अग्निपथ योजना : अग्निवीरांना भाजप ऑफिसमध्ये सुरक्षारक्षक म्हणून प्राधान्य देईन - भाजप नेते #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांच्यावर प्रसिद्ध झालेल्या 5 मोठ्या बातम्यांचा घेतलेला आढावा.
1. अग्निवीरांना भाजप ऑफिसमध्ये सुरक्षारक्षक म्हणून प्राधान्य देईन - भाजप नेते
भारत सरकारच्या अग्निपथ योजनेवरून आधीच देशभरात आंदोलनं सुरू असताना, आता भाजप नेत्यांनं वादग्रस्त विधान केलं आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय इंदौरमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "..जर भाजप ऑफिसमध्ये सुरक्षारक्षक ठेवायचं असेल, तर मी अग्निवीरांना प्राधान्य देईन."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
कैलास विजयवर्गीयांच्या या वक्तव्याचा हा व्हीडिओ भाजप खासदार वरुण गांधींनी ट्विटरवर पोस्ट करून टीका केलीय.
कैलास विजयवर्गीय म्हणाले की, "लष्कराच्या प्रशिक्षणात डिसिप्लिन आणि दुसरं आज्ञेचं पालन करणं असतं. जेव्हा अग्निवीर ट्रेनिंगसाठी जातील घेतील आणि चार वर्षांच्या सेवेनंतर तिथून बाहेर पडतील. साडेसतरा वर्षांपासून 23 वर्षांपर्यंत... जर अग्निवीर 21 वर्षांचा असताना भरती होत असेल, तर चार वर्षात 25 वर्षांचा होईल. 25 वर्षांच्या वयात बाहेर पडल्यानंतर त्याच्या हातात 11 लाख रूपये असतील. शिवाय अग्निवीर म्हणून बाहेर फिरेल. मला जर भाजप ऑफिसमध्ये सुरक्षारक्षक ठेवायचा असेल, तर अग्निवीरांना प्राधान्य देईन."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
अग्निपथ योजनेवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनीही केंद्र सरकारवर टीका केलीय.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ज्या प्रकारे वादग्रस्त कृषी कायदे मागे घ्यावे लागले, त्याच पद्धतीने त्यांना 'अग्निपथ' योजना मागे घ्यावी लागेल", असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) सरकार आठ वर्षांपासून 'जय जवान, जय किसान'च्या मूल्यांचा अवमान करत आहे, अशी टीका राहुल गांधी केली आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Congress/TWITTER
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी देखील अग्निपथ योजनेवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे.
प्रियांका गांधी म्हणाल्या, "सैन्यात भरतीची तयारी करणाऱ्या ग्रामीण तरुणांच्या वेदना समजून घ्या. तीन वर्षांपासून नोकरभरती झाली नाही. तरुणांच्या पायाला फोड आले होते. त्यांची निराशा झाली आहे. वायुसेनेतील भरती आणि भरतीच्या निकालाची तरुणांना प्रतीक्षा होती. सरकारने त्यांची कायमची भरती, रँक, पेन्शन काढून घेतली, नोकरभरती बंद केली."
प्रियांका गांधी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना सशस्त्र दलातील भरतीतील विलंबाबाबत लिहिलेल्या पत्राची प्रतही शेअर केली आहे.
या पत्राद्वारे त्यांनी सिंह यांना सैन्यात भरती होण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांच्या मेहनतीचा आदर केला जावा यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची विनंती केली.
2. रवी राणांविरोधात वॉरंट
अमरावती न्यायालयाने अमरावतीचे आमदार रवी राणांविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केला आहे.
अमरावती पोलीस हे जामीनपात्र वॉरंट घेऊन रवी राणांना देण्यासाठी त्यांच्या मुंबईतील खार येथील घरी आले होते. मात्र, रवी राणांच्या घरी कोणीही नसल्याने हे वॉरंट स्विकार करण्यात आलेलं नाही. 'टीव्ही9मराठी'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, RAVI RANA/FACEBOOK
त्यामुळे रवी राणांना विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वॉरंट बजावण्यात आल्याने भाजपला मोठा धक्का बसू शकतो.
फेब्रुवारी 2022 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यात आल्याने संतप्त झालेल्या रवी राणा समर्थकांनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेकून निषेध नोंदवला होता.
