You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नागपूर : ऑरेंज सिटीची गगनभरारी; पण आव्हानंही मोठी
- Author, नूतन कुलकर्णी, रोहन नामजोशी
- Role, बीबीसी मराठी
येत्या दोन दशकात जगात सर्वाधिक वेगाने आर्थिक प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये भारताचा दबदबा असणार आहे. कारण जगातील वेगाने वाढणारी पहिली दहा शहरं ही भारतातली आहेत. ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या यादीत नागपूर शहरानेही स्थान मिळवलं आहे. MIHAN आणि विविध आयटी कंपन्या, IIM, AIIMS, तसंच नॅशनल लॉ स्कूल, विदर्भ क्रिकेट असोसिएशनचं मैदान यामुळे शहराला झळाळी येऊ लागली आहे. असं असलं तरी शहरापुढं आव्हानंही आहेत. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरची बलस्थानं आणि आव्हानांचा हा आढावा.
ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सने केलेल्या संशोधनाचा अहवाल नुकताच सादर झाला आहे. 2019 ते 2035 या काळात जगभरात वेगाने वाढणाऱ्या शहरांचा अभ्यास करण्यात आला. त्यात सूरतने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर नागपूरचा पाचवा क्रमांक लागतो. त्याशिवाय दुसऱ्या क्रमांकावर आग्रा, त्यानंतर बंगळुरू, हैदराबाद आहेत. याशिवाय तिरुपूर, राजकोट, तिरुचेलापल्ली, चेन्नई आणि विजयवाडा ही शहरंसुद्धा टॉप टेनमध्ये आहेत.
भारताच्या केंद्रस्थानी असलेलं नागपूर शहर अगदी सुरुवातीपासूनच देशाच्या दृष्टीने महत्त्वाचं राहिलेलं आहे. एकविसावं शतक उजाडल्यापासून तर नागपूरच्या आर्थिक विकासाने वेग धरला आहे. मोठ-मोठ्या कंपन्या नागपुरात गुंतवणूक करत आहेत. आशियातली सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत नागपुरात आहे.
इथल्या बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत इंडो-रामा, ह्युंदई, व्हिडिओकॉन यासह अनेक मोठ्या कंपन्यांचे प्रकल्प आहेत. मुंबई-पुण्यामध्ये औद्योगिक वसाहतीनंतर मोठ्या कंपन्यांना नागपूर खुणावत आहे.
देशातील मोठे महामार्ग नागपुरातून जातात, शिवाय देशाच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या रेल्वे गाड्यासुद्धा नागपुरातूनच जातात. त्यामुळे व्यापारीदृष्टीने नागपूरचं भौगोलिक स्थान अतिशय महत्त्वाचं आहे.
याशिवाय गेल्याच दशकात नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. शिवाय देशविदेशातली अनेक विमानं नागपूरवरून जात असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्टँडबाय विमानतळ म्हणूनही मान्यता मिळाली आहे.
MIHAN चं महत्त्व
नागपूर विमानतळाचं हेच वैशिष्ट्य हेरून शहरात मल्टिमॉडल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट अॅट नागपूर म्हणजेच मिहान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पही सुरू करण्यात आला आहे. भारतातल्या सर्वांत मोठ्या आर्थिक प्रकल्पांमध्ये मिहानचा समावेश होतो. मिहान हे पश्चिम आशिया आणि आग्नेय आशियात मालवाहतूक करण्यासाठी महत्त्वाचं हब असणार आहे.
याशिवाय अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी मिहानमध्ये आपले प्रकल्प सुरू केलेत. 2006मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पात आज 35 कंपन्यांनी प्रत्यक्ष काम सुरू केलेलं आहे. यातलं एक मोठं नाव म्हणजे बोईंग एमआरओ. बोईंग हे विमान उत्पादक कंपन्यांमधलं अग्रगण्य नाव आहे. या कंपनीचा विमानाच्या सुट्या भागांच्या मेंटनंसचा प्रकल्प मिहानमध्ये सुरू झाला आहे.
याशिवाय टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एचसीएल या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या मोठ्या कंपन्यासुद्धा आहेत. त्यामुळेच नागपूरसुद्धा पुणे, बंगळुरू, हैदराबादसारखं आयटी हब म्हणून उदयाला येत आहे.
याशिवाय बिग बाझार आणि अमेझॉन यासारख्या मोठ्या कंपन्यांची वेअरहाऊससुद्धा मिहानमध्ये आहेत.
