एकनाथ शिंदे बंड : अजित पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट, 'शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरेंना पाठिंबा'

सध्या महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याबाबत महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संपूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बैठकीत घेतला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

ते म्हणाले, "महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठींबा असेल. आम्ही सर्व हे सरकार टिकवण्याचा प्रयत्न आहे. माझं मुख्यमंत्र्यांशीही बोलणं झालं. आदित्य ठाकरेंशीही बोलणं झालं आहे. मी सर्वांना समान निधी दिला आहे. पालकमंत्री नेमताना सर्व पक्षांना समान संधी दिली आहे. त्यांनी जर समोरासमोर येऊन सांगितलं असतं तर गैरसमज दूर झाले असते.

संजय राऊत यांनी हे वक्तव्य का केलं हे माहिती नाही. मी याबाबत उद्धव ठाकरेंना विचारेन की राऊतांनी असं वक्तव्य त्यांनी का केलं . पण काहीवेळा आमदारांना परत बोलावण्यासाठी असं बोललं जातं.

हा संपूर्ण घटनाक्रम उद्धव ठाकरे स्वतः घडवत आहेत का, यात किती तथ्य आहे, या प्रश्नाचं उत्तर देताना अजित पवार यांनी ती शक्यता फेटाळून लावली. ते म्हणाले, "शिवसेनेबरोबर मी अडीच वर्षे काम करतोय त्यांचा तसा स्वभाव आहे असं वाटत नाही."

सरकार अडीच वर्षांपूर्वी अस्तित्वात आलं तेव्हा 36 पालकमंत्री म्हणून तिन्ही पक्षांचे नेमले. कुणाच्याही आमदार निधीत काटछाट करण्यात आलेली नाही. कधीही दुजाभाव केला नाही, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं.

असं चॅनलला जाऊन बोलण्यापेक्षा हे काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांपुढे बोलले असते तर समज-गैरसमज दूर झाले असते. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकारमध्ये गेलोय. सरकार टिकवण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची आहे. त्यांच्या वक्तव्यावर टीकाटिप्पणी करण्याचं काही कारण नाही. आपण व्यवस्थित यातून कसं बाहेर पडू, याचा प्रयत्न करतोय, असं अजित पवार यांनी म्हटलं.

'...तर शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार' - संजय राऊत

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

"जे आमदार महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडायला हवं, एक वेगळा विचार करायला पाहिजे, अशी या सर्व आमदारांची इच्छा असेल तर त्यांनी आधी मुंबईत यावं.

"शिवसेना प्रमुखांसोबत बोलावं. त्यांच्यापुढे ती मागणी मांडावी. तिथं बसून पत्रव्यवहार करू नये. त्यांच्या मागणीचा नक्की विचार केला जाईल," असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

महाविकास आघाडीतून बाहेर पडू, पण त्यासाठी आमदारांना 24 तासात परत यावं लागेल, असं राऊत म्हणालेत.

यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संजय राऊत यांनी ट्विट करत आमदारांना माघारी येण्याचं आवाहन केलं. चर्चेतून मार्ग निघू शकतो, असं राऊत यावेळी म्हणाले.

ते म्हणाले, "चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र!"

तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट

माजी मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी गौप्यस्फोट केला आहे.

"उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी महाराष्ट्राची दिशाभूल केली. कैलास पाटील यांची सुरत मधून मुंबईकडे परतीच्या प्रवासाची आम्ही व्यवस्था करून दिली. प्रचंड पाऊस पडत असताना 4 किलोमीटर चालत गेले असल्याचा दावा साफ खोटा आहे," असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.

"कैलास पाटील खोटं आणि आभासी कथानक रचून मातोश्रीची आमदार सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करताहेत हे दुर्दैवी आहे. डबलढोलकी असणारे आमदार कैलास पाटील यांच्या पासून पक्षप्रमुख यांनी देखील सावध राहावं," असंही सावंत म्हणाले आहेत.

