You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
D. S. हुडा: 'सर्जिकल स्ट्राईक्स'चे नायक हे काँग्रेसचे 'अजित डोवाल' आहेत का?
- Author, फैजल मोहम्मद अली
- Role, बीबीसी प्रतिनिधी
बहुचर्चित 'सर्जिकल स्ट्राइक' मोहिमेचे नायक मानले जाणारे माजी लेफ्टनंट जनरल D. S. हुडा यांच्या रूपात काँग्रेसने स्वतःचा नायक पक्षाच्या राष्ट्रीय सुरक्षाविषयक टास्क फोर्सवर नियुक्ती झाली आहे. त्यामुळं काँग्रेसलाही स्वतःचे अजित डोवाल मिळाले आहेत. असं म्हटलं जात आहे.
नुकतंच हुडा यांनी 'सर्जिकल स्ट्राईकवर जरा जास्तच राजकारण केलं गेलं,' असं विधान केलं होतं. पण काँग्रेस पक्षाच्या सुरक्षा विषयक टास्क फोर्सवर माझी नियुक्ती झाली असली तरी मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पण हे स्पष्ट करण्यामागे काही खास कारण होतं का, असं विचारल्यावर ते म्हणाले, "तसं मला स्पष्ट करावं लागलं कारण मी औपचारिकरीत्या काँग्रेस पक्षात सामील झालो की काय, असं लोक मला विचारू लागले.
"काँग्रेसनं मला राष्ट्रीय सुरक्षेवर एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचं काम सोपवलं आहे. मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाहीये आणि माझा तसा काही विचारही नाहीये."
भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यावर हुडा सध्या त्यांच्या पत्नीसोबत दिल्लीत राहत आहेत
दरम्यान, त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर हुडा हे निष्पक्ष आहेत, हे लोक मानायला तयार नाहीत.
हुडा काँग्रेस पक्षात आल्याचं काँग्रेस समर्थक सोशल मीडियावर सांगत आहेत. हुडा यांनी काँग्रेसला केलेल्या मदतीवरूत त्यांचं भाजपविषयी काय मत असेल, हे ध्यानात येतं, असं ते काँग्रेस समर्थक सांगत आहेत.
काँग्रेसच्या या टास्क फोर्समध्ये सध्यातरी हुडा हे एकमेव सदस्य आहेत. ते सुरक्षा आणि परराष्ट्र संबंध विषयातले इतर अभ्यासक यांचा अभ्यास गट तयार करून देशाच्या एकूण सुरक्षेवर एक धोरण तयार करणार आहेत.
सप्टेंबर 2016मध्ये पाकिस्तानविरोधात भारतीय सैन्यानं सर्जिकल स्ट्राइक केला, असं सरकारनं सांगितलं. त्याचं नेतृत्व हुडा यांनी केलं होतं. राष्ट्रीय सुरक्षेबाबतच व्हिजन डॉक्युमेंट आपण एक महिन्यात तयार करू असं त्यांनी सांगितलं.
राष्ट्रीय सुरक्षेवर कार्य करणाऱ्या जाणकारांनी अशा डॉक्युमेंटची गरज असल्याचं अनेकदा सांगितलं आहे. त्याचा अधिक फायदा भारताच्या सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाला होऊ शकतो, असं त्यांना वाटतं.
पण हे काम हाती आल्यानं हुडा यांना पुस्तक वाचण्याचा छंद कमी करावा लागणार आहे. सुरक्षा क्षेत्रातली पुस्तक वाचायला हुडा यांना खूप आवडतं.
सध्या त्यासोबत ते अजून एक काम करत आहेत, ते म्हणजे याच विषयावर न्यूजपेपर आणि मॅगझीनमध्ये लेख लिहिणं. या क्षेत्रात त्यामुळं देश-विदेशात होणाऱ्या घटनांवर त्यांचं बारकाईनं लक्ष असतं.
त्यांना पुलवामा घटनेविषयी विचारलं असता ते सांगतात की, या बाबत लोकांमध्ये खूप राग आहे. पण सरकारनं भावनेच्या आहारी जाऊन कोणतीही कारवाई करू नये.
"शांत डोक्यानं विचार करून पाकिस्तानविरोधात पावलं उचलावीत. पाकिस्तान विरोधात काहीच नाही करणं, हा पण काही पर्याय नाहीये," असं त्यांचं म्हणणं आहे.
जनरल हुडा यांनी नोव्हेंबर 2018मध्ये भारतीय सैन्याच्या पुनर्रचनेवर एक अहवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना सुपूर्द केला होता.
भारतीय सैन्याची क्षमता आणखी वाढवणं आणि सैनिकांची संख्या कमी करण्याबाबत त्याचं मत महत्त्वपूर्ण ठरू शकते. असं केल्यानं सुरक्षेवरचा खर्च कमी होऊ शकतो, असा त्यांचा दावा आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर काश्मिरी मुलांवर देशभरात मारहाण होत आहे. यामुळे काश्मिरी मुलांच्या मनावर वाईट परिणाम होईल का, असं विचारलं असता त्यांनी 'होय' असं सांगितलं.
त्यामुळे आपण काय करत आहोत, यावर अधिक सावधान राहिलं पाहिजे.
एवढ्या वयातही तुम्ही इतके फीट कसं काय आहात, असं विचारलं असता ते हसत हसत सांगतात की, "आनंदी राहून." नियमित व्यायाम करतो आणि भारतीय जेवण करतो, असंही ते आवर्जून सांगतात.
जनरल हुडा यांनी मणिपूरमध्येही भारतीय सैन्याची धुरा सांभाळली आहे. मग काश्मीर आणि मणिपूरमध्ये काय फरक आहे, या प्रश्नावर ते सांगतात, "ईशान्य भारत आणि काश्मीर हे दोन्ही पूर्णपणे वेगळे प्रदेश आहेत. दोन्ही ठिकाणच्या समस्या वेगवेगळ्या आहेत."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)