You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आंतरराष्ट्रीय महिला दिन: आमच्यासाठी वर्षाचा प्रत्येक दिवस असतो 'महिला दिन'
ती. शेतात राबणारी, मैदानात खेळणारी, अडथळे ओलांडत चालणारी ती. कधी घर सांभाळणारी तर कधी गावगाडा चालवणारी, कधी प्रश्न विचारणारी तर कधी खळखळून हसणारी ती. नारीशक्तीच्या अशा वेगवेगळ्या रूपांना सलाम करणारा आजचा दिवस- म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिवस.
पण महिलांचं कौतुक असं एकाच दिवसापुरतं मर्यादित ठेवावं का? निदान आम्हाला तरी तसं वाटत नाही.
बीबीसी न्यूज मराठीसाठी रोजचा दिवसच महिला दिवस आहे. एक वृत्तसंस्था म्हणून महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देणं, त्यांचं यश साजरं करणं हे बीबीसी आपलं कर्तव्य मानते.
केवळ एकच दिवस नाही, तर वर्षभरच आम्ही प्रेरणादायी महिलांच्या कहाण्या सांगत आलो आहोत. त्यातल्याच या काही वेचक आणि वेधक गोष्टी.
मी कशाला बंधनात राहू गं ?
आपलं वय झालंय, समाज काय म्हणेल, हा व्यवसाय बायकांचा नाही... अशा पूर्वग्रहांना मागे टाकत, सगळी बंधनं झुगारून वाटचाल करणाऱ्या प्रेरणादायी महिलांची महाराष्ट्रात कमी नाही.
वय हा फक्त आकडा असतो, शिक्षणाला किंवा कर्तृत्त्वाला वयाचं बंधन नसतं हे कल्याणच्या दहागावच्या गंगाबाई मिरकुटे आजी यांना पाहिल्यावर लक्षात येतं. वयाच्या 89व्या वर्षी त्या गाडी चालवायला शिकल्या.
तर भाग्यश्री फाटक यांनी गुंतवणूक सल्लागार व्हायचं ठरवलं. सोप्या भाषेत मराठीत त्या शेअर बाजाराबद्दल माहिती देतात. यूट्यूबवर त्यांनी स्वतःचं चॅनेलही काढलं आहे. एक गृहिणी ते यशस्वी गुंतवणूकदार ते शेअर बाजार तज्ज्ञ असा भाग्यश्री ताईंचा प्रवास कसा झाला, ते तुम्ही इथे पाहू शकता.
अहमदनगरच्चा सुमन धामणे आजींनीही यूट्यूबवर नाव कमावलं आहे. 'नमस्कार बाळांनो...' असं म्हणत त्या व्हिडिओतून सोप्या सहज शब्दांत रेसिपी दाखवतात. सारोळा कासार इथे राहणाऱ्या सुमनताईंचं 'आपली आजी' हे चॅनेल कसं लोकप्रिय होत गेलं, त्याची कहाणी.
कोण म्हणतं, 'हे बायकांचं काम नाही?'
आपल्या समाजात आजही काही कामं फक्त पुरुषच करताना दिसतात. पण अशा महिलांची कमी नाही, ज्यांनी या समजुतीला छेद दिला आहे.
श्रद्धा ढवण त्यातलीच एक. तसं एरवी गावात बायका गोठा सांभाळतात. पण 21 वर्षांच्या श्रद्धानं त्यापुढचं पाऊल टाकलं आहे. तिनं अहमदनगरच्या निघोज गावात डेअरी व्यवसायाची धुरा समर्थपणे पेलली आहे. इतकंच नाही, तिनं हा व्यवसाय वाढवून आता दुमजली गोठा उभारला आहे. गावी राहूनच शिक्षण पूर्ण केलं आहे.
श्रद्धाच्या या कहाणीला महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळाला आणि बीबीसीच्या बातमीनंतर अनेकांनी तिचं कौतुकही केलं होतं.
हिंगोलीतील जयश्री आंभोरे यांनीही असाच एक पुरुषांची मक्तेदारी मानला जाणारा व्यवसाय निवडला. गेली अनेक वर्ष त्या विद्युत उपकरणांची दुरुस्ती करण्याच्या व्यवसायात आहेत. जयश्रीताई. शेतीपंप, मोटारी, घरगुती उपकरणं या सगळ्यांची दुरूस्ती करण्यात तरबेज आहेत.