गुवाहाटीत एकनाथ शिंदेंचं शक्तिप्रदर्शन

दरम्यान, गुवाहाटी इथल्या हॉटेलमध्ये काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शक्तिप्रदर्शन केलं आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनं एक व्हीडिओ ट्विट केला आहे.

त्यानुसार, गुवाहाटी इथल्या हॉटेलमध्ये महाराराष्ट्रातील 42 बंडखोर आमदार दिसत आहे. यामध्ये शिवसेनेचे 35 तर 7 अपक्ष आमदार आहे.

"एकनाथ शिंदे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है," अशा घोषणा हे आमदार व्हीडिओत देत असल्याचं स्पष्टपणे ऐकू येत आहे.

तर, "गुवाहाटीतल्या 21 आमदारांनी शिवसेनेशी संपर्क साधला आहे. ज्यादिवशी ते मुंबईला येतील तेव्हा ते आमच्यासोबत असतील. इथले दोन आमदार (कैलास पाटील आणि नितीन देखमुख) आणि ते 21 असे एकूण 23 आमदार आमच्यासोबत आहे. उद्या विधानसभेत काही संघर्ष करायचा असल्यास महाविकास आघाडी तो करेल, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे."

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 4 आमदार रात्रीतूनच गुवाहाटीला पोहोचले होते. तर आज सकाळी आणखी 4 आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झाले.

4 आमदार रात्रीतून गुवाहाटीला

दीपक केसरकर, आशिष जैस्वाल, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर हे चार आमदार सकाळीच गुवाहाटीमध्ये आले आहेत. ते आज एकनाथ शिंदे गटात दाखल झाले आहेत.

सामनातून बंडखोरांचे कान टोचले

4 आमदार रात्रीतून गुवाहाटीला पोहोचले होते बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घातल्यानंतर मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी गर्दी जमली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाने बंडखोर आमदारांचे कान टोचले असून त्यांना वेळीच शहाणे होण्याचा इशारा दिला आहे.

जर शिवसेनेनी ठरवलं तर या सर्व आमदारांना माजी केले जाईल असं या अग्रलेखात म्हटले आहे. ही सर्व खेळी भाजपची आहे हे न ओळखण्याइतकी महाराष्ट्रातील जनता वेडी नाही.

शिवसेनेनी अनेक जय-पराजय पाहिले आहेत. तेव्हा शिवसेनेचे काही नुकसान होणार नाही पण भाजपचे ऐकून या बंडात सामील होणाऱ्या आमदारांचे नुकसान होऊ शकते तेव्हा त्यांनी वेळीच शहाणे होण्याची गरज आहे असं या अग्रलेखात म्हटलं आहे.

मुख्यमंत्री मातोश्रीवर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवारी 'वर्षा' हे शासकीय निवासस्थान सोडून 'मातोश्री' या खासगी निवासस्थानी पोहोचले आहेत. पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य आणि तेजस ठाकरे हेही उद्धव ठाकरेंसोबत होते.

'वर्षा' बंगल्यावरून 'मातोश्री'पर्यंत येईपर्यंत रस्त्यात शेकडो शिवसैनिकांनी गर्दी केली होती. ठिकठिकाणी उद्धव ठाकरेंवर पुष्पवृष्टी केली गेली, घोषणा दिल्या गेल्या.

उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ आणि एकनाथ शिंदेंच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या.

उद्धव ठाकरेंनी संध्याकाळी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी थेट संवाद साधला. या भाषणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा शासकीय बंगला वर्षा सोडण्याची तयारी केली आणि थोड्या वेळात तिथून निघाले.

वर्षा हे मुख्यमंत्र्याचं अधिकृत निवासस्थान आहे. या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी फारसं वास्तव्य केलं नाही. ते मुख्यमंत्री झाल्यापासून मातोश्री हेच सत्ताकेंद्र राहिलं आहे. आता उद्धव ठाकरेंनी वर्षा सोडण्याची तयारी दाखवल्यामुळे पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

आणखी चार आमदार गुवाहाटीला पोहोचले

गुलाबराव पाटील, योगेश कदम, चंद्रकांत पाटील आणि मंजुळा गावित हे चार आमदार बुधवारी रात्री गुवाहाटीला पोहोचले आहेत. त्यापैकी जळगावचे चंद्रकांत पाटील हे अपक्ष आमदार आहेत. आणि ते अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.

