कंगना राणावतवर रेणुका शहाणे भडकली, म्हणाली 'उचलली जीभ लावली टाळ्याला'

मुंबईची तुलना 'पाकव्याप्त काश्मीर'शी केल्यामुळे अभिनेत्री कंगना राणावतला सर्वच क्षेत्रातून टीकेला सामोरं जावं लागत आहे.

मराठी कलाकारांनीही कंगनाच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. कंगनाने केलेलं वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगत मराठी कलाकारांनी तिला हिसका दाखवल्याचं चित्र या प्रकरणात दिसून आलं.

कंगनाने हे वादग्रस्त ट्वीट गुरुवारी दुपारी 12 वाजून 27 मिनिटांनी केलं होतं. या ट्वीटमध्ये कंगना म्हणते, "मला मुंबईबाहेर जायला सांगून पुन्हा परत येऊ नका अशी खुली धमकी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. हे पाहाता आणि मुंबईतले आझादीच्या ग्राफिटी पाहाता मुंबई पाकव्याप्त काश्मीर झाल्यासारखी का वाटत आहे? असा प्रश्न कंगना यांनी ट्वीटरवर विचारला आहे.

कंगनाच्या या प्रश्नाला अभिनेत्री रेणूका शहाणे यांनी उत्तर दिलं.

"प्रिय कंगना, मुंबई हे असं शहर आहे, जिथे बॉलिवूड स्टार होण्याचं तुझं स्वप्न पूर्ण झालं. त्यामुळे या अद्भुत शहराबद्दल आदरभाव ठेवण्याची तुझ्याकडून अपेक्षा आहे. पाकव्याप्त काश्मीरसोबत तू मुंबईची केलेली तुलना धक्कादायक आहे! उचलली जीभ आणि लावली टाळ्याला" असे म्हणत रेणुका यांनी संताप दर्शवणारा इमोजीही वापरला आहे.

कंगनाचं प्रत्युत्तर

रेणूका शहाणे यांच्या ट्वीटनंतर हे प्रकरण इथंच थांबलं नाही. तर कंगनाने पुन्हा रेणूका शहाणे यांना प्रत्युत्तर दिलं.

"प्रिय रेणुकाजी, सरकारच्या कमकुवत कारभारावर केलेली टीका त्या शहरावरील टीका कधीपासून मानली जाऊ लागली? मला वाटत नाही की आपण इतक्या भोळ्याभाबड्या आहात. आपणसुद्धा रक्तासाठी तहानलेल्या गिधाडाप्रमाणे माझ्या मांसाचा तुकडा घेण्याची वाट पाहत होतात? आपल्याकडून चांगल्या अपेक्षा होत्या" असे कंगनाने लिहिलं.

कंगनाच्या या ट्वीटनंतर रेणुका शहाणे यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिलं.

"प्रिय कंगना, मी सरकारवर टीका करण्यास हरकत घेत नाही. पण "मुंबई पीओकेसारखी का वाटत आहे" ही मला मुंबई आणि पाकव्याप्त काश्मीर यांच्यात थेट तुलना असल्यासारखं वाटतं. ही तुलना खरोखर खूप वाईट होती. मुंबईकर म्हणून मला ते आवडलं नाही! कदाचित तुझ्याकडून आणखी चांगल्याची अपेक्षा करणे, हाच माझा भोळेपणा होता" असा रेणुका शहाणे म्हणाल्या.

रेणुका शहाणे यांच्याप्रमाणेच इतर काही मराठी कलाकारांनीही पाकव्याप्त ट्वीट प्रकरणी कंगनावर जोरदार टीका केली आहे.

इतर कलाकारांची कंगनावर टीका

बॉलीवूडचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने मुंबई हा हिंदुस्तान असल्याचं सूचक ट्विट केलंय. यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकरही मागे राहिली नसून ती ट्विटरवर म्हणतेय की ही मुंबई शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि लाखो जणांना या शहराने रोजगार दिलाय. अशा शहराची तू पाकिस्तानशी कशी काय टीका करू शकतेस? असा सवाल तिने उपस्थित केलाय.

तर अभिनेता सुबोध भावे देखील चांगलाच चिडला असून तो ट्विटमध्ये म्हणतो की, "ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन जरूर करा.जिथे तुम्हाला काम मिळालं, ओळख मिळाली त्या शहराचा आणि राज्याचा मान ठेवा."

तर दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात की, "ही मुंबई आमची आई आहे आणि या मुंबईने अनेकांना डोक्यावर घेतलंय आणि पायदळी तुडवलंय हे लक्षात ठेवावं असा सल्ला त्यांनी दिलाय."

अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी मुंबई कर्मभूमी असल्याचं म्हणत आमचं मुंबईवर प्रेम असल्याचा उल्लेख केलाय. कंगना रनौतवरचं हे टीका सत्र सुरूच असून कंगनाही अनेकांना प्रत्युत्तर देताना दिसतेय. मात्र, या सगळ्यावरून लोकांचं लक्ष कोरोना, कोसळलेली अर्थव्यवस्था या मुद्द्यांकडून भरकटलं जातंय असाही आरोप होतोय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)