You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव, भाजपचा सभात्याग
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 169 मतं पडली तर विरोधात एकही मत नव्हतं.
भाजपने आधीच सभात्याग केला होता, तर मनसे (1), माकप (1), MIM (2) असे एकूण 4 आमदार तटस्थ राहिले.
त्यापूर्वी, सरकारची बहुमत चाचणी जोरदार गोंधळाने सुरू झाली.
हे अधिवेशन आणि मुख्यमंत्र्यांची शपथ नियमबाह्य असल्याचं सांगत मात्र विरोधी पक्ष भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि हंगामी अध्यक्षांवर हल्लाबोल केला.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारला सभागृहात आपलं बहुमत सिद्ध करावी लागण्याची प्रक्रिया जरा काळ लांबली. मात्र त्यानंतर आधी आवाजी मतदान आणि नंतर शिरगणतीने मतदान घेण्यात आलं.
पाहा संपूर्ण विश्वासदर्शक चाचणी
पाहा लाईव्ह अपडेट्स
"मी विरोधी बाकावरच तेव्हाही होतो, आताही आहे, मला काही खंत नाहीये. मी आनंदी आहे की माझ्या अनुभवाचा जास्त उपयोग होतोय." - विखे पाटील
दुपारी 4.00 वाजताः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेच्या आवारात माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षाच्या भूमिकेवर मत व्यक्त केलं. विरोधकांनी सभागृहात थांबायला हवं होतं असं मत त्यांनी मांडलं.
दुपारी 3.15 वाजता: उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं विधिमंडळातलं पहिलं भाषण सुरू.
- या सभागृहात येण्यापूर्वी दडपण होतं.
- मी मैदानातला माणूस... इथे वैधानिक कसं वागायचं, मला ठाऊक नाही. इथे आल्यावर असं वाटलं की यापेक्षा मैदानच चांगलं.
- आज मी रिकाम्या बाकांशी मी बोलणार नाही, कारण रिकाम्या मैदानात मी तलवारबाजी करत नाही.
दुपारी 3.08 वाजता: फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल सुरूच
दुपारी 2.55 वाजता:
दुपारी 2.50 वाजता: 'आदित्य रश्मी-उद्धव ठाकरे'
एकेक आमदार उभे राहून स्वतःचं नाव सांगून जाहीरपणे बोलून मतदान करत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहाचे सदस्य नसल्यामुळे बहुमत चाचणीत मतदान करू शकणार नाहीत.
आदित्य ठाकरेंनी स्वतःचं नाव 'आदित्य रश्मी उद्धव ठाकरे' असं सांगितलं. जाहीरपणे मतदान करताना त्यांनी अशा पद्धतीने नाव सांगितलं.
दुपारी 2.35 वाजता: शिरगणतीला सुरुवात
LIVE: उद्धव ठाकरे सरकारचा विश्वासदर्शक ठराव सुनील प्रभू (शिवसेना), नवाब मलिक (राष्ट्रवादी) आणि अशोक चव्हाणांनी (काँग्रेस) मांडला.
त्यावर आधी आवाजी मतदान घेण्यात आलं आणि नंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हंगामी अध्यक्षांनी शिरगणती सुरू केली.
भाजप आमदारांचा शिरगणती सुरू होण्याआधीच सभात्याग केल्याने महाविकास आघाडीचा विजयाचा मार्ग मोकळा झाला.
दुपारी 2.30 वाजता: भाजपचा सभात्याग
हंगामी अध्यक्षांनी फडणवीसांच्या आक्षेपांवर भाष्य करायला दिला नकार. हे निर्णय राज्यपालांनी घेतले असल्याचं सांगितलं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कामकाज होत असल्याचं सांगितलं.
त्यानंतर शपथेच्या नमुन्याप्रमाणे शपथ घेतलेली नाही, अशी वारंवार तक्रार करत भाजपच्या आमदारांनी फडणवीसांच्या नेतृत्वात सभात्याग केला.
वाचा सविस्तर - भाजपचा सभात्याग, ठाकरे सरकारवर फडणवीसांचा हल्लाबोल
दुपारी 2.20 वाजता: 'अध्यक्षाच्या निवडणुकीत गुप्त मतदान होईल, याला घाबरलं का सरकार?'