तर योगेश कदम हे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे पुत्र आहेत. त्यामुळे आता शिंदेंच्या बंडाला रामदास कदमांची साथ असल्याचं स्पष्ट झालं आहे.

तर गुलाबराव पाटील हे उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

हे सर्व आमदार आता सर्व गुवाहाटीच्या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलात पोहोचले आहेत.

'सत्याचा विजय होईल'

आम्ही लढणारे लोक, शेवटी सत्याचा विजय होईल, आम्हाला सत्तेचा मोह नाही, मुख्यमंत्री वर्षा सोडून मातोश्रीवर निघाले आहेत, असं संजय राऊत म्हणाले. शरद पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झाल्याचं ते म्हणाले. अविश्वास ठराव मांडल्यास बहुमत सिद्ध करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

ते लिहितात, 'संजय राऊत खुश!

कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने.'

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. याचा अर्थ काय याचा उलगडा काही वेळात होईल असा कयास आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे सर्वाधीक आमदार असल्याचं पुन्हा एकदा बोलून दाखवलं आहे. आता कॅबिनेट मंत्र्यांची बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहात आहेत. त्यांची कोरोनाची अँटिजेन चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित राहाण्याचा निर्णय घेतला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री या बैठकीसाठी जमा झालेआहेत मात्र शिवसेनेचे गुवाहाटीला असणारे कॅबिनेट मंत्री उपस्थित राहाणार नसल्यामुळे या बैठकीला काहीसं वेगळं रुप आलेलं दिसेल.

तत्पूर्वी काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली. तर सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही भेटून या स्थितीवर चर्चा केली.

काँग्रेसच्या नेत्या आणि कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसचे आमदार एकत्र आहेत. आम्हाला कोणीही प्रलोभन देऊ शकत नाही असं सांगितलं.

आदित्य ठाकरे यांच्या ट्विटर हँडलच्या बायोमध्ये मंत्रिपदाचा उल्लेख काढून टाकण्यात आला आहे, असं सांगण्यात येतंय तर काही माध्यमांच्या मते त्यात काहीही बदल झालेला नाही.

त्यामध्ये व्हॉइसिंग द युथ, पोएम्स अँड फोटोग्राफी- पॅशन, प्रेसिडेंट युवासेना, प्रेसिडेंट मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशन लिहिलंय. त्यामुळे आता यापुढे ते काय पाऊल उचलणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबईत आज वेगाने घडामोडी घडत आहेत. शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदार गीता जैन देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान सागर येथे दाखल झाल्या आहेत.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील आमदारांचा समूह मंगळवारी रात्री सुरतहून गुवाहाटीत दाखल झाला आहे. गुवाहाटी विमानतळावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

"आम्ही शिवसेना सोडलेली नाही, सोडणार नाही. बाळासाहेबांनी देशाला हिंदुत्वाचा विचार दिला, त्याच्याशी आम्ही तडजोड करणार नाही", असं एकनाथ शिंदे यांनी सुरत विमानतळावर सांगितलं होतं.

"मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे. शिवसेना आमदारांनी पक्षाविरुद्ध भूमिका घेतलेली नाही. हिंदुत्व आणि आनंद दिघेंचे विचार यांचा राजकीय फायद्यासाठी वापर कधीही करणार नाही", असं शिंदे यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर नेमके किती आमदार याविषयी सुरुवातीला स्पष्टता नव्हती. सुरत इथल्या हॉटेलमधला एक फोटो समोर आला होता. त्यातून आमदारांची मोठी फौज शिंदे यांच्याबरोबर असल्याचं स्पष्ट झालं.