अमरावती पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कलम 307 (हत्येचा प्रयत्न) आणि 353 (लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी प्राणघातक हल्ला किंवा फौजदारी बळाचा वापर) अंतर्गत गुन्हे दाखल केले होते. मात्र घटनेच्या वेळी आपण दिल्लीतच असल्याचे राणांनी सांगितले.
3.नीरज चोप्राला सुवर्ण
नीरज चोप्रानं फिनलँडमध्ये सुरु असेलल्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे. पहिल्या भालाफेकीत नीरजनं 86.89 मीटर अंतरावर भाला फेकला.
दुसरे स्पर्धक नीरज चोप्राची बरोबरी देखील करु शकले नाहीत. काही दिवसांपूर्वी नीरज चोप्रानं नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. 'न्यूज18हिंदी'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
नीरज चोप्रासोबत स्पर्धेत असलेल्या इतर खेळाडूंना त्या अंतराला पार करता आलं नाही. नंतरच्या वेळी नीरज चोप्रानं पुढील दोन प्रयत्न फाऊल केले. कारण, दुसऱ्यांदा फेकलेला भाला कमी अंतरावर पडल्यास नुकसान होण्याची शक्यता होती. दरम्यान नीरज चोप्रा जखमी देखील झाला होता. भालाफेक करताना नीरजचा पाय घसरला होता. मात्र, त्यानं हार मानली नाही.
पावो नुरमी गेम्समध्ये नीरजने 89.03 मीटर लांब थ्रो केला. याआधी त्याने 87.58 मीटर लांब भाला फेकला होता.
4. बगळ्यांच्या हत्येचा प्रकार, सयाजी शिंदेंनी मुलांना सुनावलं
घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर बगळ्यांची कत्तल होत असल्याचा प्रकार अभिनेते सयाजी शिंदेंनी समोर आणला आहे. हा प्रकार थांबायला हवा. त्यासाठी पोलीस प्रशासनानं योग्य कारवाई करायला हवी, असं आवाहन शिंदेंनी केलं आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
उड्डाणपुलाचा अंदाज न आल्याने बगळ्यांचे थवे पुलाच्या एकदम जवळून जात असतात. अशावेळी बाजूच्या वस्त्यांमधील मुले या पुलावर उभे राहून बेचकीच्या सहाय्याने या बगळ्यांना मारून खाली पाडतात आणि नंतर आपल्या सोबत घेऊन जातात.
हा सर्व प्रकार अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत मुलांना रोखण्याचा प्रयत्न केला.
5.खोट्या तक्रारीवरून चित्रा वाघ अडचणीत?
भाजपच्या चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्या सांगण्यानुसार राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. एवढंच नाही तर याप्रकरणी तरुणीने औरंगाबादच्या जिंसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.
तरुणीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादनुसार, नदमोद्दीन शेख याने लग्नाचे आमिष दाखवून माझ्यावर अत्याचार करून माझा व्हिडीओ बनवला. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मी जसे सांगेन तसं केल्यास आपण खूप पैसे कमवू असे सांगितले.

फोटो स्रोत, FACEBOOK
त्यानंतर सुरवातीला नाशिक येथे मेहबूब शेख यांच्याविरोधात खोटी तक्रार दाखल करायला सांगितली. मात्र, तेथील पोलिसांना खोटी तक्रार असल्याचा संशय आल्याने त्यांनी हाकलून दिले.
त्यानंतर नदमोद्दीन शेख याच्या सांगण्यानुसार औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात मेहबूब शेख विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचं तरुणीने आपल्या जबाबात म्हटलं आहे.
चित्रा वाघ यांना मला खोटी तक्रार द्यायला लावली असून मला यात पडायचं नसल्याचं तरुणीने म्हटलं आहे. मात्र आता तक्रार माघे घेतल्यास जेलमध्ये सडशील, त्यामुळे एफआयआरमध्ये जसं आहे तसेच बोलायचं असे चित्रा वाघ यांनी म्हटल्याचा आरोप तरूणीने केला आहे. त्यानंतर त्यांनी तरुणीचा एक व्हिडीओ बनवून माध्यमांशी कसे बोलायचं हे सांगितले, असे तक्रारदार तरुणीने म्हटले आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








