्के महत्त्व आलं आहे.

आज दोन्ही संघांवर मोठा मानसिक दबाव असेल आणि त्यांचं मनोबलच सामन्याचा निकाल ठरवेल. सर्फराजसारखा कॅप्टन आम्हाला मिळाला आहे. आज तो धाडसी कामगिरी करेल. असंही ट्वीट त्यांनी केलं आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संघाला दिलेल्या गुरुमंत्रासाठी वाचा IND v PAK वर्ल्ड कप 2019: इम्रान खान यांनी पाकिस्तान टीमला दिले हे 5 गुरुमंत्र

हेड टू हेड

भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान आतापर्यंत 131 सामने झाले असून, भारताने 54 तर पाकिस्तानने 73 सामने जिंकले आहेत. 4 सामने रद्द झाले आहेत.

एकूण रेकॉर्डमध्ये पाकिस्तानची बाजू उजवी आहे मात्र वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान लढतींमध्ये भारताने 6-0 असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे.

शिखरच्या जागी लोकेश राहुल?

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पॅट कमिन्सचा चेंडू हाताच्या बोटाला लागल्याने शिखर धवन दुखापतग्रस्त झाला होता. शिखर स्पर्धेबाहेर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आयसीसी स्पर्धांमध्ये शिखरची कामगिरी लक्षात घेत संघ व्यवस्थापनाने त्याला संघाबरोबर ठेवण्याचा निर्णय घेतला.

शिखरच्या ऐवजी दुसऱ्या खेळाडूची निवड झाली तर शिखर पुन्हा स्पर्धेत खेळू शकणार नाही हे ठाऊक असल्यानं टीम इंडियाने शिखरला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, इंज्युरी कव्हर म्हणून ऋषभ पंत भारतातून रवाना झाला आहे. मात्र तो अधिकृत संघाचा भाग नाही. शिखर धवनच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल आणि रोहित शर्मा सलामीला येण्याची शक्यता आहे.

राहुलने ओपनर म्हणून पदार्पण करताना शतकी खेळी साकारली होती मात्र त्यानंतर रोहित-शिखर सलामीला येत असल्याने राहुलला मधल्या फळीत खेळवण्यात आलं होतं. शिखरच्या अनुपस्थितीत राखीव ओपनर म्हणून खेळणाऱ्या राहुलवर मोठी जबाबदारी आहे. रोहित-राहुल यांनी एकत्र ओपनिंग केलेलं नाही. त्यामुळे टीम इंडियाला सलामीला नवी जोडी दिसू शकते.

चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार?

लोकेश राहुलला सलामीला बढती मिळाल्यास चौथ्या स्थानी कोण खेळणार हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दिनेश कार्तिककडे प्रदीर्घ अनुभव आहे. मधल्या फळीत तो उपयुक्त ठरू शकतो.

विजय शंकर हा अष्टपैलू पर्याय टीम इंडियाकडे आहे. विजयचं तंत्रकौशल्य उत्तम आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. तो गोलंदाजीही करू शकतो. विजयचं क्षेत्ररक्षणही चांगलं आहे. विजयचा समावेश झाल्यास टीम इंडियाला गोलंदाजीत अतिरिक्त पर्याय मिळू शकतो.

महेंद्रसिंग धोनी चौथ्या क्रमांकावर येऊ शकतो. तसं झाल्यास रवींद्र जडेजा किंवा मोहम्मद शमी यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. हार्दिक पंड्या उत्तम फॉर्मात आहे. त्याला चौथ्या क्रमांकावर बढती देण्यात आली तर धावफलक हलता राहू शकतो.

कोहलीवर जबाबदारी

शिखरच्या अनुपस्थितीत सलामीला नवी जोडी असल्याने तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या कर्णधार विराट कोहलीवर मोठी जबाबदारी आहे.

चार वर्षांपूर्वी वर्ल्ड कप लढतीत विराट कोहलीने शतकी खेळी साकारली होती. या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी कोहली आतूर आहे.

बुमराहवर लक्ष

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. बुमराह जबरदस्त फॉर्मात असून त्याच्या गोलंदाजीचा सामना करणं भल्याभल्या फलंदाजांसाठी डोकंदुखी झालं आहे. धावा रोखणं आणि विकेट्स मिळवणं या दोन्ही आघाड्या बुमराह समर्थपणे सांभाळत आहे.

बुमराहच्या दहा ओव्हर्स कोणताही धोका न पत्करता खेळून काढण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असेल. इमाम उल हक आणि फखर झमन या सलामीवीरांना रोखण्याचे बुमराहचे डावपेच असतील.

कुलचावर विश्वास का शमी/जडेजा खेळणार?

युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव ही जोडगोळी चांगली कामगिरी करत आहे. कुलदीपच्या ऐवजी रवींद्र जडेजा किंवा मोहम्मद शमी यांना संधी देण्याचा विचार होऊ शकतो.

बाबर आझमवर पाकिस्तानच्या आशा

विराट कोहलीप्रमाणे माझ्या इनिंग्जची आखणी करतो असं वक्तव्य बाबर आझमने केलं आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा बाबर पाकिस्तानसाठी महत्त्वाचा आहे. मजबूत तंत्रकौशल्य, भात्यात विविध फटक्यांची पोतडी, डाव उभारण्याची हातोटी हे बाबरच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य.

बाबरला सूर गवसला तर तो मोठी खेळी करतो. बाबरच्या बरोबरीने इमाम उल हक आणि फखर झमन या सलामीच्या जोडगोळीकडून पाकिस्तानला दमदार सलामीची अपेक्षा आहे.

स्विंगचे सौदागर

पाकिस्तानला स्विंग बॉलिंगचं आगार असं म्हटलं जातं. मोहम्मद आमिर पुनरागमनानंतर नव्या त्वेषाने गोलंदाजी करतो आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आमिरने पाच विकेट्स घेत कारकीर्दीतील सर्वोत्तम प्रदर्शनाची नोंद केली आहे. आमिर, हसन अली, वहाब रियाझ हे स्विंग आणि वेग यांचं अनोखं मिश्रण आहे. टीम इंडियाला त्यांच्यापासून सावधान राहावं लागेल.

अनुभवी शिलेदार

मोहम्मद हफीझ आणि शोएब मलिक हे अनुभवी खेळाडू पाकिस्तानसाठी निर्णायक ठरू शकतात. शोएब मलिकची भारताविरुद्धची कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे. हफीझकडे भारताविरुद्ध खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.

खेळपट्टी आणि पाऊस

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना साऊदॅम्पटनला खेळला होता. दुसरा सामना ओव्हल इथं झाला होता. न्यूझीलंडविरुद्धची लढत नॉटिंगहमला होती. मात्र ती पावसामुळे रद्द झाली. आता भारतीय संघासमोर मँचेस्टरच्या खेळपट्टीचं आव्हान आहे. या स्टेडियमवरची ही पहिलीच मॅच आहे.

मँचेस्टरला रविवारी सूर्यप्रकाश असेल अशी चिन्हं आहेत मात्र पावसाच्या सरीही अपेक्षित आहेत.

संघ

भारत-विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, विजय शंकर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार.

पाकिस्तान- सर्फराझ अहमद (कर्णधार), इमाम उल हक, फखर झमन, बाबर आझम, आसिफ अली, हॅरिस सोहेल, हसन अली, इमाद वासिम, मोहम्मद आमिर, मोहम्मद हफीझ, मोहम्मद हसनैन, शदाब खान, शाहीन आफ्रिदी, शोएब मलिक, वहाब रियाझ.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)