Deepika Padukone: JNU विद्यार्थ्यांना भेटली दीपिका पदुकोण, छपाकच्या प्रमोशनसाठी होती दिल्लीत

दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रासह देशभरात उमटत आहेत.

आज दिवसाअखेरीस अभिनेत्री दीपिका पदुकोणने दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला भेट दिली. रविवारच्या हिंसाचारात जखमी झालेली JNUSUची अध्यक्ष आयेशी घोषची तिने विचारपूस केली.

दीपिका सध्या तिच्या 'छपाक' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दोन दिवस दिल्लीत आहे.

JNUचा विद्यार्थी नेता उमर खालिदने तिचे आभार व्यक्त केले आहेत. "फॅसिस्ट शक्तींविरोधात विद्यार्थी आणि तरुणांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी धन्यवाद दीपिका. काळ बदलतो आहे," असं तो म्हणाला.

"खान चाचा आता तरी बोलणार का?" असा प्रश्न त्याने आमिर, शाहरुख आणि सलमान खान यांना टॅग करून विचारला आहे.

मात्र तिच्या या भेटीनंतर काही क्षणातच ट्विटरवर #BoycottChhapaak चा ट्रेंड सुरू झाला. अनेकांनी दीपिका ही फक्त आपल्या सिनेमाचं प्रमोशन करण्याच्या दृष्टीने JNUला गेली असल्याचं म्हटलं.

मुंबईतलं आंदोलन हलवलं

दरम्यान, जेएनयू येथे झालेल्या हिंसाचाराविरोधात सुरू करण्यात आलेलं आंदोलन थांबवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला. हे आंदोलन यशस्वी झाल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे.

दिल्लीतील JNU विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ मुंबईतील गेट ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. 

गेट वे ऑफ इंडियाऐवजी आंदोलकांनी आझाद मैदानावर निदर्शनं करावीत असं पोलिसांचं म्हणणं होतं. पण आंदोलकांनी आझाद मैदानावर जाण्यास तयार नव्हते त्यामुळे पोलिसांनी त्यांना उचलून व्हॅनमध्ये बसवलं.

या आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे आणि नागरिकांना त्रास होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण मार्गाने आझाद मैदानावर निदर्शनं करावीत असं पोलिसांनी म्हटलं.

मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर अनेक महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी निदर्शनं केली, तर TISS, IIT-बाँबे सह अनेक मोठ्या शिक्षण संस्थांनी जेएनयूला पाठिंबा दर्शविला आहे.

दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदानात नेल्यावर आंदोलन थांबवण्यात आलं.

"पोलिसांनी आम्हाला जबरदस्तीनं आझाद मैदानात आणलं. मात्र, आता आम्ही आमचं आंदोलन थांबवत आहोत. आमचं आंदोलन यशस्वी झालंय. मात्र, आमचा विरोध कायम राहील, त्यासाठीच्या कार्यक्रम आमच्याकडे खूप कार्यक्रम आहेत," असं आंदोलक कपिल अगरवाल यांनी सांगितलं.

6 जानेवारीला काय झालं?

10.15: 'फ्री काश्मीर'च्या मुद्द्यावर फडणवीसांचा सवाल

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी JNU हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी मुंबईत झालेल्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केला.

मुंबईतील आंदोलनादरम्यान एका मुलीने 'फ्री काश्मीर' असं लिहिलेला फलक हातात घेतला होता.

त्याचसंदर्भात फडणवीस यांनी ट्वीट करून विचारलं, "हा विरोध नेमका कशासाठी आहे?" त्यांनी पुढे म्हटलं, की 'फ्री काश्मिर'च्या घोषणा नेमक्या कशासाठी?

फडणवीसांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारताना म्हटलं आहे, "उद्धवजी तुम्ही फ्री काश्मीर या भारतविरोधी अभियानाला कसं काय सहन करत आहात?"

यावर आज संजय राऊत यांचं उत्तर आलं आहे. ते म्हणाले "ज्या मुलीने हे पोस्टर हातात घेतलं होतं त्यावर तिने स्पष्टीकरण दिलं आहे. तिला असं म्हणायचं होतं की काश्मीरमध्ये असलेले निर्बंध हटवण्यात यावेत."

10.00 :JNU हिंसाचाराविरोधात बॉलिवूड

JNU मध्ये झालेल्या हिंसाचाराविरोधात बॉलिवूडमधील अनेक कलाकारही रस्त्यावर उतरले.

