You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत -चीन सीमा तणाव : दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा, शांतता कायम ठेवण्यावर जोर
लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या गेल्या दोन दिवसांतील घडामोडींनंतर भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात आज (बुधवारी) फोनवरून चर्चा झाली.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी 15 जून रोजीच्या या हिंसक चकमकीचा निषेध नोंदवला आहे. त्यांनी 6 जून रोजी झालेल्या नियंत्रण रेषेबाबत वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत डि-एस्केलेशन कराराची आठवण चीनला करून दिली.
गेला आठवडाभर ग्राऊंड कमांडर्स नियमितपणे याबाबत बैठका घेत होते. हे सुरू असतानाच सीमेवर चीनच्या बाजूला एक इमारत उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा वादाचा मुद्दा बनलेला असताना चीनने पूर्वनियोजित कारवाई केली. चीनचं हे कृत्य हिंसा आणि जिवितहानीसाठी जबाबदार आहे. जैसे थे परिस्थितीत बदल न करण्याच्या कराराचे उल्लंघन करण्याचा हा प्रकार आहे, असं ते म्हणाले.
अशा घटनांमुळे द्विपक्षीय संबंधांवर गंभीर परिणाम होईल, असा इशारा जयशंकर यांनी चीनला दिला. चीनने त्यांच्या कृतीचं स्वयंअध्ययन करून योग्य निर्णय घेण्याची काळाची गरज होती. दोन्ही बाजूंच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी 6 जून रोजी केलेल्या कराराची अंमलबजावणी व्हायला हवी, असं जयशंकर म्हणाले.
चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही याबाबत त्यांची बाजू स्पष्ट केली. अखेर सध्याची परिस्थिती अत्यंत जबाबदारपणे हाताळण्यात येईल, याबाबत सहमती झाली. 6 जूनला झालेल्या कराराची अंमलबजावणी दोन्ही देश अत्यंत शिस्तीने करतील. प्रोटोकॉलनुसार कोणत्याही बाजूने कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही, शांतता राखली जाईल, असं ठरवण्यात आलं.
आम्ही जशास तसे प्रत्युत्तर देऊत - मोदी
गलवान खोऱ्यात चीन आणि भारतीय सैन्यात झालेल्या चकमकीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सैनिकांचं बलिदान व्यर्थ जाऊ दिलं जाणार नाही. आमच्यासाठी देशाची अखंडता आणि सार्वभौमत्व महत्त्वाचं आहे. आम्हाला शांती हवी आहे पण भारताकडे चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता आहे. असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
चीन सीमेवर भारतीय जवान प्रतिकार करताना मारले गेले आहेत. या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. भारत हा शांतताप्रिय देश आहे. पण जशास तसे उत्तर देण्यासही भारत सक्षम आहे, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांसोबत आयोजित ऑनलाईन बैठकीच्या सुरुवातीला मोदी बोलत होते. यावेळी सर्वांनी भारत-चीन सीमेवर चकमकीत ठार झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.
"भारताने नेहमीच शेजारी देशांसोबत सहकार्याची भावना ठेवली आहे. आपण कधीच कुणाला उचकवत नाही. पण वेळ आल्यानंतर त्यांना धडा शिकवतो.
वेळ आल्यानंतर आपण आपलं सामर्थ्य दाखवून दिलं आहे. त्याग आणि बलिदानासोबतच शौर्य आणि धाडसही दाखवता येतं. आम्हाला शांती हवी आहे. पण जशास तसे उत्तर देण्यासही भारत सक्षम आहे," असं मोदी म्हणाले.
"पंतप्रधान गप्प का आहेत?
याआधी भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीटच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकारला 5 प्रश्न विचारले होते.
ते समोर का येत नाहीत?
झालं ते खूप झालं. भारत-चीन सीमेवर नेमकं काय घडलं हे आम्हाला कळायलाच हवं.
आपल्या सैनिकांवर हल्ला करण्याचं धाडस चीन कसं करतं?
ते आपली जमीन कशी बळकावू शकतात?"
अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर जोरदार टीका केली आहे.
गलवान व्हॅली भागात भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये चकमक झाली. या चकमकीतला आधी भारताचे तीन जवान मृत्युमुखी झाल्याचं सांगण्यात आलं होतं.
पण या चकमकीत किमान 20 जण ठार झाल्याचं वृत्त आहे. ही गेल्या 45 वर्षांतील सर्वांत मोठी चकमक असल्याचं म्हटलं जात आहे.
लष्कराने सांगितलं आहे की या चकमकीत 17 सैनिक गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांचा मृत्यू झाला आहे. याआधी तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं लष्कराने सांगितलं होतं.
दरम्यान या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी 19 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता सर्वपक्षिय बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक ऑनलाईन होणार आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका केली आहे. देश तुमच्याबरोबर आहे पण सत्य सांगा असं आवाहन राऊत यांनी केलं आहे.
राऊत म्हणातात,
"पंतप्रधानजी तुम्ही शूर योद्धे आहात. तुमच्या नेतृत्वात भारत चीनचा बदला घेईल.
चीनच्या घुसखोरीला केव्हा प्रत्युत्तर देणार? गोळीबार न होता भारताचे 20 जवान शहीद होतात. आपण काय केलं?
चीनचे किती जवान मारण्यात आले? चीनने आपली जमीन बळकावली आहे का? पंतप्रधानजी, या अवघड काळात देश तुमच्याबरोबर आहे. पण सत्य काय आहे?
बोला, काहीतरी बोला. देशाला सत्य जाणून घ्यायचं आहे."
तसंच "सीमेवर जे काही घडलं त्याकरता आपण जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राहुल गांधी यांना जबाबदार धरू शकत नाही. वीस जवानांनी देशासाठी जीव समर्पित केला. ते आपल्यासाठी लढले. पंतप्रधान जो निर्णय घेतील तो सर्वपक्षांना मान्य असेल पंतप्रधानांनी नक्की काय चुकलं हे जनतेला सांगायला हवं," असं राऊत यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं आहे.
संरक्षण मंत्र्यांची प्रतक्रिया
"भारत-चीन सीमेनजीक गलवान भागात भारतीय सैनिकांना जीव गमवावा लागणं हे अत्यंत वेदनादायी आणि अस्वस्थ करणारं आहे. आपल्या जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवत देशाप्रती कर्तव्य बजावलं. देशासाठी लढताना त्यांनी भारतीय लष्कराची परंपरा कायम राखताना जीव समर्पित केला," असं केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीनंतर पहिल्यांदाच केंद्रीय मंत्र्यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)