You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी: भारतीय विमानं ढगांमुळे रडारपासून वाचली हा मोदींचा दावा किती खरा?
- Author, अभिमन्यू साहा
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
संदर्भः बालकोट हल्ला
पत्रकार (एका मुलाखतीमध्ये): जेव्हा सैनिक हल्ला करत होते, त्या रात्री तुम्हाला झोप लागली होती का?
पंतप्रधान नरेंद्र मोदीः मी दिवसभर व्यग्र होतो. रात्री 9 वाजता आढावा (हवाई हल्ल्याच्या तयारीचा) घेतला. पुन्हा एकदा बारा वाजता आढावा घेतला. त्यावेळेस वातावरण अचानक बिघडलं, भरपूर पाऊस पडला, त्यामुळे आमच्या समोर पेच तयार झाला.
"तज्ज्ञ लोक (हल्ल्याची) तारीख बदलण्याच्या विचारात होते. पण मी म्हटलं इतके ढग आहेत, पाऊस पडत आहेत. म्हणजे आपण (पाकिस्तानी) रडारपासून वाचू शकतो. काय करायचं याच विचारात सगळे होते. मग मी म्हटलं ढग आहेत, जा.... आणि (सैन्य) निघालो..."
मुलांना परिक्षेच्या काळात टिप्स देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विधानामुळं फिजिक्सच्या विद्यार्थ्यांना कोड्यात टाकलं आहे.
प्रश्न हा आहे की रडार ढगाळ हवामानात काम करू शकतात का नाही?
पंतप्रधान म्हणतात, "बालाकोट हल्ल्याच्या काळात भारतीय सैन्यानं ढगांचा तांत्रिक रूपाने फायदा घेतला आणि भारतीय मिराज पाकिस्तानच्या रडारपासून बचावले. त्यामुळे त्यांना लक्ष्यभेद करता आला."
रडार कोणत्याही हवामानात काम करण्यासाठी सक्षम असतं आणि सूक्ष्मलहरींच्या (मायक्रोवेव्ह) मदतीने विमानाचं स्थान ओळखू शकतं असं आतापर्यंत फिजिक्सच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली जात आहे. त्यांना फिजिक्स शिकण्याचा सल्लाही देण्यात येत आहे.
शास्त्रीय घटनांचे जाणकार पल्लव बागलासुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विधानाला खोटं ठरवतात.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "मला जिथपर्यंत समजतं त्यानुसार ढगांचा रडारवर कोणताही परिणाम होत नाही. त्याच्या सूक्ष्मलहरी ढगांना भेदून जातात आणि विमानाचं स्थान शोधतात. पंतप्रधान मोदी यांचं विधान तंत्रज्ञानाच्यादृष्टीने पूर्ण चुकीचं आहे."
ढगांमुळे उपग्रह किंवा फोटो काढणारी उपकरणं काम करण बंद करतात असं पल्लव बागला सांगतात.
ते म्हणतात, "जेव्हा अंतराळातील ऑप्टिकल सॅटेलाइट (फोटो काढणारे उपग्रह) ढगाळ वातावरणामुळं किंवा उजेड कमी झाल्यामुळं फोटो काढणं बंद करतात तेव्हा रडार इमेजिंग उपग्रह वापरण्यात येतो. त्यामध्ये अंतराळातून एक शक्तिशाली सूक्ष्मलहरी पाठवल्या जातात त्या परावर्तित (लक्ष्यावर आदळून) होतात.
अर्थात मुलाखतीमध्ये पंतप्रधान बालाकोट हल्ल्याबाबत भारतीय विमानाचं स्थान जाणण्यासाठी जमिनीवरच्या रडारबाबत बोलत होते.
रडार कसं असतं आणि ते कसं काम करतं?
पण रडार कसं काम करतं आणि ते विमान कसं शोधून काढतं याचा विचार करू
RADAR म्हणजे Radio Detection And Ranging
रडारचा उपयोग विमान, जहाज, मोटरगाड्या यांचे अंतर, उंची, दिशा आणि गती शोधण्यासाठी केला जातो असं राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआईटी) पाटणा येथील एक प्रोफेसर सांगतात.