अभिनेत्री तापसी पन्नू, दिया मिर्झा तसंच झोया अख्तर, अनुभव सिन्हा, विशाल भारद्वाज, अनुराग कश्यप, राहुल बोस यांच्यासह अन्य कलाकारांनी बांद्रयातील कार्टर रोडवर येत JNU हिंसाचाराविरोधात आपला निषेध व्यक्त केला.

9.00: दिल्लीमध्ये युवक काँग्रेसचा मशाल मोर्चा

JNU मधील हिंसाचाराविरोधात युवक काँग्रेसनं दिल्लीतील इंडिया गेटवर मशाल मोर्चा काढला.

या मोर्चामध्ये अनेक कार्यकर्ते चेहऱ्यावर मास्क लावून सहभागी झाले होते.

7.30: JNU हिंसाचाराची चौकशी क्राइम ब्रँचकडून- दिल्ली पोलिसांचं स्पष्टीकरण

JNU मधील हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मात्र स्वतःची बाजू मांडताना दिल्ली पोलिसांनी हे स्पष्ट केलं आहे, की JNU हिंसाचाराची चौकशी ही दिल्ली क्राइम ब्रँचकडून केली जाईल.

दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते एमएस रंधावा यांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं, "या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी क्राइम ब्रँचनं एक स्वतंत्र टीम तयार केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी आज घटनास्थळाला भेट दिली. त्यातून पोलिसांच्या हाती अनेक महत्त्वाचे दुवे लागले आहेत."

दिल्ली पोलिसांनी पुरावे शोधण्यासाठी पोलिस सहआयुक्त शालिनी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असल्याचंही रंधावा यांनी सांगितलं.

दिल्ली पोलिसांनी JNU मध्ये केलेल्या कारवाईचं समर्थन करताना रंधावा यांनी म्हटलं, की पोलिसांनी 'व्यावसायिक' पद्धतीनं काम केलं आहे. जखमी झालेल्या 34 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला असल्याचंही रंधावांनी स्पष्ट केलं.

6:48 : गेट वे ऑफ इंडियावर आंदोलन, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

JNU च्या आवारात झालेल्या हिंसाचाराचा विरोध करण्यासाठी मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियावरही आंदोलन करण्यात आलं.

अनेक आंदोलकांनी आपल्या हातात बॅनर आणि वेगवेगळ्या घोषणा लिहिलेले फलक घेतले होते.

देशाचं संविधान आणि विद्यापीठांना हिंसाचारापासून वाचविण्याची गरज असल्याचं या फलकांवर लिहिलं होतं.

अनेक आंदोलकांनी दिल्ली पोलिसांच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

5.46 : 'ABVP चे गुंड आणि RSS शी संबंधित प्राध्यापकांच्या संगनमतानं हिंसाचार'

रविवारी (5 जानेवारी) JNU च्या आवारात झालेला हिंसाचार हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे गुंड आणि विद्यापीठातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या प्राध्यापकांनी संगनमतानं घडवून आणल्याचा आरोप JNU विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आइशी घोष हिनं केला आहे.

5.00 : 'विद्यापीठांना राजकारणाचा अड्डा बनू देणार नाही'

"जे कोणी JNU मधील हल्ल्याप्रकरणी दोषी असतील, त्यांचा शोध नक्कीच घेतला जाईल. पण विद्यापीठांना राजकारणाचा अड्डा बनू देणार नाही," असं वक्तव्यं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी केलं आहे.

4.30 : JNU बाहेर 700 पोलिस कर्मचारी तैनात

JNU मध्ये रविवारी (5 जानेवारी) झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येनं जमले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ANI या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार JNUच्या बाहेर 700 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, विद्यापीठाच्या आवारात शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कुलपतींना निलंबित करण्यात यावं, अशी मागणी JNU टीचर्स असोसिएशनने केली आहे.

कुलपतींनी शिक्षण आणि शिक्षण प्रक्रिया चेष्टेचा विषय बनवून टाकला आहे, असं असोसिएशनने सोमवारी (6 जानेवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

2.52: दोषींना 24 तासात अटक व्हावी- काँग्रेस

JNU मध्ये झालेल्या हल्ल्यातील दोषींना 24 तासांच्या आत अटक केली जावी, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.

काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी म्हटलं, "आपण वेगानं अराजकाच्या दिशेनं जात आहोत, याचंच हे लक्षण आहे. देशाच्या राजधानीत भारताच्या सर्वोत्तम विद्यापीठामध्ये केंद्र सरकार, गृहमंत्री, नायब राज्यपाल आणि पोलिस आयुक्तांच्या नजरेसमोर हे सर्व झालं आहे."