"नागपूरच्या आर्थिक विकासामध्ये मिहानचा मोठा वाटा आहे आणि तेच डोळ्यासमोर ठेवत ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सच्या यादीत नागपूरने स्थान पटकावलं असू शकतं. नागपुरात मिहान एकमेव प्रकल्प आहे ज्याकडून रोजगार निर्मिती आणि स्मार्ट सिटीसाठीच्या मोठ्या अपेक्षा आहेत," अशी प्रतिक्रिया मिहानचे मॅनेजर अतुल ठाकरे यांनी दिली आहे.
येत्या काही वर्षात आणखी साठच्या जवळपास मोठ्या कंपन्या मिहानमध्ये येऊ घातल्या आहेत. त्यात रिलायन्सची लढाऊ विमानांचे सुटे भाग बनवणारा प्रकल्प आणि पतंजलीचा फूड पार्क ही काही मोठी नावं आहेत.
त्याशिवाय कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इंडेमार एव्हिएशन या कंपन्यासुद्धा लवकरच आपलं काम सुरू करतील, अशी अपेक्षा आहे.
मिहानमध्ये आतापर्यंत सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे. तर निव्वळ रिलायन्स तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. इतर कंपन्यांकडून मिळून सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे.
"सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तर होणार आहेच. मात्र सर्व सुरळित असेल तर मिहानमध्ये एक्स्पोनेंशिअल ग्रोथ होण्याची शक्यताही आहे. भांडवली बाजारात पॉझिटिव्ह सेंटिमेंट राहिली तर येणाऱ्या दहा वर्षांत जवळपास पंचवीस हजार कोटी रुपये म्हणजे गुंतवणूक चारपट होण्याचीदेखील संधी आहे," असं अतुल ठाकरे यांनी सांगितलं.
ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या यादीत नागपूरला मिळालेलं स्थान अगदी योग्य आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी दिली आहे. निर्यातीसाठी रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीचं उत्तम जाळं, शहराचं भौगोलिक स्थान आणि कृषी उत्पादनासाठी चांगली जमीन या सर्वांमुळे आर्थिक प्रगती आणि विकास साधण्याची नागपूरची क्षमता मोठी आहे, असं मत डॉ. खांदेवाले यांनी व्यक्त केलं आहे.
'क्षमतांचा पुरेपूर वापर नाही'
मात्र या क्षमतेचा पूरेपूर वापर केला जात नाही, अशी खंतही डॉ. खांदेवाले व्यक्त केली.
डॉ. खांदेवाले यांनी मांडलेले काही मुद्दे असे:
1. नागपुरात उत्कृष्ट प्रतीचं संत्रं उत्पादन. पण त्यावर प्रक्रिया आणि निर्यात होत नाही.
2. रेशीम उद्योगातून ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या उत्पन्न मिळू शकतं. मात्र त्यासाठी कुठलाच ठोस कृती कार्यक्रम नाही.
3. साठ वर्षांत तलावांतील गाळ न काढल्याने तलावांची सिंचन क्षमता घटली.
4. मत्सोद्योगात रोजगार निर्मितीची क्षमत असल्याने तलावांतील गाळ काढून मत्सोद्योगासाठी प्रयत्न व्हावेत.
5. वीज महाग असल्याने अनेक उद्योग परराज्यात गेले.
मूलभूत गरजांचं काय?
शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामं होत आहेत. मात्र आर्थिक प्रगती म्हणजे प्रति व्यक्ती उत्पन्न (पर कॅपिटा इन्कम) वाढणं. नागपुरात मात्र तसं चित्र नाही, असं नागपूर विदर्भ चेंबरचे अध्यक्ष हेमंत गांधी यांना वाटतं.
ते म्हणतात, "नागपूरची अर्थव्यवस्था ही मुळात शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांकडे पैसा राहिला तरच तो अर्थव्यवस्थेत येतो. शेतकऱ्यांनंतर क्रमांक लागतो तो व्यापाऱ्यांचा. मात्र तेही अडचणीत आहेत."
नागपूरच्या काही समस्या पत्रकार विनय हर्डिकर यांनी सांगितल्या. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे असे :
1. आसपासच्या गावातून, लहान शहरातून येणाऱ्यांची संख्या वाढत असताना त्यांच्या मूलभूत गरजा आणि रोजगार हे शहर पुरवू शकेल का?