त्याशिवाय वातावरणात होणारे बदलही त्याच्या मदतीने समजतात.
ते रिफ्लेक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स वेव्ह या तत्वावर काम करतात.
रडारमध्ये सेंडर आणि रिसिव्हर अशी दोन उपकरणं असतात.
सेंडर हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींना टार्गेट म्हणजे लक्ष्यांच्या दिशेने सोडतो. त्या लक्ष्यावर आदळून रिसिव्हरला मिळतात.
लहरी पोहोचण्यात आणि पुन्हा मिळवण्यात किती वेळ लागला याच्याआधारावर विमानाची उंची, विमान किती अंतरावर आहे आणि वेगाची माहिती मिळते.
दिल्लीच्या रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या जागी 'रडार गन' लावण्यात आलेल्या आहेत. त्यांच्याद्वारे गाड्यांचा वेग मोजला जातो. काही भागामध्ये जेव्हा गाड्या ठरवून दिलेल्या वेगाने जातात तेव्हा 'रडार गन' त्यांना ओळखतो आणि वाहतूक पोलीस त्यांच्या चालकांन दंड ठोठावतात.
मोदींच्या विधानावर टीका
शनिवारी न्यूज नेशन टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना नरेंद्र मोदी हे सुद्धा म्हणाले की, त्यांना फारसं विज्ञान कळत नाही आणि तज्ज्ञ त्य़ांना ढगांमुळे हल्ल्याची तारिख बदलण्याचा सल्ला देत होते.
पंतप्रधानांच्या विधानामुळं देशाच्या शास्त्रज्ञांचा अपमान झाला आहे असं शिक्षण आणि विज्ञानक्षेत्रातील लोक म्हणत आहेत. हे शास्त्रज्ञांची टर उडवल्यासारखं आहे. अशा सल्ला ते पंतप्रधानांना देऊ शकत नाहीत.
भाजपाच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरूनही पंतप्रधानांचं विधान ट्वीट केलं. जेव्हा त्या विधानावर चौफेर टिका होऊ लागली तेव्हा ते ट्वीट डिलिट करण्यात आलं.
रडारपासून बचाव करणारी विमानं भारताकडे आहेत?
बालाकोट हल्ला झाल्यानंतर भारतीय विमानांनी पाकिस्तानी सिमेच्या बरेच अंतर आत जाऊन लक्ष्य भेदले होते असा दावा सुरुवातीला करण्यात आला होता. मात्र नंतर भारताने पाकिस्तान प्रशासित काश्मिरमध्येच हल्ला केला आहे असं स्पष्ट करण्यात आलं.
भारतानं ज्या प्रणालीचा वापर केला त्यास 'स्टँडऑफ वेपन' असं म्हटलं जातं. या प्रणालीमुळे दूर अंतरावरूनच लक्ष्य भेदलं जाऊ शकत. मिराजमध्येही स्टॅंडऑफ वेपन प्रणाली आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणातही ते लक्ष्य भेदू शकतात.
आता भारतीय मिराजला ढगांमुळे काहीच फरक पडत नाही तर मग भारताकडे रडारपासून वाचेल असं कोणतंच लढाऊ विमान नाही का असा प्रश्न उरतोच. रफाल विमान तसं असेल का ?
या प्रश्नाचं उत्तर देताना पल्लव बागला म्हणतात, रडारपासून वाचण्यासाठी स्टेल्थ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. किंवा विमानाला कमी उंचीवरून उड्डाण करावं लागतं.
माझ्या माहितीनुसार भारतीय मिराजमध्ये स्टेल्थ तंत्रज्ञान नाही. या तंत्रज्ञानामुळेच तुम्ही रडार मॅपिंगपासून वाचू शकता. स्टेल्थ तंत्रज्ञान असणारी विमाने रशिया आणि अमेरिकेकडे आहेत. रफाल विमानामध्ये हे तंत्रज्ञान नाही. भारताकडे स्टेल्थ तंत्रज्ञान असलेले एकही विमान नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)