मोटार दुरुस्तीचं काम फक्त पुरुषांचं आहे असं जयश्रीताईंना वाटत नाही. उलट आपण हे काम केल्याने पतीला मदत होते आणि आपल्या हातात स्वकमाईचे पैसे येतात, घरात पैसे मागावे लागत नाहीत याचा त्यांना आनंद आहे.
परभणीच्या मालतीताई गिरी यांनीही असाच महिलांविषयी गैरसमजुतींना छेद दिला आहे. इथल्या गंगाखेड रोडवर मालतीताई यांचं कार वॉशिंगग सेंटर आहे. एक महिला चालवत असलेलं हे जिल्ह्यातील एकमेव वॉशिंग सेंटर असल्याचं मालतीताई अभिमानाने सांगतात. 2004 साली मालतीताईंनी हा वॉशिंगचा व्यवसाय सुरू केला.
बिकट वाटेवरून वाटचाल
पुण्यातल्या शिरूर तालुक्यात राहणाऱ्या सुनंदा मांदळे यांनी आपल्या हक्काच्या जमिनीसाठी दिलेला कायदेशीर लढा खूप काही शिकवणारा आहे. कागदपत्रांची जमवाजमव करण्यापासून ते खटला लढेपर्यंत सुनंदा यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. महिला राजसत्ता आंदोलन या संस्थेच्या मदतीने त्या गावातल्या इतर महिलांसाठी कायद्याचं प्रशिक्षणं देणारी शिबीरं आयोजित करत आहेत.
विदर्भातल्या अकोल्याजवळच्या कट्यार गावात राहणाऱ्या ज्योती देशमुख यांची कहाणीही अशीच थक्क करणारी आहे. पती, दीर आणि सासऱ्यानं आत्महत्या केल्यावर ज्योती यांनी शेतीची धुरा सांभाळली. घरात तीन कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाल्यावर कुणी ज्योती यांना जमीन विकण्याचा सल्लाही दिला होता. पण ज्योती यांनी त्याच जमिनीवर कष्टानं शेती फुलवली.
बीडच्या पांगरी रोडवरील काशिनाथ गिरम नगरमधील सुंदरबाई नाईकवडे यांचं 9 सप्टेंबरला वृद्धापकाळानं वयाच्या 84 व्या वर्षी निधन झालं. त्यानंतर सुंदरबाईंच्या पार्थिवाला चार सुनांनी खांदा दिला आणि सगळीकडूनच या क्रांतिकारी पावलाचं स्वागत करण्यात आलं. '
कोव्हिडशी लढणाऱ्या योद्धा
कुठल्याही युद्धाप्रमाणेच जागतिक साथीच्या संकटातही महिलांना सर्वाधिक त्रासांना सामोरं जावं लागलं. विशेषत: लॉकडाऊनच्या काळात. त्यात काही महिला तर अगदी आघाडीवरून थेट कोरोना विषाणूशी लढत आहेत.
जगभरात कोव्हिडविरुद्धच्या या लढाईत नर्सेसच योगदान खूप महत्त्वाचं आहे. हिंगोली रुग्मालयात सहायक अधिसेविका असणाऱ्या ज्योती पवार अशाच महिलांचं प्रतिक आहेत.
कोव्हिडनं सगळ्या जगासमोरच वेगवेगळी आव्हानं उभी केली. पण इच्छा असेल तर त्यातही मार्ग काढता येतो. असा मार्ग दाखवणाऱ्यांमध्ये महिला आघाडीवर आहेत. महाबळेश्वरजवळ पाचगणीच्या सेंट झेवियर्स स्कूलमध्ये शिकवणाऱ्या शिक्षिका मौमिता भट्टाचार्जी त्यापैकीच एक.