"हिंसेचं कारस्थान रचणाऱ्यांची ओळख पटवली जावी आणि त्यांना 24 तासांच्या आत अटक करण्यात यावी, ही आमची मागणी आहे. अधिकाऱ्यांकडूनही या प्रश्नाचं उत्तर मागितलं जाव आणि त्यांच्यावर तातडीनं कारवाई व्हावी," असं चिदंबरम यांनी म्हटलं.

2.35: दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

अॅमनेस्टी इंटरनॅशनलनं जेएनयूमधल्या विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला हा धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. या हल्ल्यामधील दिल्ली पोलिसांच्या कार्यप्रक्रियेवरही अॅमनेस्टी इंटरनॅशनलनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

अॅमनेस्टी इंटरनॅशनलचे भारतातील कार्यकारी संचालक अविनाश कुमार यांनी एक निवेदन प्रसिद्ध करक म्हटलं, की जेएनयू कँपसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेली हिंसा धक्कादायक असून दिल्ली पोलिसांनी अशाप्रकारची हिंसा सहन करणं हे अजूनच वाईट आहे. दिल्ली पोलिसांची भूमिका ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततामय मार्गानं एकत्र जमण्याच्या अधिकाराप्रती उदासीनता दर्शविणारी असल्याचं अॅमनेस्टी इंटरनॅशनलनं म्हटलं आहे.

1.30: जेएनयूमध्ये हल्ला करणाऱ्यांना शिक्षा द्या- उद्धव ठाकरे

जेएनयूमध्ये हल्ला करणाऱ्या लोकांना शोधून त्यांना शिक्षा द्या, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. "(जेएनयूमधील) हा हल्ला तोंड झाकून करण्यात आला. ही घटना 26/11ची आठवण करून देणारी होती.

"दिल्लीमधील विद्यापीठांमध्ये झालेल्या हल्ल्यांप्रमाणे महाराष्ट्रात काहीही होणार नाही. इथल्या विद्यार्थ्यांनी घाबरण्याची गरज नाही. युवकांच्या मनातला उद्रेक माझ्याही मनात आहे. मी युवकांच्या सोबत आहे," अशा शब्दांमध्ये त्यांनी आपलं मत मांडलं.

"माझं म्हणणं एवढंच आहे की सगळ्यांची निपक्षपातीपणाने चौकशी होऊ द्या आणि हल्लेखोरांच्या चेहऱ्यावरचा मुखवटा हा ओरबाडून जनतेसमोर आला पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे," असंही त्यांनी ट्वीट केलं.

11.56:जखमींना डिस्चार्ज

जेएनयूमध्ये रविवारी संध्याकाळी झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या 34 जणांना रुग्णालयातून सोडल्याचे पीटीआयने म्हटले आहे. यातल्या चार जणांच्या डोक्याला जखम झाली होती.

11.40: साबरमती हॉस्टेलच्या वॉर्डनने दिला राजीनामा

जेएनयूच्या साबरमती हॉस्टेलचे वॉर्डन आर. मीना यांनी राजीनामा दिला आहे. आम्ही प्रयत्न केले परंतु हॉस्टेलला आपण संरक्षण देऊ शकलो नाही असे त्यांनी राजीनाम्याचे कारण दिले आहे.

11.16:सीताराम येचुरी- RSS-भाजप देशाचं काय करू पाहाताहेत, हे दिसतंय

जेएनयूमध्ये रविवारी झालेल्या घटनेत जखमी झालेल्या आयशी घोषचा व्हीडिओ ट्वीट करुन माकपा महासचिव सीताराम येचुपी यांनी संघ आणि भाजपवर टीका केली आहे. या व्हीडिओवरुन रा. स्व. संघ आणि भाजप या देशाचं कशात रुपांतर करु पाहात आहे हे समजतं, असं ट्वीट त्यांनी केलं.

11.05:भाजपनं केला निषेध

काल झालेल्या घटनेचा भारतीय जनता पार्टीने निषेध केला आहे. विद्यापीठ हे शिक्षण आणि अध्यापनाचं केंद्र असलं पाहिजे असं भाजपनं ट्वीट केलं आहे.

मुंबईबरोबर पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनीही पुण्यात निदर्शनं केली.

काल झालेल्या हल्ल्यानंतर दिल्लीत पोलीस मुख्यालयाच्या बाहेर निदर्शनं करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या एका गटाने दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते एम.एस. रंधावा यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. जखमी विद्यार्थ्यांना मदत मिळावी, हल्लेखोरांना अटक करावी आणि विद्यापीठ परिसरातली परिस्थिती पूर्ववत व्हावी अशा त्यांच्या मागण्या आहेत.