उद्धव ठाकरे आणि मंत्र्यांची शपथ घटनेनुसार नाही. राज्यापालांनी 'मी' म्हटल्यानंतर इतर गोष्टी बोलू नयेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांची करून दिलेली ओळख ग्राह्य धरू नये, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
"आजपर्यंत देशात कधी हंगामी अध्यक्ष बदलला नव्हता. हंगामी अध्यक्ष बदलून घटनेची पायमल्ली होतेय. आधी अध्यक्षाची निवड का केली नाही? नियम धाब्यावर बसवून आधी बहुमत चाचणी होतेय. अध्यक्षाच्या निवडणुकीत गुप्त मतदान होईल, याला घाबरलं का सरकार?" असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दुपारी 2.10 वाजता: 'दादागिरी नहीं चलेगी' - भाजप आमदारांचा गदारोळ
हंगामी अध्यक्षांनी फडणवीसांचा मुद्दा फेटाळल्यानंतर भाजपच्या आमदारांनी 'दादागिरी नहीं चलेगी' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.
यावेळी हंगामी अध्यक्ष वळसे-पाटलांनी आमदारांना आठवण करून दिली की थेट प्रक्षेपण लोक टीव्हीवर पाहत आहेत.
या गदारोळातच मुख्यमंत्री ठाकरेंनी नव्या मंत्र्यांची ओळख करून दिली.
दुपारी 2 वाजता: बहुमत चाचणीला सुरुवात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारची बहुमत चाचणी विधानसभेत सुरू झाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या काही मिनिटातच महाविकास आघाडीवर हल्ला चढवला. "विधानसभेचं कामकाज नियमानुसार चालत नाहीये. हे अधिवेशनच नियमबाह्य आहे," असं ते म्हणाले.
"हे अधिवेशन घटनेनुसार नसल्याची तक्रार. आधीचं अधिवेशन संपलं होतं, त्यामुळे हे अधिवेशन नव्याने आणि 'वंदे मातरम'ने सुरू व्हायला पाहिजे होतं. नव्या अधिवेशनासाठी समन्स काढायला हवा होता," अशी तक्रार त्यांनी केली.
त्यावर हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटलांनी फडणवीसांचा मुद्दा फेटाळला. हे अधिवेशन कायदेशीर आणि नियमानुसार असल्याचं ते म्हणाले.
दुपारी 1 वाजता: उद्धव ठाकरे विधानसभेत पोहोचले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत पोहोचले. त्यांनी विधानभवन परिसरात असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण केलं.
दुपारी 12.55 वाजता: एकनाथ शिंदे - भाजपने आम्हाला शिकवू नये
भाजपने आम्हाला शिकवायची गरज नाही, शपथविधीसाठी किंवा बहुमत घेताना आम्ही कुठलेही नियम मोडले नाहीत, असं शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे म्हणाले.
दुपारी 12.48 वाजता: बहुमत आमच्याकडेच - पृथ्वीराज चव्हाण
"किमान 162, कमाल 170 किंवा आणखी जास्त... स्पष्ट बहुमत आमच्याकडे आहे. दोन वाजता कळेल," असा अंदाज काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केला.
हिंमत असेल तर गुप्त मतदान घ्या, असं आवाहन देणाऱ्या चंद्रकांत पाटिलांना बोलताना चव्हाण म्हणाले, "तुम्ही गुप्तमदानाची मागणी का करत आहेत? तुम्हाला पुन्हा घोडाबाजार करायचाय का?"
सकाळी 11.45: जनतेला न्याय देण्याचं काम करू - नाना पटोले
"महाराष्ट्र विधानसभेची देशभरात वेगळी प्रतिष्ठा राहिली आहे. ती कायम ठेवण्याची मी प्रयत्न करेन. राज्याच्या जनतेला न्याय मिळेल, असं काम करू. जनतेच्या प्रश्नांसाठी विधानसभेच्या अध्यक्षानं कधीकधी आक्रमक व्हावं लागतं. वेळेनुसार आक्रमकता कायम ठेवली जाईल," असं विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले म्हणाले.
सकाळी 11.42: नाना पटोले यांनी भरला विधानसभेच्या अध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज
महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज भरला आहे.
नाना पटोले शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करत राहतील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. "नाना पटोले शेतकरी नेते आहेत. ते महाराष्ट्र विधानसभेचे पुढचे अध्यक्ष असतील. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून ते त्यांचं काम करत राहतील."