"बाळासाहेबांनी दिलेली शिकवण, हिंदुत्वाचा मुद्दा आहे या मुद्यावर, धर्मवीर आनंद दिघेंची शिकवण आहे त्या मुद्यावर कुठल्याही परिस्थितीत हिंदुत्वाच्या मुद्यावर फारकत घेतली नाही. सत्तेसाठी असो किंवा राजकारणासाठी, बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे हे कडवट हिंदुत्व ही भूमिका पुढे घेऊन जात आहोत. आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. शिवसेना सोडलेली नाही, सोडणार नाही. बाळासाहेबांचे विचार, भूमिका घेऊन पुढचं राजकारण, समाजकारण करणार आहोत. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललो आहोत. बाळासाहेबांनी देशाला हिंदुत्वाचा विचार दिला आहे. त्याबाबत कोणतीही तडजोड आम्ही करणार नाही", असं एकनाथ शिंदे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सुरत विमानतळावर सांगितलं.

संजय राऊत बुधवारी काय म्हणाले?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना आज पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे.

जास्तीत जास्त काय होईल? सत्ता जाईल, ती परत येईल. आम्ही पाठीत वार करणारे नाही. समोरुन लढणारे आहोत असं ते म्हणाले.

ते म्हणाले, "एकनाथ शिंदे आणि आमचे सगळे लोक स्वगृही येतील. त्यांच्याबरोबर किती लोक असू देत, त्यांच्याशी आमचा संवाद आहे. ते परत येतील. आज सकाळी माझं एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं झालंय. ते शिवसैनिक आहेत. त्यांनी सातत्याने शिवसेनेचं काम केलं आहे. जे बाहेर आहेत ते सगळे शिवसैनिक आहेत. त्यांना सेनेबरोबरच राहायचं आहे. गैरसमज दूर होतील.शिवसेनेत राखेतून जन्म घेण्याची ताकद आहे. शिवसेनेने अनेकदा राखेतून जन्म घेत गरुडझेप घेतली आहे."

आमदार आसामला का गेले आहेत असं विचारल्यावर ते म्हणाले, "तिकडे छान जंगल आहे. काझीरंगा. आमदार फिरतील. आमदारांनी फिरलं पाहिजे. पर्यटन केलं पाहिजे. त्यामुळे देशाची ओळख होईल."

शिंदेसमर्थक आमदार

1- प्रताप सरनाईक (माजिवडा, ठाणे)

2- श्रीनिवास वनगा (पालघर)

3- अनिल बाबर (खानापूर)

4- नितिन देशमुख (अकोला)

5-लता सोनवणे (चोपडा)

6- यामिनी जाधव (भायखळा)

7- संजय शिरसाठ (औरंगाबाद पश्चिम)

8- महेंद्र दळवी (अलिबाग)

9- भारत गोगवले (महाड)

10.प्रकाश सर्वे (मागाठणे)

11.सुहास कांदे (नांदगाव)

12. बच्चू कडू , प्रहार पार्टी (अचलपूर)

13- नरेन्द्र बोंडेकर, अपक्ष (भंडारा)

14- संजय गायकवाड (बुलडाणा)

15- संजय रायमूलकर (मेहेकर)

16-बालाजी कल्याणकर (नांदेड उत्तर)

17- रमेश बोरनारे (वैजापूर)

18- चिमणराव पाटील (एरंडोल)

19- किशोर पाटील (पाचोरा)

20-नितीनकुमार तळे (बाळापूर)

21-संदीपान बुमरे (पैठण)

22-महेंद्र थोरवे (कर्जत)

23-शंभूराजे देसाई (पाटण)

24- शहाजी पवार

25- तानाजी सावंत (परांडा)

26- शांताराम मोरे (भिवंडी)

27-विश्वनाथ भोईर (कल्याण)

28- शहाजी पाटील (सांगोला)

29-प्रदीप जैसवाल (औरंगाबाद मध्य)

30-किशोर पाटील

31-उदयसिंह राजपूत

32-महेश शिंदे (कोरेगाव)

33-ज्ञानराज चौगुले (उमरगा)

