You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ज्योतिरादित्य शिंदे यांना कोरोनाची लागण, दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
भाजपचे मध्य प्रदेशातील नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आई माधवीराजे शिंदे यांना कोरोना व्हायरसची लागण झालीय. त्यांना दक्षिण दिल्लीस्थित साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं असून, तिथं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेत.
ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आई माधवीराजे शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी ट्विटरवर माहिती दिली.
PTI या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, "ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आई माधवीराजे शिंदे यांच्या घशात खवखवत होतं, तसंच तापही जाणवत होता. त्यामुळे सोमवारी त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. आज दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहेत. कालच दोघांच्याही कोरोनाच्या चाचणी घेण्यात आल्या."
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विटरवरून ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईची प्रकृती लवकारत लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना केली.
काँग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगील यांनीही ट्वीट करून ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही ट्वीट करून ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईच्या प्रकृतीत सुधारणेसाठी प्रार्थना केलीय.
काँग्रेस ते भाजप... ज्योतिरादित्य शिंदे यांचा प्रवास
ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं आणि संबोधलं जातं.
तीन महिन्यांपूर्वी म्हणजे मार्च महिन्यात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजपप्रवेशामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेसचं सरकारही कोसळलं. शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारचा पाठिंबा काढून घेतला.
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
वडील माधवराव शिंदे यांच्या निधनानंतर ज्योतिरादित्य शिंदे राजकारणात आले. ते साल होतं 2002. राजकीय प्रवेशापासूनच ते मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार राहिले. 2014 साली मोदी लाटेतही त्यांनी गुनाची जागा राखली होती.
केंद्रात काँग्रेसचं सरकार असतानाही त्यांनी केंद्रीय मंत्रिपदही सांभाळलं.
2018 साली मध्य प्रदेशात सरकार येण्यात त्यांचा वाटा महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठीही त्यांच्या नावाची चर्चा झाली. मात्र, काँग्रेसनं कमलनाथ यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली. ते नाराज असल्याची त्यावेळीही चर्चा झाली होती.
त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गुना मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला.
2019च्या मेनंतर ज्योतिरादित्य यांच्या हाती काहीच उरलं नव्हतं. खासदारकी गेली होती. त्याचदरम्यान ते पक्षात नाराज असल्याच्या बातम्या यायला लागल्या. तर ज्या राहुल गांधींवर विश्वास ठेवून त्यांनी राजकारण पुढे नेलं होतं, ते राहुल गांधी यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडलं होतं.
याच काळात मध्य प्रदेशातले आणि पक्षातले त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांचं राजकारण बहरलं. कारण काँग्रेसची धुरा पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्याकडे आली होती. दोन्ही नेते सोनिया गांधी यांच्या जवळचे मानले जातात.
नाराज झालेल्या ज्योतिरादित्य यांनी ट्वीटरवरच्या त्यांच्या माहितीमधून काँग्रेसचा उल्लेख काढून टाकला. चर्चांना आणखी उधाण आलं. पण आपण काँग्रेसमध्येच आहोत आणि नाराज नाही असं ज्योतिरादित्य यांच्याकडून सांगण्यात आलं. पक्षाकडून पुनर्वसन होईल अशी ज्योतिरादित्य यांना आशा होती.
दिल्ली दंगलीनंतर काँग्रेसनं 26 फेब्रुवारीला कार्यकारीणीची बैठक बोलावली. या बैठकीत ते शेवटचे काँग्रेस नेत्यांबरोबर दिसले. त्यावेळची त्यांच्या देहबोलीमधून त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसत होती. पक्षकाडून पुनर्वसन म्हणजे राज्यसभेवर तरी वर्णी लागेल अशी त्यांना आशा होती. पण तीही पूर्ण होताना दिसली नाही. महत्त्वाचं म्हणजे आपल्या पदाचा राजीनामा देण्याआधी ज्योतिरादित्य यांनी त्यांच्या मतदारसंघाचा दौरा केला होता.
अखेर मार्च महिन्यात त्यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला.
"राजकारण हे त्यासाठीचं माध्यम आहे. वडिलांनी तसंच गेल्या 18-20 वर्षात मी प्राणपणाने, श्रद्धापूर्वक राज्याची, देशाची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. मन व्यथित आहे, दु:खी आहे. जनसेवेचं उद्दिष्टपूर्ती काँग्रेसच्या माध्यमातून होऊ शकत नाही. वर्तमानात काँग्रेसची स्थिती पूर्वीच्या काँग्रेससारखी राहिलेली नाही," असं ज्योतिरादित्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हटलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)