सकाळी 11.00: नवाब मलिक - 119 आमदार कुठे आहेत, भाजपनं दाखवावं
"चंद्रकांत पाटील शपथविधीवर आक्षेप घेत आहे. भाजपला हे कळायला हवं की देशभरात भाजपनं सुरू केलेल्या पायंड्यानं ही प्रक्रिया सुरू आहे. आज उद्धव ठाकरे सरकारचा विश्वासदर्शक ठराव सादर होत आहे. भाजपनं आमचं आव्हान स्वीकारलं पाहिजे. मतविभाजन करून 119 आमदार कुठे आहेत, हे भाजपनं दाखवून द्यावं," असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलं आहे.
"भाजप सोडून सगळे अपक्ष आणि भाजपमधील अनेक आमदार सत्ता न आल्यामुळे चलबिचल झाले आहेत. भाजपमधील काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार स्वगृही परतण्यासाठी तयार आहे. पण, आम्ही फोडाफोडीचं राजकारण करत नाही. नाहीतर भाजप रिकामा होईल. आमच्याजवळ 170 आमदार आहेत, मतविभाजन झाल्यास हा आकडा वाढू शकतो," असंही ते म्हणाले.
सकाळी 10.40: भाजपचे विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार किसन कथोरे
मुरबाडचे आमदार किसन कथोरे हे भाजपकडून विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार असतील, अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
"नवीन सरकारनं शपथविधी घेतल्यापासून विधिमंडळाचे सर्व नियम धाब्यावर बसण्यास सुरुवात केलीय," अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर केली. "हंगामी अध्यक्ष राज्यपालांनी नियुक्त केल्यानंतर, नियमानं नवीन अध्यक्ष निवडून येईपर्यंत, हंगामी अध्यक्ष तेच राहतात, असं नियम सांगतो. मात्र तरीही नवीन सरकारनं हंगामी अध्यक्ष बदलण्याचा आग्रह केला. त्यानुसार दिलीप वळसे पाटील हे हंगामी अध्यक्ष झाले. हे झालं कारण हंगामी अध्यक्षाला अध्यक्षपदाचे सर्व अधिकार असतात."
नियमाप्रमाणे काम करा, अन्यथा आमचा विरोधी पक्ष नियमाबाहेर तुम्हाला काम करू देणार नाही, असंही पाटील म्हणाले.
"महिनाभर आमदारांना कोंडून ठेवलं, त्यांचे मोबाईल काढून का घेतलेय, त्यांच्या कुटुंबाशी संपर्क का करू दिला नाहीय? मारून मुटकून फार दिवस सरकार चालवता येणार नाही. मात्र आमच्या या सरकारला शुभेच्छा आहेत. आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करू," असं चंद्रकांत पाटील महाविकास आघाडीवर टीका करताना म्हणाले.
सकाळी 10.24: नाना पटोले काँग्रेसचे विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार
विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले हे उमेदवार असतील, अशी माहिती काँग्रेसचे विधानसभा पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी दिलीय.
नाना पटोले हे भंडारा-साकोलीचे आमदार आहेत, आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नितीन गडकरींविरुद्ध नागपुरातून निवडणूक लढवली होती.
सकाळी 9 वाजता: भाजप खासदार चिखलीकर-अजित पवार भेट
दरम्यान, चिखलीकरांच्या भेटीनतंर अजित पवार हे शरद पवारांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी दाखल झाले.
मुंबईत अजित पवार आणि भाजपचे खासदार प्रताप चिखलीकर यांची आजच (30 नोव्हेंबर) सकाळी भेट झाली. प्रताप चिखलीकर हे नांदेडचे भाजपचे खासदार आहेत. गेल्या काही दिवसांमधील घटना पाहता, बहुमत चाचणीच्या दिवशीच अजित पवार-चिखलीकर भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चाही सुरू झाल्या.
"चिखलीकर हे भाजपमध्ये आहेत आणि मी राष्ट्रवादीत आहेत. याचा कुठलाही अर्थ काढू नये. काल चिखलीकरांना मला भेटायचं होतं. पण काल मी व्यस्त असल्यानं आज सकाळी भेटण्यासाठी बोलावंल," असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी चिखलीकरांच्या भेटीवर दिलं.
सकाळी 8 वाजता: संजय राऊत - 170+++++
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभेत 170चा आकडा पार करणार असल्याचा विश्वास ट्विटरवरून व्यक्त केलाय. तर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही आघाडीकडे स्पष्ट बहुमत असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)