2. विविध कारणांनी 2 दशकांत नागपूरमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढली पण पाणी, वीज, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते आदी पायाभूत सुविधा पुरवण्याची शहराची क्षमता किती?
नव्याने येणाऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ठोस पावलं उचलावी लागतील," असं हर्डिकर यांनी सांगितलं.
महापालिका काय करत आहे?
नागपुरात वेगाने विकासकामं होतं असल्याचा दावा महापौर नंदा जिचकार यांनी केला आहे.
"सरकारी जागेवर उभारलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्या मुख्यमंत्र्यांनी जीआर काढून अधिकृत केल्या आहेत. त्यामुळे वीज, पाणी यासारखे प्रश्न सोडवण्यात आले आहेत. शहरांतर्गत सिमेंटचे रस्ते बांधण्याचं काम जोरात सुरू आहे," असं त्या म्हणाल्या. स्मार्ट सिटीबाबत नागपूरने केंद्र सरकारच्या दुसऱ्या यादीत स्थान मिळवलं असलं तरी स्मार्ट सिटी होण्याच्या दिशेने कामं सुरू करण्यात नागपूरचा देशात पहिला क्रमांक लागतो, अशी माहितीही महापौर जिचकार यांनी दिली. शहरात मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध होतील, असा दावा त्या करतात.
महापालिकेच्या वतीने शहरात सुरू असलेले काही प्रकल्प असे :
1. हुडकेश्वर, बेसा यांचा शहरात समाविष्ट.
2. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी ऊर्जा प्रकल्पांना विकण्याचा पथदर्शी प्रकल्प.
3. चौकाचौकात सौर पॅनल लावलेत.
4. सार्वजनिक वाहतूक बॅटरी ऑपरेटेड किंवा बायोडिझेलवर
5. मेट्रोलाही काही ठिकाणी सौर ऊर्जा पुरवण्यात येणार आहे.
6. एक लाख वृक्षलागवड करण्यात आली आहे.
राजकीय महत्त्व
नागपूर हे महाराष्ट्राच्या उपराजधानीचं शहर असल्याने शहराला राजकीय महत्त्व पूर्वीपासूनच आहे.
2014 मध्ये केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर नागपूरला अधिकच महत्त्व आलं आहे.
केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी नागपूरचे खासदार आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे असल्यामुळे राजकीय पटलावर नागपूरची वेगळी ओळख तयार झाली आहे. नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे.
सत्तास्थानी असलेले दोन नेते या शहरातील असल्यामुळे नागपूर शहरासाठी निधी आणि विविध प्रकल्प मंजूर होताना दिसतात.
मेट्रोमुळे विकासाला वेग
नागपूर म्हटलं की नागपूर मेट्रो हे आपसूकच पुढच्या चर्चेचा विषय असतो. देशातील इतर शहरांप्रमाणेच सार्वजनिक वाहतूक नागपूरचा महत्त्वाचा मुद्दा आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक बळकट करण्यासाठी 2014 पासून मेट्रोचं काम सुरू झालं आहे.
शहराच्या विविध भागात मेट्रोचे पिलर्स, स्टेशन्ससाठीचं बांधकाम वेगाने सुरू आहे. मेट्रोच्या कामकाजाअंतर्गत सीताबर्डी या व्यापारकेंद्रित संकुल उभे राहणार आहे. सध्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं 65 टक्के काम झालं आहे, असं सांगितलं जातं.
शैक्षणिक हब
मध्य भारतातील एक शैक्षणिक हब होण्याच्या दृष्टीने नागपूरची वाटचाल सुरू आहे. IIM, AIIMS, तसंच नॅशनल लॉ स्कूल यासारखी उच्च शिक्षणाची केंद्रं नागपुरात सुरू झाली आहेत.
भारतातील प्रमुख स्टेडियम
नागपूरजवळच्या जमठा इथे असलेलं विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम भारतातल्या प्रमुख क्रिकेट स्टेडियम्सपैकी एक आहे. टेस्ट, वनडे तसंच ट्वेन्टी-20 अशा तिन्ही फॉरमॅटच्या मॅचेस या स्टेडियमवर होतात. या स्टेडियमच्या प्रांगणातच अंपायर्ससाठी अकादमी आहे.
गेल्यावर्षी विदर्भ संघाने स्थानिक क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या रणजी करंडक स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. विदर्भ संघाचं हे स्टेडियम घरचं मैदान आहे
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)