You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हामिद अन्सारी जेव्हा वाघा बॉर्डर ओलांडून 6 वर्षांनी भारतात परतला...
"मी तब्बल सहा वर्षानंतर परत आलो आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. पण मी खूप आनंदात आहे," या शब्दांत 6 वर्षं पाकिस्तानच्या तुरुंगात घालवलेल्या हमिद निहालअन्सारीने बीबीसीशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास अट्टारी वाघा बॉर्डरचे दरवाजे उघडले. 33 वर्षांचा एक तरुण पाकिस्तानातून भारताच्या भूमीत दाखल झाला. आणि थेट आई-वडिलांच्या गळ्यात पडला. तब्बल सहा वर्षानंतर झालेली ही भेट अतिशय हृद्य होती.
तो दुरून दिसताच त्याची आई त्याच्या दिशेने धावत सुटली. तिने तिच्या लाडक्या मुलाला घट्ट मिठी मारली. त्या माऊलीच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. पण त्याही वेळी हमिद अन्सारी, त्याची आणि वडिलांनी भारतीय भूमीवर डोकं टेकवलं. अधिकारी आणि सरकारचे आभार मानले.
सहा वर्षांचा वनवास आणि अत्यंत वेदनादायी दुरावा संपल्याचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी दोन्ही देशातील माध्यमांनीही गर्दी केली होती.
2012 मध्ये हमीद निहाल अन्सारी फेसबुकवरून झालेल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेले होते. त्यानंतर कोहाट परिसरात त्याला जासूसी आणि विना परवाना पाकमध्ये एन्ट्री केल्याच्या आरोपातून अटक करण्यात आली. तेव्हापासून तो मर्दान जेलमध्ये होता. त्याची शिक्षा संपल्यानंतर आज पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी हमिद अन्सारीला भारताच्या हवाली केलं.
हमिदचे कुटुंबीय त्याला भेटण्यासाठी आधीच अमृतसरला पोहोचले होते. हमिदच्या सुटकेनंतर अन्सारी कुटुंबानं दोन्ही देशातील सरकारांचे आभार मानताना "आजचा दिवस आमच्यासाठी ईदसारखा आहे," असं म्हटलंय.
यावेळी हमिदच्या आईनं म्हटलं की "हे सामूहिक प्रयत्न आहे. आम्ही खूप लहान लोक आहोत. आणि आम्ही एकटे काहीच करू शकलो नसतो. सरकारनं अतिशय सकारात्मक दृष्टीनं पहिल्या दिवसापासून आम्हाला मदत केली. सरकारी अधिकाऱ्यांनी आम्हाला कुटुंबातील एखाद्या व्यक्तीप्रमाणं वागवलं. आमचा आवाज खूप कमजोर होता, मीडियानं त्याला ताकद दिली. याशिवाय सामाजिक संस्थांनीही आमची मदत केली. ब्रिटनमधूनही लोकांनी आम्हाला मदतीचा हात दिला. अरविंद शर्मा नावाच्या वकिलानं रुपयाचीही फी न घेता सुप्रीम कोर्टापर्यंत आमची केस लढली. हे सगळ्यांचं यश आहे."
हमिद भारतात परतण्याआधी त्याची आई फौजिया यांच्या हातात चॉकलेट्स होती. त्या म्हणतात की "हमिदला चॉकलेट खूप आवडतात. म्हणून मी त्याच्यासाठी चॉकलेट घेऊन आले आहे."
हामिद पाकिस्तानात कसा गेला?
हामिद पाकिस्ताना कधी, कसा आणि का गेला, याची सविस्तर कथा तुम्ही इथे वाचू शकता - मैत्रिणीसाठी पाकिस्तानात गेलेल्या मुंबईच्या तरुणाची गोष्ट
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)