कंगना राणावत वादावर प्रताप सरनाईक म्हणतात, 'अटक झाली तरी आता माघार नाही'

कंगणा राणावत इथे आली तर आमच्या रणरागिनी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत असं विधान प्रताप सरनाईकांनी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात यावी असं मत राष्ट्रीय महिला आयोगाने व्यक्त केलं. आपण आपल्या विधानावर ठाम आहोत असं शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

ते म्हणाले, "मी माझ्या विधानावर ठाम आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 106 वीरांनी पत्करलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मराठी माणसाच्या रक्त सांडून मिळवलेल्या मुंबई बद्दल कोणीही काहीही बोलेल तर खपवून घेणार नाही."

ते पुढे म्हणाले, "भाजपने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार आहे."

यापूर्वी कंगना राणावतनं मुंबईला 'पाकव्याप्त काश्मीर' म्हटलं होतं.

तिनं म्हटलं होतं, "मला मुंबईबाहेर जायला सांगून पुन्हा परत येऊ नका अशी खुली धमकी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. हे पाहाता आणि मुंबईतले आझादीच्या ग्राफिटी पाहाता मुंबई पाकव्याप्त काश्मीर झाल्यासारखी का वाटत आहे?"

त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केलं की, "मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही." त्यानंतर प्रताप सरनाईक यांनीही कंगनावर टीका केली. सरनाईक यांनी म्हटलं की, "शिवसेनेचा खासदार संजय राऊत यांनी कंगना राणावतला सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे."

कंगना राणावत-संजय राऊत वाद 'भाजप विरुद्ध शिवसेने'च्या दिशेनं जातोय का?

गेल्या दोन दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील टीका, प्रत्युत्तरं आणि आव्हानं सोशल मीडियावर गाजत आहेत. मात्र, हे प्रकरण आता 'भाजप विरुद्ध शिवसेना' या दिशेला वळतंय का, असा सहाजिक प्रश्न उपस्थित होत आहे.

कंगना राणावतनं मुंबईला 'पाकव्याप्त काश्मीर' म्हटलं, त्यानंतर तिच्याविरोधात राजकारणासह सिनेसृष्टीतूनही मोठ्या प्रमाणात टीका झाली. मात्र, कंगनानं मागे पाऊल न टाकता आव्हानाची भाषा सुरू केली आहे.

कंगनाच्या या आक्रमक बाण्याला समर्थन देण्यासाठी भाजपचे मुंबईतील आमदार आणि प्रवक्ते राम कदम पुढे आले. त्यांनी तर कंगनाला 'झांशीची राणी' म्हणत पाठिंबा दिला.

केवळ राम कदमच नव्हे, भाजपचे नेते अवधूत वाघ, पश्चिम दिल्लीचे खासदार परवेश साहीब सिंग, मध्य प्रदेशातील आमदार विश्वास सारंग असे बरेचजण कंगनाच्या समर्थनार्थ पुढे आले.

या सगळ्या गोष्टी गेल्या दोन दिवसात घडल्या. मात्र, गुरुवारी (3 सप्टेंबर) फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियावर 'आमची मुंबई' ट्रेंड झाल्यानंतर शुक्रवारी (4 सप्टेंबर) भाजपचे नेते आणि माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेतून भूमिका स्पष्ट केली. कंगनाच्या मुंबईबाबतच्या भूमिकेशी संबंध नसल्याचे शेलार म्हणाले.

मात्र, कंगना राणावत आणि संजय राऊत वाद 'भाजप विरूद्ध शिवसेना' या दिशेनं जात आहे का, हा प्रश्न उरतोच. त्याचंच उत्तर आपण या बातमीतून शोधणार आहोत. तत्पूर्वी, आपण गेल्या दोन दिवसांमधील 'क्रोनोलॉजी' समजून घेऊ, जेणेकरून या प्रश्नाची पार्श्वभूमी लक्षात येईल.

गुरुवारी दिवसभरात काय काय घडलं?