जखमी विद्यार्थी सध्या AIIMS मध्ये दाखल करण्यात आलं असून विद्यार्थ्यांच्या या गटाला तिथे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हिंसेवर जेएनयू प्रशासनाचं काय म्हणणं आहे?

जेएनयू प्रशासनाने काल झालेल्या घटनेचा प्रशासनाने निषेध केला आहे. ही संपूर्ण घटनाक्रमावर जेएनयूच्या कुलसचिवांनी एक निवेदन जारी केलं. एक जानेवारी 2020 ला विद्यापीठाचं हिवाळी सत्र सुरू झालं होतं. त्यानंतर विद्यार्थ्यांची नोंदणीची प्रक्रिया सुरू होती.

मात्र 3 तारखेला या प्रक्रियेला विरोध करणारा एका गट कम्युनिकेशन अँड इन्फर्मेशन सर्व्हिसेस परिसरात घुसला आणि इंटरनेट सर्व्हर निकामी केलं. निदर्शनं करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटाने अनेक विभागांच्या इमारतीला टाळं ठोकलं. त्या विद्यार्थ्यांची ओळख पटवल्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली.

त्यानंतर 4 जानेवारीला ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या एका गटाने इंटरनेट बरोबर वीज पुरवठाही बंद करण्यात आला. निदर्शनं करणाऱ्या एका विद्यार्थ्यांच्या गटाने विभागाचा फोनही बंद करून टाकला.

जेएनयू प्रशासन पुढे म्हणतं की पाच जानेवारीला नोंदणी केलेले विद्यार्थी विभागाच्या इमारतीत जात होते. त्यांना थांबवण्यात आलं. त्यानंतर पाच जानेवारीच्या दुपारी विभागाबरोबर हॉस्टेलच्या परिसरातही नोंदणीचा विरोध करणाऱ्या आणि आधीच नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली.

प्रशासनाच्या मते दुपारी 4.30 वाजता नोंदणी प्रक्रियेचा विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटाने नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. त्यानंतर तोंड झाकून काही गुंड पेरियार हॉस्टेलच्या खोलीत घुसले आणि विद्यार्थ्यांवर हल्ला केला.

जे विद्यार्थी शांततापूर्ण पद्धतीने अभ्यास करू इच्छितात त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. त्याचप्रमाणे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि शैक्षणिक वातावरण तयार करणाऱ्या लोकांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. जेएनयूच्या मते गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काल नक्की काय घडलं?

दिल्लीस्थित जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष आयशे घोष यांना बेदम मारहाण झाली.

"मास्क परिधान केलेल्या गुंडांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. माझ्या शरीरावरील जखमांमधून रक्त वाहत आहे. मला बेदम मारहाण करण्यात आली," असं आयशे घोष यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

जेएनयू टीचर्स असोसिएशनने आयोजित केलेल्या जाहीर सभेदरम्यान हा प्रकार घडल्याचं सूत्रांनी सांगितलं.हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या लोकांनी केल्याचा आरोप जेएनयूमधील विद्यार्थ्यांनी केला आहे.

बुरखाधारी अज्ञात व्यक्तींनी हॉस्टेलमध्ये धुमाकूळ घातल्याचं सोशल मीडियावरील व्हीडिओंमधून स्पष्ट होतं आहे.

जेएनयूमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅंपसमध्ये पन्नासच्या आसपास लोक घुसले. त्यांच्या हातात काठ्या आणि दंडुके होते. बहुतेकांनी आपला चेहरा झाकून घेतला होता. कॅंपसमध्ये आल्या आल्या त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण करायला सुरुवात केली. या हल्लेखोरांनी कॅंपसमधल्या गाड्यांच्या काचाही तोडल्या.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि समाजातील सर्व स्तरातून या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.

जेएनयू कॅंपसमध्ये झालेल्या हिंसाचाराचा आम्ही निषेध करतो. अनागोंदी माजवण्याचा उद्देश असलेल्या गटांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अस्थिरता पसरवून राजकीय फायदा उठवण्याचा हा प्रयत्न आहे. विद्यापीठं ही शिक्षणाचं आणि शिकण्याचं केंद्र असावं असं भाजपने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेसंदर्भात दिल्ली पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. जेएनयू कॅंपसमध्ये हिंसाचार रोखण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. याप्रकरणाची चौकशी सहआयुक्त पदावरील अधिकाऱ्याने करावी आणि त्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा असे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)