34- राजकुमार पटेल

सोमवारी संध्याकाळी मुंबईत सुरू झालेलं हे थरारनाट्य मंगळवारी सुरतमध्ये जाऊन पोहोचलं. सुरतमधल्या ली मेरेडियन हॉटेलात दिवसभर नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर नेमके किती आमदार आहेत याचा अंदाज घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या वतीने मिलिंद नार्वेकर आणि फाटक यांना चर्चेसाठी सुरतला पाठवण्यात आलं. दरम्यान भाजपचे आमदार संजय कुटे हे याच हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत. कुटे यांच्याबरोबरीने भाजप नेते मोहित कंबोज हेही या हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांबरोबर असल्याचं दिसून आलं.

उद्धव आणि शिंदे यांच्यात 15-20 मिनिटं चर्चा झाल्याचं वृत्त आहे. एकनाथ शिंदे यांचं मन वळवायला गेलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्या फोनवरून ही चर्चा झाली. तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले की भाजपाबरोबर जायला हवं, यातच पक्षाचं हित आहे. तसंच मी सेना सोडली नाही, मी बाळासाहेबांचा सैनिक आहे असंही ते पुढे म्हणाले.

त्यावर उद्धव ठाकरेंनी त्यांना मुंबईत येण्याचं आमंत्रण दिलं आणि तिथे येऊन चर्चा करू असं सांगितलं. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेनी नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी बंडखोर नेत्यांच्या घरी जाऊन आंदोलन करा असे आदेश आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

गुवाहाटी विमानतळावर पोहोचल्यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, "आम्ही 40 आमदार आहोत, अजून 10 आमदार यामध्ये सहभागी होतील."

संजय राऊत मंगळवारी काय म्हणाले होते?

"एकनाथ शिंदे आमचे सहकारी आणि मित्र आहेत. अजूनही आम्ही त्यांचे वाट पाहतोय. आम्हाला खात्री आहे की, ते सर्व आमदारांसह परत येतील," असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

"आमदारांना परत यायचंय. पण येऊ दिलं जात नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशाप्रकारे राज्य आणू पाहत असेल, तर देशासाठी गंभीर बाब आहे. अमित शाह यांनी यात लक्ष घालून, देशाचे लोकप्रिय गृहमंत्री असल्याचे त्यांनी दाखवून द्यावं."

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रेमानं मुंबईत यावं. आम्ही त्यांचं स्वागत करू, असंही राऊत म्हणाले आहेत.

मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकर या शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदेंच्या बंडावर बोलताना भावनिक झाल्या आणि बोलता बोलता त्यांचे अश्रू अनावर झाले.

"एकनाथ शिंदे साहेब, उद्धवजी तुमच्यासाठी चांगला निर्णय घेतील. तुम्ही परत या," असं कळकळीचं आवाहन किशोरी पेडणेकरांनी केलंय.

पेडणेकर पुढे म्हणाल्या, "उद्धवसाहेब सकाळीच म्हणाले की, एकनाथजी तुम्ही परत या, मी तुम्हाला मुख्यमंत्रिपद देतो. तुम्हाला गाजरं दाखवतायेत, ते मुख्यमंत्रिपद देणार नाहीत आणि दिलं तर मी तुमचं सगळ्यात पहिलं अभिनंदन करेन. इतक्या मोठ्या मनाचा आमचा नेता आहे."

"आमचं घर फोडण्याचा भाजपनं प्रयत्न केलाय. भाजपच्या आमिषाला एकनाथ शिंदेंनी बळी पडू नये," असंही पेडणेकर म्हणाल्यात.

दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय शिवसेना आमदारांच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईतील शिवडीचे आमदार अजय चौधरी हे शिवसेनेचे विधमंडळातील नवे गटनेते असतील.

अजय चौधरी शिवसेनेचे शिवडीहून आमदार आहेत. ते पहिल्यांदा 2014 मध्ये निवडून गेले आहेत. 2015 मध्ये ते नाशिकचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख झाले. 2019 मध्ये ते पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून गेले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)