You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संजय राऊत म्हणतात, 'मलाही गुवाहाटीची ऑफर आली होती, पण…' #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1.'मलाही गुवाहाटीची ऑफर आली होती, पण….'
'मलाही गुवाहाटीची ऑफर आली होती. मात्र, मी बाळासाहेबांना मानतो म्हणून गेलो नाही, असा टोला राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपा सरकारला लगावला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. शिंदे गटाकडून फसवणूक केली जात आहे. त्यांच्या मनात आपण आपल्या नेत्याला फसवल्याची खदखद असल्याचे राऊत म्हणाले.
तसेच लोकांना फसवणे हा भाजपाची पद्धत आहे. त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडलेले लोकही भाजपासारखेच वागत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
भाजपाला शिवसेनेची मुंबईतील ताकद कमी करायची आहे त्यामुळे ते शिंदे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवतं असल्याचेही राऊत म्हणाले.
2. पुढील निवडणुकाही महाविकास आघाडी म्हणूनच लढू - जयंत पाटील
"महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष एकत्र होतो. यापुढेही विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी आमचा एकच उमेदवार असणार आहे," असे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहेत. ईटीव्ही भारतनं ही बातमी दिलीय.
जयंत पाटील पुढे म्हणाले की, "पुढील काळात एकत्र बसून पुढील धोरण ठरवू. तसेच स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत जिथे-जिथे शक्य होईल, तिथे तीनही पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न यशस्वी करु."
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील सरकार कोसळल्यानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या पुढील वाटचालीबाबत जयंत पाटलांनी भाष्य केलंय. आगामी काळात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेना राहणार की स्वतंत्ररित्या वाटचाल करणार, याबाबत अनेकांना उत्सुकता होती.
3. मुंबई भाजपच्या कार्यालयात लग्नसोहळा, पण नवरदेव गायब - चव्हाण
महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली.
आधी मुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीसांना या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं लागल्यानं ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. याच मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी भाजपवर निशाणा साधला.
'मुंबई भाजपाच्या कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब,' असं ट्वीट पृथ्वीराज चव्हाणांनी फडणवीसांना उद्देशून केलं. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
भाजपच्या मुंबई कार्यालयात नव्या सरकारस्थापनेचा जल्लोष करण्यात आला. मात्र, यावेळी फडणवीसच उपस्थित नव्हते. हेच हेरून पृथ्वीराज चव्हाणांनी हा टोमणा मारला.
4. उद्धव ठाकरे फार मोठे नेते, योग्य वेळी उत्तर देऊ - दीपक केसरकर
"उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते आहे. आम्ही त्यांच्यावर काही बोलणार नाही. योग्य वेळ आली तेव्हा उत्तर देऊ. आम्ही शिवसेनेत आहोत. आमचे मुख्यमंत्री शिवसैनिक आहेत. शाखाप्रमुख आज मुख्यमंत्री झाला आहे," असं शिवसेनेतील बंडखोर आमदार दीपक केसरकर म्हणाले.
शिंदे गटाचे प्रवक्ते असलेल्या दीपक केसरकरांनी गोव्यात पत्रकार परिषद घेतली.
भाजपनं कथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली होती. या टीकेबाबत माध्यमांनी दीपक केसरकरांना प्रश्न विचारला असता, त्यांनी वरील उत्तर दिले. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.
5. मला ग्रामीण भागाशी संबंधित मंत्रिपद द्या - बच्चू कडू
प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये आपल्याला मंत्रिपद मिळावं, अशी आशा व्यक्त केलीय. सकाळ वृत्तपत्रानं ही बातमी दिलीय.
"लवकरच नवीन सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून यामध्ये आपल्याला ग्रामीण भागाशी संबंधित एखादं मंत्रिपद मिळावं," अशी अपेक्षा बच्चू कडूंनी व्यक्त केलीय.
शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे गटासोबत बच्चू कडूही सुरत-गुवाहाटीमार्गे गोव्यात दाखल झालेत. त्यांना शिंदे गटाचे समर्थक मानले जात आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळतं का आणि कुठलं मंत्रिपद मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)