3 सप्टेंबर रोजी कंगना राणावतनं न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीची लिंक शेअर करत, त्यावर म्हटलं, "मला मुंबईबाहेर जायला सांगून पुन्हा परत येऊ नका अशी खुली धमकी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. हे पाहाता आणि मुंबईतले आझादीच्या ग्राफिटी पाहाता मुंबई पाकव्याप्त काश्मीर झाल्यासारखी का वाटत आहे?"

कंगनानं मुंबईची तुलना 'पाकव्याप्त काश्मीर'शी केल्यानंतर तिच्याविरोधात टीका सुरू झाली. 'आमची मुंबई' या हॅशटॅगद्वारे मुंबई किती सुरक्षित आहे हे कंगनाला सांगितलं गेलं.

सर्वसामान्य लोकांसह राजकीय नेते, सिनेसृष्टीतील कलाकार यांनीही कंगनाच्या वक्तव्याचा निषेध केला.

कंगनावर होणाऱ्या टीकेविरोधात भाजपकडून आमदार राम कदम पुढे आले. कंगनाच्या ट्वीटवर भाजप नेते राम कदम यांनी अशा पोकळ धमक्यांना 'झाशीची राणी' कंगना घाबरणार नाही असं लिहिलं.

तसंच, भाजपचे प्रवक्ते राहिलेले अवधूत वाघ यांनी 'आमची मुंबई' हॅशटॅग वापरून शिवसेनेवर आगपाखड केली.

गुरुवारी दिवसभरात अशाप्रकारच्या टीका आणि प्रत्युत्तरं सुरू असतानाच, शुक्रवारी (4 सप्टेंबर) कंगनानं पुन्हा एकदा शिवसेनेचं नाव न घेता आव्हान दिलं.

भाजपचे पश्चिम दिल्लीचे खासदार परवेश साहीब सिंग यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करणारं ट्वीट केलं होतं. या ट्वीटला कोट रिट्विट करत कंगना म्हणाली, "मुंबईत न येण्यासाठी मला धमक्या दिल्या जात आहेत. पण आता मी ठरवलंय की, पुढच्याच आठवड्यात म्हणजे 9 स्पेटेंबरला मुंबईत यायचं. मुंबई विमानतळावर पोहोचण्याची वेळही मी इथे पोस्ट करेन. कुणाच्या बापात हिंमत असेल, तर मला थांबवून दाखवावं."

कंगनाच्या आव्हानाला संजय राऊत यांनी जशास तसं उत्तर दिलं.

"मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचं श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही," अशा शब्दात संजय राऊत यांनी कंगनाला उत्तर दिलंय.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगनाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, तसंच ठाणे, मुंबईसह ठिकठिकाणी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी कंगनाविरोधात आंदोलनं केली.

भाजपची सारवासारव

हे सगळं सुरू असतानाच आणि विशेषत: कंगनानं मुंबईला 'पाकव्याप्त काश्मीर' म्हटल्यानंतर भाजप एक पाऊल मागे गेलीय.

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेतून कंगनाच्या वक्तव्याशी भाजप सहमत नसल्याचं सांगितलं. मात्र, दुसरीकडे भाजपचेच आमदार राम कदम कंगनाचे समर्थन करताना दिसत आहेत.

एकूणच हे संपूर्ण प्रकरण आता 'भाजप वि. शिवसेना' या दिशेनं जाताना दिसत आहे. याबाबत बीबीसी मराठीनं राजकीय विश्लेषकांची बातचीत केली.

'भाजपकडून कंगनाच्या मताशी फारकत, पण निषेध नाही'

ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई म्हणतात, "हे प्रकरण शिवसेना विरुद्ध भाजप या दिशेला जातंय, हे आता स्पष्टच झालंय. विशेषत: कंगनानं आज थेट उद्धव ठाकरेंवर टीका करणं आणि भाजपच्या नेत्यांनी तिल पाठिंबा देणं, यातून हेच दिसतं."

