You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जितेंद्र आव्हाड यांची अनंत करमुसे प्रकरणातील अटक लपून कशी राहिली?
- Author, मयुरेश कोण्णूर,
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी.
अनंत करमुसे मारहाण प्रकरणात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आणि काही वेळातच जामिनावर त्यांची सुटका झाली. ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजीत सिंह यांनी 'बीबीसी मराठी'शी बोलतांना ही कारवाई झाल्याची माहिती दिली.
वर्तकनगर पोलिसांनी आधी त्यांचा जबाब नोंदवला आणि त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं आव्हाड यांना 10 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
आव्हाडांवर IPCच्या कलम 365, 324, 143, 147,148 आणि 506 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"मूळ FIR मध्ये आव्हाड यांचं नाव नव्हतं. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास आव्हाड यांना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांच्यावर अपहरण आणि मारहाणीचे आरोप करण्यात आले आहेत," अशी माहिती आव्हाडांचे वकील प्रशांत कदम यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली आहे.
पण माध्यमांसहित ही बातमी सर्वांना रात्री उशिरा, जामीन मंजूर झाल्यावर काही तासांनी समजली. तोपर्यंत 'महाविकास आघाडी'च्या एका महत्वाच्या मंत्र्याची अटक, तीही राज्यभर बराच काळ चर्चेत राहिलेल्या प्रकरणात, गुलदस्त्यात राहिली. त्यामुळे प्रश्न हा विचारला जातो आहे की आव्हाडांची अटक सर्वांपासून लपून कशी राहिली?
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी रात्री साडेनऊच्या सुमारास आव्हाडांच्या अटकेबद्दल ट्विट केल्यानंतर ही बातमी सर्वत्र पसरली. "ही बातमी कशी माध्यमांपर्यंत कशी पोहोचली नाही, गोपनीयता का बाळगली हा माझ्यासाठी प्रश्न नाही. प्रश्न हा आहे की उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्र्याचं हे प्रकरण पंधरा महिने दाबून का ठेवलं? त्याबद्दल सगळे गप्प का होते? शेवटी न्यायालयामुळे ही कारवाई करावी लागली. आव्हाडांचा ताबडतोब राजिनामा घेण्यात यावा," असं किरीट सोमय्या 'बीबीसी मराठी'शी बोलतांना म्हणाले.
जी माहिती मिळाली त्याप्रमाणे, गुरुवारी दुपारी जितेंद्र आव्हाड हे ठाण्याच्या वर्तकनगर पोलिस ठाण्यात गेले जिथे अनंत करमुसे यांचे अपहरण आणि मारहाण यासाठी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्या जबाब नोंदवण्यात आला आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
त्यानंतर दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं जिथं त्यांना 10 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला. पण हे सगळं घडत असतांना कोणाला मागमूसही नव्हता. आव्हाड पोलिस स्टेशनला आणि नंतर न्यायालयात गेले ही बातमी कोणालाही समजली नाही.
वरिष्ठ पत्रकार अभय देशपांडे यांच्या मते ज्या प्रकारे ही अटक आणि जामीन झाल्याचे समोर येते आहे ते पाहिलं तर अगदीच कोणाला माहित नसेल असं नाही.
"हे स्थानिक पातळीवर आणि वर वरिष्ठ नेतृत्वाला माहित नसेल असं नाही. एवढ्या मोठ्या मंत्र्याला अटक कशी करायची याच्यावर चर्चा आणि मग ठरवून निर्णय झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचाच एक भाग गोपनीय ठेवणं हाही असू शकेल. शिवाय जी आवश्यक न्यायिक प्रक्रिया ही पार पाडावीच लागणार असते अन्यथा न्यायालयापुढे प्रकरण गेलं असतं. त्यामुळे ती प्रक्रिया आज पार पाडण्यात आली," देशपांडे म्हणतात.
ठाण्यातल्याही काही पत्रकारांशी बोलल्यावर असं समजलं की त्यांनाही या अटकनाट्याचा सुगावा लागला नाही. अशा प्रकारे ते सर्वांपासून गोपनीय ठेवण्यात आलं होतं.
'महाविकास आघाडी' सरकारचे अनेक मंत्री सध्या विरोधकांनी केलेल्या आरोपांमुळे, केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीमुळे टीकेचे लक्ष्य आहेत.
त्या पार्श्वभूमीवर एका मंत्र्याच्या अटकेची माहिती अशा प्रकारे गुप्त ठेवण्यात आली का अशीची चर्चा आहे. जितेंद्र आव्हाडांची याबाबत प्रतिक्रिया घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण ती अद्याप मिळालेली नाही.
नेमकं प्रकरण काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याच्या आव्हानावर आव्हाड यांनी टीका केली होती. त्यानंतर अनंत करमुसे यांनी आव्हाड यांना एका अक्षेपार्ह फेसबुक पोस्टमध्ये टॅग केलं होतं.
त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील अनंत करमुसे यांनी केला होता. त्यानंतर ठाणे भाजपने या प्रकरणी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.
जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी घरातून उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. मारहाण झाली तेव्हा यावेळी स्वत: जितेंद्र आव्हाडही त्याठिकाणी उपस्थित होते, असा करमुसे यांचा दावा आहे.
मी समाधानी नाही - करमुसे
मारहाण झालेली व्यक्ती अनंत करमुसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं,
"जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली असेल तर ज्या लोकांना त्रास देण्यात आला, कुणाचं मुंडन करण्यात आलं, कुणाच्या घरी जाऊन मारहाण करण्यात आली, त्या सर्वांचा हा विजय आहे. त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि असंच कायद्यानं यांच्याशी लढत राहिल."
करमुसे यांनी पुढे सांगितलं, "अटक झाली आणि सुटका झाली यावर मी समाधानी नाहीये. त्यांना शिक्षा झाली पाहिजे. कारण त्यादिवशी मला घरातून बाहेर नेण्यात आलं. माझ्या घरच्यांना खोटं सांगून मला बाहेर नेण्यात आलं होतं. ज्यांनी बाहेर नेलं ते पोलीस आजसुद्धा नोकरीवर आहेत. त्यांनासुद्धा 2 तासात जामीन देण्यात आलेला आहे. जे मला अजिबात पटलेलं नाहीये. खाकीवरच्या विश्वासानं मी त्यांच्याबरोबर गेलो होतो, त्याला डाग लागला आहे. जोवर या पोलिसांना बडतर्फ करत नाही, तोवर मला न्याय मिळणार नाही."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)