देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री करून भाजपने त्यांचे पंख छाटले आहेत का?

    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

"एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे," असं ट्वीट करून फडणवी यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आधी त्यांनी सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचं जाहीर केलं होतं. पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं मात्र वेगळा निर्णय घेतला.

"भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने असा निर्णय घेतला आहे की, भाजपने सरकारचा भाग व्हावं. त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली आहे की देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावं," असं ट्वीट भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केलं.

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सांगण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून त्यांचा त्याग आणि निष्ठा दिसून येते असं अमित शाह म्हणाले.

एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रिपद घोषित करताना देवेंद्र फडणवीस यांनी ते स्वतः सरकारमध्ये सहभागी होणार नाही असं सांगून टाकलं.

पण शपथविधीला अर्धा तास होण्याआधी भाजपच्या अध्यक्षांनी ट्वीट करत देवेंद्र यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचे आदेश दिले.

त्याचा नेमका अर्थ काय असा प्रश्न बीबीसी मराठीने सीएएन न्यूज-18 च्या मुंबई ब्यूरो हेड विनया देशपांडे यांना विचारला.

विनया सांगतात, "भाजपसारख्या पक्षाची काम करण्याची पद्धत अशी नाही. भाजपमध्ये सर्व बंद दाराआड ठरतं आणि नंतर नेते पुढे येऊन सर्व निर्णय जाहीर करतात. आता देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ते सरकारमध्ये शामिल होणार नाहीत असं सांगणं आणि दिल्लीतून पक्षाच्या अध्यक्षांनी त्यांना उपमुख्यमंत्री होण्यासाठी आदेश देणं हे बरंच काही सांगणारं आहे."

हे देवेंद्र फडणवीसांचं खच्चीकरण आहे, असं विश्वेषण नागपूर लोकमतचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने करतात.

ते सांगतात, "हा फडणवीसांचा पंख छाटण्याचा प्रयत्नच आहे. फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा त्याग केल्याचं जाहीर केल्यावर त्यांची प्रतिमा उचांवणारी होती. ते कदाचित केंद्रीय नेतृत्वाला आवडलं नसेल. हे एक प्रकारे फडणवीसांचं खच्चीकरण आहे. एवढ्या मोठ्या क्षमतेच्या माणसाला मुख्यमंत्रिपद नाही आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करायला लावणं म्हणजे त्यांच्या क्षमतांचं अवमूल्यन आहे."

जे. पी. नड्डा यांनी माध्यमांमध्ये येऊन हे जाहीर करण्यामागे काय अर्थ आहे, असा सवाल बीबीसीने ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे यांना विचारला.

"फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ते सरकारमध्ये सहभागी होणार नाहीत असं जाहीर केलं होतं. त्यांची ही पत्रकार परिषद देशभरात पोहोचली. त्यामुळे सर्वत्र हा संदेश गेला ही फडणवीस या मंत्रिमंडळात नसतील. म्हणून कदाचित केंद्रीय नेतृत्वाला त्याचा खुलासा करण्यासाठी मीडियात यावं लागलं असावं. कदाचित नड्डांनी जाहीर करण्याआधी फडणवीसांशी फोनवरून चर्चा केली असावी, तुम्ही सरकारमध्ये सहभागी व्हावं असंही सांगितलं असावं," असं भातुसे सांगतात.

"पण यातून भाजपचं केंद्रीय नेतृत्व आणि फडणवीस यांच्यातला विसंवाद समोर येतोय का, हीसुद्धा शंका येते. फडणवीस एवढा मोठा निर्णय घेत असतील सरकारमध्ये सहभागी न होण्याचा आणि ते केंद्राला कळवत नसतील, हे का कळवलं गेलं नाही, हासुद्धा मोठा प्रश्न आहे," असं भातुसे पुढे म्हणतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)