डॉ. संग्राम पाटील यांना ताब्यात घेत 14 तास चौकशी, पोलिसांनी कुठल्या प्रकरणी केली कारवाई?

सायबर गुन्ह्यात डॉ. संग्राम पाटील यांना नोटिस

फोटो स्रोत, FACEBOOK/DR SANGRAM PATIL

फोटो कॅप्शन, डॉ. संग्राम पाटील
    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

युट्युबवर व्हीडिओ प्रसिद्ध करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना एका सायबर गुन्ह्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी शनिवारी (10 जानेवारी) ताब्यात घेतलं होतं.

त्यांना अटक करण्यात आली नसून फक्त नोटीस बजावली असल्याची माहिती मुंबई पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.

लंडनहून मुंबईत आल्यावर विमानतळावर त्यांची चौकशी झाल्याची माहिती समाजमाध्यमांतून प्रसिद्ध झाली.

त्यावर मुंबई पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी डॉ. पाटील यांना अटक करण्यात आले नसून त्यांना बीएनएसएसच्या 35 (3) नुसार पुढील तपासासाठी नोटीस दिल्याचे स्पष्ट केले.

तर संग्राम पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना या कारवाईबाबत दुजोरा दिला. रात्री अडीचच्या दरम्यान त्यांना ताब्यात घेतलं आणि सायंकाळी 5 वाजता सोडलं असं त्यांनी सांगितलं.

संग्राम पाटील हे डॉक्टर असून त्यांच्या फेसबूक प्रोफाईल माहितीनुसार त्यांचे शिक्षण पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण झाले असून ते भूलशास्त्र विषयात एमडी आहेत.

त्यानंतर ते इंग्लंडमधील विविध वैद्यकीय संस्थांशी संबंधित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ते पेन मेडिसिन आणि अॅनेस्थेटिक्स कन्सल्टंट म्हणून कार्यरत असल्याचं या प्रोफाइलमध्ये म्हटलं आहे.

नेमके प्रकरण काय?

संग्राम पाटील यांच्याविरोधात ठाण्यातील रहिवासी निखिल भामरे यांनी तक्रार नोंदवली आहे. ते भारतीय जनता पार्टीसाठी महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया संयोजक या पदावर काम करतात.

त्यांनी पोलिसांत नोंदवलेल्या तक्रारीनुसार 14 डिसेंबर 2025 रोजी 'शहर विकास आघाडी' हे खातं चालवणाऱ्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक मजकूर प्रसिद्ध केला आहे.

त्यात त्यांनी आपल्या नेत्याबद्दल दृष्टता पसरवली आहे अशी तक्रार भामरे यांनी केली आहे.

तसेच एका महिलेबद्दल आक्षेपार्ह माहिती यात प्रसिद्ध केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्या मजकुराचा स्क्रीनशॉट घेतल्याचं या तक्रारीत नमूद केलं आहे.

याबरोबरच भामरे यांनी संग्राम पाटील यांच्याविरोधातही अशीच तक्रार केली आहे.

पाटील यांनी आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा तसेच समाजात द्वेषाची भावना निर्माण करणारा मजकूर प्रसिद्ध केला असं त्यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.

डॉ. संग्राम पाटील यांची प्रतिक्रिया

डॉ. संग्राम पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "आम्ही मध्यरात्री अडीचच्या सुमारास लंडनहून मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर मुंबई पोलीसांनी चौकशीसाठी मला ताब्यात घेतलं होतं.

निखिल भामरे, या भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीनुसार मी केलेल्या एका व्हीडिओबाबत त्यांना ते कंटेंट आक्षेपार्ह वाटल्यामुळे गुन्हा दाखल आहे. त्यानुसार मला लोअर परळ येथील क्राईम ब्रँच कार्यालयात चौकशीसाठी मध्यरात्रीपासून ठेवलं होतं.

मला चौकशी करून सोडले आहे. पोलिसांनी विचारलेल्या माहितीनुसार मी सगळी माहिती त्यांना दिली आहे. मला या प्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यानुसार ही प्रक्रिया आणि चौकशी सुरू राहील.

डॉ. संग्राम पाटील

फोटो स्रोत, facebook/drsangramgpatil

दिलेल्या नोटीसला मी भारतातून निघण्यापूर्वी उत्तर देईन. आम्ही मुंबईहून गावाकडे निघालो आहोत."

पुढे संग्राम पाटील म्हणाले की, "मला या प्रक्रियेमुळे कुठेही जाता येणार नाही असं नाही. मला जिथे जायचं आहे तिथे मी जाऊ शकतो. एका सोशल मीडिया पोस्ट कोणाला आवडली नसल्यामुळे ही तक्रार आहे. त्यात फारसं काही नाही. त्यामुळे दहा दिवसांनंतर मी पुन्हा लंडनला जाणार आहे.

मला या सगळ्या 35 ते 40 तासांत या गोष्टीमुळे आणि प्रवासामुळे शारीरिक त्रास झाला. पण मानसिकदृष्ट्या मी बरा आहे."

समाजमाध्यमांत काय प्रतिक्रिया?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डॉ. संग्राम पाटील यांच्यासंदर्भातील तक्रारीबद्दल सोशल मीडियात विविध पोस्ट प्रसिद्ध झाल्या आहेत. काही पोस्टमध्ये त्यांना अटक झाल्याचे म्हटले आहे. मात्र पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी पाटील यांना अटक झालेली नसल्याचं सांगितलं आहे.

वकील असीम सरोदे यांनीही फेसबूकवर यासंबंधी पोस्ट लिहिली आहे.

ते लिहितात, "संग्राम पाटील यांना लंडनहून मुंबईत उतरताच पोलिसांनी एअरपोर्टवर ताब्यात घेतले.

आत्ताच त्यांच्याशी संपर्क झाला. त्यांना व त्यांच्या पत्नीला पहाटे 2 वाजतापासून पोलिसांनी चौकशीच्या निमित्ताने ताब्यात ठेवलेले आहे.

खरे तर हे अन्याकारक आहे आणि छळवाद आहे, असंही सरोदे म्हणाले.

संग्राम पाटील हे लंडन मध्ये राहतात. सातत्याने सत्य, निर्भीड आणि स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. एक उत्तम भारतीय जे आता लंडनवासी आहेत त्यांच्यामध्ये डॉ संग्राम पाटील यांचे नाव अग्रणी आहे. त्यांनी लंडनमध्ये माझे भाषण आयोजित केले होते, असं सरोदेंनी म्हटलं आहे.

पोलीस त्यांच्याकडून चांगल्या वागणुकीचा बॉण्ड लिहून घेऊन त्यांना अटी आणि शर्ती घालून सोडले जाईल असे दिसते. मी त्यांच्या संपर्कात आहे आणि संग्राम पाटील यांना कोणतीही कायदेशीर मदत लागल्यास तशी पावले उचलण्यात येतील, असंही सरोदे यांनी लिहिलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)