You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रणव मुखर्जी यांचे निधन, केंद्र सरकारने जाहीर केला सात दिवसांचा दुखवटा
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे 84 व्या वर्षी निधन झाले. 10 ऑगस्ट रोजी त्यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याचवेळी त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले होते.
त्यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी यांनी ट्वीट करून याची माहिती दिली आहे. मुखर्जी यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने सात दिवसांच्या दुखवट्याची घोषणा केली आहे.
कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना नवी दिल्लीतल्या लष्कराच्या आर अॅंड आर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
त्यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया झाली यानंतर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली असता ते कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं.
10 ऑगस्ट रोजी मुखर्जी यांनी ट्वीट करून कोरोनाची लागण झाल्याची बातमी दिली होती.
प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट करून श्रद्धांजली वाहिली आहे. प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे एक युग संपलं आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
भारतरत्न प्रणव मुखर्जी यांनी भारताच्या विकासावर अमीट ठसा निर्माण केला आणि समाजाच्या सर्वच स्तरांमधून तसेच सर्व राजकीय विचारांच्या गटांसाठी ते सन्मान्य व्यक्ती होते अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रणव मुखर्जी यांची कन्या श्रर्मिष्ठा मुखर्जी यांना पत्र लिहून आपला शोकसंदेश कळवला आहे. गेल्या पन्नास वर्षात प्रणव मुखर्जी राष्ट्र, सरकार आणि काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे सदस्य होते. त्यांच्या अनुभवाशिवाय, त्यांच्या सल्ल्याशिवाय आपण कसं काम करु शकलो असतो याची कल्पना करता येत नाही. काँग्रेस पक्षाला त्यांच्या जाण्याने मोठं दुःख झालं असून ते सदैव स्मरणात राहतील अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. राहुल यांनी प्रणवदांवा श्रद्धांजली वाहिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)