You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
JNU हिंसाचार: आयेशी घोष ही संशयित असल्याचा पोलिसांचा दावा
जेएनयू कॅंपसमध्ये झालेल्या हिंसाचाराचा तपास सुरू असून आम्ही संशयितांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणात आम्ही नऊ संशयितांची ओळख पटवली आहे असं पोलिसांनी सांगितलं.
5 जानेवारी रोजी कॅंपसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना जबर मारहाण करण्यात आली होती. विद्यार्थी संघटनेची नेता आयेशी घोष या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झाली होती. ती देखील या हल्ल्यातील संशयित असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
डीसीपी क्राइम ब्रांच जॉय तिरकी यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं की व्हायरल फोटो आणि सीसीटीव्हीच्या मदतीने ही ओळख पटवण्यात आली. लवकरच या विद्यार्थ्यांना नोटीस पाठवली जाईल असं पोलिसांनी सांगितलं.
जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेशी घोष, संघटनेच्या समितीचे सदस्य सुचेता तालुकदार, प्रिया रंजन, डोलन सामंत, योगेंद्र भारद्वाज, विकास पटेल, पंकज मिश्रा आणि वास्कर विजय हे देखील हल्ल्यातील संशयित असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांनी संशयित म्हणून नाव घेतल्यानंतर आएशीने प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी संशयित म्हटलं म्हणून कोणी संशयित होत नाही. मला या देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे असं आयेशी म्हणाली.
याआधी काय झालं?
जेएनयूमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याच्या घटनेचे देशभरात पडसाद उमटले आहेत. मुंबई, पुणे, अलीगड विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
दिल्लीस्थित जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष आएशी घोषला बेदम मारहाण झाली.
मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थी जमा झाले होते आणि त्यांनी जेएनयू हल्ल्याविरोधात शांततापूर्ण मार्गाने निदर्शनं केली.
"मास्क परिधान केलेल्या गुंडांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. माझ्या शरीरावरील जखमांमधून रक्त वाहत आहे. मला बेदम मारहाण करण्यात आली," असं आयशे घोष यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं आहे.
जेएनयू टीचर्स असोसिएशनने आयोजित केलेल्या जाहीर सभेदरम्यान हा प्रकार घडल्याचं सूत्रांनी सांगितलं.
थेट JNUमधून बीबीसी प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे आणि नामदेव अंजना यांची माहिती
जेएनयूच्या मुख्य गेटबाहेर मोठी गर्दी जमली आहे. दोन्ही बाजूच्या विद्यार्थ्यांनी तिथं गर्दी केली आहे. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. मोठ्या प्रमाणात इथं फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.
"गोली मारो देश के गद्दारों को," अशा घोषणा एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांकडून दिल्या जात आहेत. तर "दादागिरी नही चलेंगी," अशा घोषणा डाव्या संघटनेंच्या विद्यार्थ्यांकडून दिल्या जात आहेत.
गेटच्या बाहेर दोन्ही गटांमधल्या विद्यार्थ्यांमध्ये झटापट झाली आहे.
साबरमती हॉस्टेलमध्ये रुम्सच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.
हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या लोकांनी केल्याचा आरोप जेएनयूमधील विद्यार्थ्यांनी केला आहे.
बुरखाधारी अज्ञात व्यक्तींनी हॉस्टेलमध्ये धुमाकूळ घातल्याचं सोशल मीडियावरील व्हीडिओंमधून स्पष्ट होतं आहे.
जेएनयूमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्पसमध्ये पन्नासच्या आसपास लोक घुसले. त्यांच्या हातात काठ्या आणि दंडुके होते. बहुतेकांनी आपला चेहरा झाकून घेतला होता. कॅम्पसमध्ये आल्या आल्या त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण करायला सुरुवात केली. या हल्लेखोरांनी कॅम्पसमधल्या गाड्यांच्या काचाही तोडल्या.
दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीटद्वारे आपल्या भावना मांडल्या आहेत. "जेएनयूमध्ये घडलेल्या हिंसक प्रकाराने मला धक्का बसला आहे. विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. पोलिसांनी तातडीने हा हिंसक प्रकार थांबवून शांतता प्रस्थापित करायला हवी. विद्यापीठाच्या आवारातील विद्यार्थी सुरक्षित नसतील तर देशाची प्रगती कशी होणार," असं त्यांनी म्हटलं आहे.
"जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण, जेएनयूत शिक्षकांना मारहाण, गुंड महिलांच्या हॉस्टेलमध्ये नासधूस करत आहेत.बेदम मारहाणीचं दृश्यं. पोलीस कुठेही नाहीत. जेएनयू प्रशासनाचा पत्ता नाही. विद्यार्थी आणि युवा वर्गाविरुद्ध सूड उगवण्याची मोदी सरकारची ही पद्धत आहे का?" असं ट्वीट काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलं आहे.
"पोलिसांच्या सुरक्षेत गुंड जेएनयूच्या कॅम्पसमध्ये घुसले आहेत," असा आरोप योगेंद्र यादव यांनी केला आहे. पोलिसांनी जेएनयूमध्ये जाणारे रस्ते 1 किलोमीटरपासून रोखले आहेत. पोलिसांनी आत जाऊन मारहाण थांबवावी, गेटवर पाहारा देत राहू नये," असंही योगेंद्र यादव यांनी म्हटलंय.
"दिल्ली काँग्रेसच्या शिष्टमंडळाला वकिलांना घेऊन जेएनयूमध्ये जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सांगितलं आहे. पंतप्रधान किंवा गृहमंत्री या दोघांपैकी कोणीही राजधानीत कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या या हल्ल्याचा निषेधदेखील केलेला नाही," असं काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी म्हटलं आहे.
"जेएनयूचे फोटो पाहिले. तिथे झालेल्या हिंसाचाराचा सर्वस्वी निषेध करतो. हे विद्यापीठाच्या संस्कृती आणि परंपरेविरोधात आहे," असं परराष्ट्र मंत्री आणि जेएनयूचे माजी विद्यार्थी डॉ. एस. जयशंकर यांनी ट्वीट केलं आहे.
''जेएनयू कॅम्पसमधले फोटो भीषण आहेत. मी याच ठिकाणी शिकले. याच ठिकाणी जबरदस्त अशी वादविवाद स्पर्धा रंगायची. विभिन्न मतं मांडण्याचं ते व्यासपीठ होतं परंतु हिंसाचाराची जागा नव्हती. जेएनयूमध्ये घडलेल्या हिंसाचाराचा मी निषेध करते. विद्यापीठं ही विद्यार्थ्यांकरता सुरक्षित असावीत असं या सरकारला वाटतं'', असं अर्थमंत्री आणि जेएनयूच्या माजी विद्यार्थी निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे.
जेएनयू कॅम्पसमध्ये झालेल्या हिंसाचाराचा आम्ही निषेध करतो. अनागोंदी माजवण्याचा उद्देश असलेल्या गटांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अस्थिरता पसरवून राजकीय फायदा उठवण्याचा हा प्रयत्न आहे. विद्यापीठं ही शिक्षणाचं आणि शिकण्याचं केंद्र असावं असं भाजपने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेसंदर्भात दिल्ली पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. जेएनयू कॅम्पसमध्ये हिंसाचार रोखण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. याप्रकरणाची चौकशी सहआयुक्त पदावरील अधिकाऱ्याने करावी आणि त्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा असे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)