लॉकडाऊनच्या दिवसांत आपल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू राहावा म्हणून मौमिता यांनी ऑनलाईन शिकवायला सुरुवात केली. पण जवळ ट्रायपॉड किंवा अन्य आधुनिक उपकरणं नव्हती. त्यामुळे मौमितांनी हँगरपासूनच ट्रायपॉड तयार केला. त्यांच्या या 'जुगाड'चा व्हीडियो व्हायरल झाला आणि पाहणाऱ्या प्रत्येकानंच मौमिता यांच्यासारख्या शिक्षकांच्या समर्पण भावनेचं कौतुक केलं.
कोव्हिडविरुद्धच्या लढाईत जगभरातच महिलांनी खूप महत्त्वाचं योगदान दिलं आहे. मग त्या पुण्यात कोव्हिड टेस्ट किट तयार करणाऱ्या मायलॅब टीमच्या मीनल दाखवे भोसले असोत किंवा ऑक्सफर्डमध्ये लस तयार करणाऱ्या टीमच्या सारा गिल्बर्ट असोत
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डर्न यांच्यापासून ते फिनलंडच्या साना मरिन यांच्यापर्यंत जगभरात अनेक देशांत महिला नेत्यांनी कोव्हिडच्या संकटाचा यशस्वीपणे सामना केल्याचं चित्र दिसून आलं. पण फक्त ग्लोबल लेव्हलवरच नाही, तर महाराष्ट्रात गावपातळीवरही महिला नेत्यांनी या संकटकाळात सक्षमपणे परिस्थिती हातालली. अशा महिला सरपंचांच्या प्रेरणादायी कहाण्या बीबीसी मराठीनं मांडल्या आहेत. पारनेरमधल्या गोरेगावच्या सरपंच सुमन तांबे त्यापैकीच एक आहेत. त्यांच्या मदतीला असलेली टीमही महिलांचीच होती.
नेतृत्वाची धुरा
ग्रामीण भागांत खरोखर सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर अधिकाधिक महिलांनी राजकारणात सहभागी व्हायला हवं, नेतृत्व करायला हवं असं अनेक तज्ज्ञांनी अनेकदा बोलून दाखवलं आहे. पण प्रत्यक्षात राजकारणाची, त्यातही सरपंचपदाची वाट अजिबात सोपी नाही. पण काही महिला विपरीत परिस्थितीतही ती जबाबदारी सांभाळत आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या दहेगाव-वाघूळच्या कविता त्यापैकीच एक आहेत.
जी बाई स्वतःला सांभाळू शकत नाही, स्वतः दोन पायांवर चालू शकत नाही, ती गाव काय सांभाळणार' असं त्यांच्या तोंडावर त्यांना सुनावलं गेलं होतं. आता आपलं पद राहो किंवा जावो, राजकारणात सक्रिय असो किंवा नसो महिलांसाठी आयुष्यभर काम करण्याचं त्यांनी ठरवलं आहे.
महाराष्ट्रात काही आठवड्यांपूर्वीच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. त्यात 21 वर्षांच्या स्नेहल काळभोर यांची दौंड तालुक्यातल्या खडकी गावच्या सरपंच म्हणून निवड झाली.
महिलांना सरपंच पद मिळालं तरी अनेक गावांत त्या महिलेच्या कुटुंबातील पुरुष सदस्य गावाचा कारभार हाकताना दिसतात. काही ठिकाणी हे चित्रं बदलत असलं, तरी अजून बरेच बदल अपेक्षित आहेत. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्यामागचा उद्देश कितपत साध्य झालाय, याचाही आम्ही आढावा घेतला.
फक्त राजकारणातच नाही, तर प्रशासनातही महिला महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. गुजरातच्या डांग जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबात वाढलेली सरिता गायकवाड पोलीस उपअधीक्षक पदावर कशी पोहोचली पोहोचली? एक ब्युटी क्वीन ते पोलीस ऑफिसर असा पल्लवी जाधव यांचा प्रवास कसा होता?
अशा प्रेरणादायी कहाण्या आम्ही मांडत आलो आहोत.
त्याशिवाय BBC 100 Women ही जगभरातील शंभर प्रेरणादायी महिलांची यादी असो वा BBC इंडियन स्पोर्टसवूमन ऑफ द ईयर पुरस्काराच्या निमित्तानं केलेल्या बातम्या असोत. महिलांचा विचार रोजच करत राहणं हाच त्यांच्या कर्तृत्त्वाला केलेला सलाम ठरावा.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)