'केतकी चितळेच्या पोस्टमध्ये शरद पवार यांचा उल्लेख आढळत नाही' - तृप्ती देसाई #5मोठ्याबातम्या

आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा थोडक्यात आढावा-

1. 'केतकी चितळेच्या पोस्टमध्ये शरद पवार यांचा उल्लेख आढळत नाही' - तृप्ती देसाई

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंदर्भात वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अभिनेत्री केतकी चितळेचं समर्थन करणारी भूमिका तृप्ती देसाई यांनी घेतली आहे.

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केतकी चितळेच्या पोस्टमध्ये कुठेही शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख आढळत नाही असा दावा केला आहे. या पोस्टमध्ये केवळ 'पवार' असा उल्लेख असल्याचं तृप्ती देसाई यांचं म्हणणं आहे.

त्या म्हणाल्या, आपल्याकडे लोकशाही आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. तिच्या पोस्टमध्ये कुठेही पूर्ण नावाचा उल्लेख दिसत नाही. त्यामुळे ती पोस्ट शरद पवार यांच्याबद्दलच आहे का? असा प्रश्न देसाई यांनी उपस्थित केला आहे. लोकतमने हे वृत्त दिलं आहे.

दरम्यान, केतकीने शरद पवार यांच्याविषयी जाणीवपूर्वक लिहिलं असल्यास ते चुकीचं आहे असंही त्या म्हणाल्या आहेत.

केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. सोशल मीडियावरही तिच्यावर टीका करण्यात आली तर पोलीस ताब्यात घेत असताना केतकीवर शाई फेकण्यात आली.

केतकीला प्रत्युत्तर देताना आपण किती संस्कारहीन आहोत हे दाखवू नका, असंही तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत. केतकीने चुकीची पोस्ट केली असल्यास तिच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी पण ट्रोलर्सने असभ्य भाषा वपरू नये, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शरद पवार यांनीा यासंदर्भात प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे. आपण केतकी चितळेला ओळखत नसल्याने तिने काय पोस्ट केली आहे हे सुद्धा माहिती नाही असं म्हणत शरद पवार यांनी यावर कोणतेही भाष्य केलेले नाही.

2. भाजपच्या प्रवक्त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण?

पुण्यातील भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहारण केल्याचा एक व्हीडिओ समोर आला आहे. पुण्यातील त्यांच्या कार्यालयात घुसून ही मारहाण केली आहे.

दोन दिवसांपूर्वी विनायक आंबेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती असा आरोप करण्यात आला. त्याविरोधात त्यांच्यावर हल्ला केल्याचे समजते.

महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.

यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दिली होती. यामुळे आता पुण्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला वाद चिघळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विनायक आंबेकर यांनी आपल्या कवितेतल्या ओळी मागे घेतल्या असून माझ्या कवितेत मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. कुणाबाबत वाईट चिंतन करण्याची संस्कृती भाजपची नसल्याचंही त्यांनी म्हटलं.

3. 'शिवसेना सत्ता लंपट आहे' - गिरीश महाजन

"शिवसेनेची सभा म्हणजे शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रयत्न. विधानसभेला युती नसती तर शिवसेनेचे 25 आमदारही निवडून आले नसते," अशी टीका भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

'शिवसेना म्हणजे गटारातील बेडूक आहे,' असंही महाजन म्हणाले. शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शनिवारी (14 मे) जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले, "त्यांनी मतदारांनी उत्तर दिलं आहे. 10 वर्षांपासून देत आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात मोठा झाला. सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. आमची युती झाली होती. पण आज काय परिस्थिती आहे. आम्हाला जनतेनं सर्वाधिक जागा दिल्या. मोदींवर यांना बोलण्याची गरज नाही. यांची लायकी आहे का?" अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली. न्यूज 18 लोकमत

न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

तसंच शिवसेना सत्ता लंपट असून त्यांनी स्वबळावर 4 खासदार निवडून आणावेत असंही महाजन म्हणाले.

4. 'गव्हाच्या निर्यातीवर बंदीचा निर्णय शेतकरी विरोधी'

केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी आणली आहे, सरकारचं हे पाऊल शेतकरी विरोधी असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

सरकारने पुरेसा गहू खरेदी न केल्याने ही परिस्थिती उद्भवली असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

सरकारच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, गव्हाच्या वाढत्या किमती लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे. भारत, शेजारी देश आणि इतर देशांची खाद्य सुरक्षा धोक्यात आहे. 'हे पाऊल देशाच्या संपूर्ण खाद्य सुरक्षेवर उपाय आणि शेजारील, गरजू देशांच्या गरजांचे समर्थन करण्यासाठी उचललं आहे.' असंही यात म्हटलं आहे.

चिदंबरम म्हणाले, "सरकारने असा निर्णय घेतला कारण केंद्र सरकारला पुरेसा गहू खरेदी करता आला नाही. असं नाहीय की गव्हाचे उत्पादन कमी झाले आहे. खरेदी झाली असती तर निर्यातीवर बंदी घालण्याची आवश्यकता भासली नसती."

"गव्हाच्या निर्यातीवर बंदी आणण्याचा निर्णय शेतकरी विरोधी आहे. सरकारच्या या निर्णयाचे मला आश्चर्य वाटले नाही करण या सरकारने कधीही शेतकरांच्या हिताचे काम केलेले नाही." असंही ते म्हणाले. बीबीसी हिंदीने हे वृत्त दिले आहे.

राजस्थान येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरादरम्यान ते बोलत होते.

5. माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड यांचा कार अपघातात मृत्यू

ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड यांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. ते 46 वर्षांचे होते.

शनिवारी (14 मे) रात्री 10.30 वाजताच्या सुमारास टाऊन्सविलेच्या पश्चिमेला 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये हा अपघात झाला. अपघातानंतर सायमंड्सला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं परंतु त्यांना वाचवण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा त्यावेळीच त्यांची प्रकृती नाजूक होती.

अँड्र्यू सायमंड यांच्या मृत्यूच्या बातमीने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली असून जगभरातून त्यांचे चाहते दु:ख व्यक्त करत आहेत.

वृत्तसंस्थेनुसार, पोलिसांच्या प्राथमिक तपासात भरधाव वेगात असलेली कार उलटल्याचं समोर आलं आहे. यावेळी अँड्र्यू एकटेच कारमध्ये होते. यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. एलिस नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाला, एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)