मात्र, यापुढे जात हेमंत देसाई आधीचे काही संदर्भ उलगडून सांगतात. ते म्हणतात, "गेल्या काही वर्षांत राष्ट्रवाद जागवणारे सिनेमे करणारे नट-नटी समोर आले. कधी स्वच्छता मोहीम, तर कधी सैन्याशी संबंधित किंवा ऐतिहासिक विषयांवर सिनेमे केले गेले. हे सर्व भाजपच्या राजकारणाला पूरक होते. कंगना राणावत ही सुद्धा त्याच संदर्भाच्या जवळ जाणारी आहे."

राम कदम तर कंगनाला झांशीची राणी म्हणाले. "यावरून भाजपचा कंगनाच्या मतांमधील समावेश दिसून येतो. आशिष शेलारांनी कंगनाच्या मतापासून फारकत घेतली. पण निषेध केलेला नाही, याची आपण नोंद घेतली पाहिजे."

हेमंत देसाई इथे एक महत्त्वाचा पैलू दाखवून देतात. ते म्हणतात, "भाजपचा थेट समावेश कंगनाच्या मताशी नाही, असं मानलं तरी ठाकरे कुटुंबाविरोधात थेट बोलणाऱ्या व्यक्तीचा आपल्याला फायदा करून घ्यायची रणनिती यात भाजपची दिसते."

मुंबईतील 'द हिंदू'चे पत्रकार अलोक देशपांडे म्हणतात, "कंगनाला समर्थन करणाऱ्या भाजप नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील राम कदम वगळल्यास महाराष्ट्राबाहेरील नेते दिसतात. मग महाराष्ट्रातील नेत्यांना कंगनाशी सहमती नसेल, तर त्यांना राजकीय फायदा कसा मिळेल? याचा विचार भाजपनं करणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्रात बाहेरील नेते निवडणुका लढणार नाहीत, इथले नेते लढणार आहेत."

'कंगनाच्या वक्तव्यांमधून शिवसेनेलाही राजकीय फायदा'

आणखी एक मुद्दा अलोक देशपांडे मांडतात, तो म्हणजे, या प्रकरणात शिवसेनेला होत असलेला राजकीय फायदा.

अलोक देशपांडे म्हणतात, "कंगनाच्या वक्तव्यानंतर मुंबई-ठाण्यात ठिकठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले. त्यांनी आंदोलनं केली. कालपर्यंत शिवसेना शांत होती, पण आज कंगनावर सर्व उलटल्यानंतर शिवसेना तातडीने पुढे आली. हा राजकीय फायदा शिवसेनेला होतोच आहे."

हेमंत देसाई सुद्धा या मताशी सहमत होतात. "राज्यात कोरोनाची गंभीर स्थिती आहे. शिवसेना पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यावर टीका होऊ शकते. अशा वेळेत कंगनामुळे विषयांतर होण्यास मदत होतेय, हा फायदा सेनेला आहेच."

शिवाय, "कंगनाला भाजपमधील जेवेढे नेते समर्थन करतील, विशेषत: मुंबईची तुलना 'पाकव्याप्त काश्मीरशी' तुलना केल्यानंतर, तेवढं शिवसेनेला फायद्याचं असेल, कारण यातून भाजपची 'महाराष्ट्रविरोधी' प्रतिमा तयार होईल," असंही हेमतं देसाई म्हणतात.

दरम्यान, भाजपचे नेते आणि माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी कंगनाच्या मताशी सहमत नसल्याचं सांगून फारकत घेतलीय खरी, पण भाजपचे परराज्यातील आमदार-खासदार कंगनाला समर्थन देत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर तरी हा वाद संपताना दिसत नाहीय.

त्यात कंगना राणावतनं मुंबईत येण्याबाबत आव्हानाची भाषा वापरल्यानं आक्रकम पवित्र्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनेची भूमिका आता काय असेल, याकडेही सर्वांचे लक्ष लागलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)