You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी म्हणाले, "ममता बॅनर्जींनी बंगालचा विश्वासघात केला"
'पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन आणण्यासाठी येथील नागरिकांनी ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास दाखवला होता. पण ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांनी लोकांचा विश्वासघात केला आहे. या सगळ्यांनी मिळून बंगालला अपमानित केलं,' अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान आयोजित एका प्रचारसभेत नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला.
नरेंद्र मोदींनी पुढे म्हटलं, "यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एका बाजूला तृणमूल काँग्रेस, डावे आणि काँग्रेस हे पक्ष आहेत. या सर्वांनी बंगालचा विश्वासघात केलेला आहे. यांची भूमिका बंगाल-विरोधी असते. तर दुसऱ्या बाजूला बंगालची जनता ठामपणे उभी आहे."
याठिकाणी भाजपचंच सरकार बनेल. बंगालच्या नागरिकांच्या हितालाच या सरकारमध्ये प्राधान्य असेल. 'आशोल पोरिबोर्तन' हा मंत्र घेऊन हे सरकार काम करेल, असं मोदी म्हणाले.
मोदींनी म्हटलं, की 'आशोल पोरिबोर्तन' म्हणजे असं बंगाल जिथं सर्वांना समान संधी असेल. गरीबांना पुढे जाण्यासाठी बरोबरीने संधी दिली जाईल. बंगालमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी, उद्योगांचा विकास आणि पुनर्निर्माणाचा विश्वास आम्ही देऊ. येथील परंपरांचं संरक्षणही केलं जाईल.
कोलकाता हे शहर 'सिटी ऑफ जॉय' म्हणून ओळखलं जातं. इथं मोठा ऐतिहासिक वारसा आहे. भविष्यातही याठिकाणी प्रचंड संधी आहेत, असंही मोदी म्हणाले.
मोदी यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे-
- कमिशनबाजीमुळे कोलकाता विमानतळाचं काम रखडलं आहे. अशा प्रकारच्या प्रत्येक कामाला भाजपचं सरकार वेग देईल. इथल्या स्मार्ट सिटी प्रकल्पालाही नवी उर्जा मिळेल.
- पश्चिम बंगालमध्ये नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या विस्ताराला बळ दिलं जाईल. बंगाली भाषेत इंजिनिअरिंग, वैद्यकीय आणि तंत्रज्ञानविषयक शिक्षण मिळेल, त्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
- आमचा उद्देश फक्त सत्तेचं परिवर्तन करणं नसून बंगालचं राजकारण विकासकेंद्रीत करण्याचा आमचा मानस आहे.
- स्वातंत्र्याच्या घोषणा देत काँग्रेस पक्ष सत्तेत आला होता. स्वातंत्र्यानंतर इथं काही काळ काम झालं. पण नंतर व्होटबँकचं राजकारण इथं वाढत गेलं. डाव्या पक्षांनी त्याला आणखीनच वाढवलं.
- पश्चिम बंगाच्या तरुणांच्या रोजगाराच्या समस्या मिटल्या नाहीत. उद्योजकताही वाढली नाही किंवा रक्तरंजित राजकारणातही बदल झाला नाही.
- इथल्या मातीच्या गोष्टी सांगणाऱ्या लोकांनी बंगाल काळाबाजार करणाऱ्या लोकांच्या हाती सोपवला. सध्या येथील सामान्य माणूस त्रस्त आहे. आपल्या स्वकियांचं रक्त सांडताना तो रोज उघड्या डोळ्यांनी पाहतो. त्यांची लूट होताना पाहतो. वैद्यकीय उपचाराअभावी त्याचा जीव जातो. रोजगाराच्या संधी नसल्याने त्यांच्या जवळचे लोक इथून स्थलांतरित होत आहेत.
- ममता बॅनर्जी यांना दीदीच्या भूमिकेत निवडून दिलं होतं. पण त्यांनी एका भाच्याची आत्या या भूमिकेमध्येच स्वतःला बंद केलं. घराणेशाहीच्या काँग्रेसी संस्कारांचा त्याग त्या करू शकल्या नाहीत.
- दीदी तुम्ही फक्त बंगालच्या नव्हे तर भारताची लेक आहात, हे लक्षात ठेवा.
- आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मी इथे आलो आहे. शारदा देवी, मातंगिनी हाजरा, राणी राशमोनी, प्रितीलता वादेदार, सरला देवी चौधरानी, कामिनी राय यांच्यासारख्या कित्येक लेकी बंगालच्या भूमीने भारताला दिल्या.
- पश्चिम बंगालमध्ये आर्सेनिकयुक्त पाणी बालकांचं जीवन उद्ध्वस्त होतआहे. त्यामुळे इथं जल जीवन योजनेची गरज आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)