You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IND v PAK वर्ल्ड कप 2019: इम्रान खान यांनी पाकिस्तान टीमला दिले हे 5 गुरुमंत्र
1992 साली पाकिस्तानला वर्ल्ड कप जेतेपद जिंकून देणारे कर्णधार इम्रान खान यांनी संघाला ट्वीटच्या माध्यमातून सल्ला दिला आहे.
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना, तो ही विश्वचषकाचा म्हटल्यावर कुठलाही हाडाचा क्रिकेट चाहता त्यापासून दूर राहू शकत नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचाही त्याला अपवाद नाही. त्यांनी पुन्हा एका क्रिकेटरच्या भूमिकेत शिरत ट्विटरवरून आपल्या टीमला शुभेच्छा आणि काही टिप्स दिल्या आहेत.
आज गुणवत्तेपेक्षा मानसिक कणखरता विजयासाठी जास्त आवश्यक असेल, असं त्यांनी म्हटलं आहे. भारताचं पारडं जड असलं तरी पाकिस्तानने न घाबरता खेळावं आणि जोही निकाल येईल तो खिलाडूवृत्तीनं स्वीकारावा, असं इम्रान यांनी सल्ला दिला आहे.
इम्रान हे पंतप्रधान बनण्याआधी क्रिकेटर म्हणून जगाला माहिती आहेत. 1992 साली इम्रान यांच्या नेतृत्त्वाखालीच पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषकात अविस्मरणीय विजय मिळवला होता.
"मी क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली तेव्हा यशासाठी 70 टक्के गुणवत्ता आणि 30 टक्के मानसिक ताकदीची गरज असते यावर माझा पूर्ण विश्वास होता. मी क्रिकेटमधून निवृत्त झालो तेव्हा मला वाटलं हे प्रमाण 50-50 टक्के असायला हवं. पण आता मी माझा मित्र सुनील गावस्करसोबत सहमत आहे - 60 टक्के कणखरता आणि 40 टक्के गुणवत्ता. आज मनाची भूमिका 60 टक्क्यांहून जास्त राहील."
दोन्ही टीम्सवरच्या दबावाकडे इम्रान लक्ष वेधून घेतात. "आजच्या सामन्याचं महत्त्व पाहता दोन्ही संघांवर भरपूर मानसिक दबाव राहील. मनाची शक्तीच या सामन्याचा निकाल ठरवेल. सरफराझच्या रूपानं आपल्याला एक धाडसी कर्णधार मिळाला आहे, हे आपलं नशीब आहे आणि त्याला आज सर्वोत्तम धाडस दाखवावं लागेल."
"आज हरण्याची सगळी भीती मनातून काढून टाकावी लागेल कारण मन एकावेळी एकच विचार करू शकतं. पराभवाच्या भीतीतून नकारात्मक आणि बचावात्मक डाव आखले जातात आणि प्रतिस्पर्ध्यांच्या चूकांचा फायदा घेतला जात नाही."
पाकिस्तानच्या टीमला सल्ला देताना इम्रान यांनी म्हटलं आहे, "विजय मिळवून देईल अशी आक्रमक योजना आखण्यासाठी सरफराझनं स्पेशलिस्ट बॅट्समन आणि बोलर्सवर भर द्यायला हवा. कारण 'रेलू कट्टा' दबावाखाली क्वचितच चांगली कामगिरी बजावतात - विशेषतः आजच्या सामन्यात जिथे दबाव आणखी वाढलेला असतो."
'रेलू कट्टा' हा पाकिस्तानी क्रिकेटमध्ये, विशषतः पाकिस्तान सुपर लीग या IPLसारख्या स्पर्धेत प्रचलित झालेला शब्द आहे. संघात केवळ जागा भरणारे, फार चांगली कामगिरी नसणारे खेळाडू म्हणजे 'रेलू कट्टा'. भरकटलेल्या वासरासारखे कुठल्याही कळपात जाऊन फक्त जागा भरणारे अशा अर्थानं हा शब्द वापरला जातो. अशा खेळाडूंपेक्षा विशेषज्ञांची गरज असल्याचं इम्रान सांगतात.
इम्रान यांनी खेळपट्टी फार ओलसर नसेल तर सरफराझला टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारावी लागेल, असं म्हटलं आहे.
दरम्यान, पाकिस्तानने टॉस जिंकला असून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इम्रान खान यांचा सल्ला मानत आता पाकिस्तानने भारतीय संघाला आधी बॅटिंगचं आमंत्रण दिलं आहे.
"शेवटी, भारताचं पारडं जड असलं, तरी मनातून पराभवाची भीती काढून टाका. तुमची सर्वोत्तम कामगिरी करा आणि शेवटच्या चेंडूपर्यंत लढा द्या. मग जो काही निकाल लागेल, तो एका खऱ्या खेळाडूसारखा (खिलाडूवृत्तीनं) स्वीकारा. देशाच्या प्रार्थना तुमच्या सोबत आहेत. गुड लक."
इम्रान यांच्या या ट्वीटवर दोन्ही देशांतले चाहते प्रतिक्रिया देत आहेत, आणि आपापल्या देशाचं समर्थन करतानाच चांगली मॅच पाहायला मिळेल, अशी आशा करत आहेत. अनेकांनी इम्रान यांच्या विश्वचषक विजयाच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)